नवी दिल्ली : काही वर्षांपूर्वी देशातील बहुतेक राज्यांमध्ये काँग्रेसचा दबदबा होता. पण मागील काही वर्षांत पक्षाच्या लोकप्रियतेला ओहोटी लागली. अनेक बड्या नेत्यांनी साथ सोडत भाजप किंवा अन्य पक्षात प्रवेश केला. तर काही नेत्यांनी स्वतंत्र चूल मांडली. आज हेच नेते काही राज्यांचे प्रमुख बनले आहेत. भाजपने वेळ साधत या नेत्यांना साथ दिली. (BJP Latest Marathi News)
ईशान्येकडील सहा राज्यांचे मुख्यमंत्री हे काँग्रेसमधून बाहेर पडलेले नेते आहेत. त्यापैकी चार नेते हे भाजपचे असून दोन नेते भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत बसले आहेत. भाजपने त्रिपुरात बिप्लव देव यांचा राजीनामा घेत माणिक साहा यांना संधी दिली आहे. ते याआधी काँग्रेसमध्येच होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी वेळ साधत काँग्रेसला नामोहरण करण्याची ही राजकीय खेळी खेळल्याचे मानले जाते. (Congress Latest Marathi News)
त्रिपुरा : माणिक साहा
माणिक साहा (Manik Saha) यांनी 2016 मध्ये काँग्रेस सोडत भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपमध्ये आल्यानंतर त्यांना 2020 मध्ये पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद देण्यात आले. त्रिपुरा क्रिकेट अकादमीचेही ते अध्यक्ष झाले. नुकतेच त्यांना राज्यसभेची खासदारकी देण्यात आली होती. आता रविवारी त्यांनी त्रिपुराच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
आसाम : हिमंता बिस्वा सरमा
हिमंता बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) हे 2021 मध्ये आसामचे पंधरावे मुख्यमंत्री बनले. सर्वानंद सोनोवाल यांच्याजागी त्यांच्यावर जबाबदारी देण्यात आली. सरमा हे 2015 मध्ये काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झाले आहेत. 2016 ची विधानसभा आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी केलेला प्रचार हा भाजपच्या विजयातील मोठा वाटा असल्याचे मानले जाते.
मणिपूर : एन. बिरेन सिंह
एन. बिरेन सिंह (N. Biren Singh) यांनी 2016 मध्ये काँग्रेसला रामराम ठोकला. मणिपूरमधील 2017 च्या विधानसभा निवडणुकीआधीच त्यांनी प्रवेश केला अन् तब्बल 15 वर्षांनी काँग्रेसची सत्ता गेली. या निवडणुकीत भाजपने बाजी मारली आणि बिरेन सिंह हे मुख्मयंत्रिपदाच्या खुर्चीत विराजमान झाले. ते मणिपूरमध्ये भाजपचे पहिले मुख्यमंत्री ठरले.
नागालँड : नेफ्यू रियो
नेफ्यू रियो (Neiphiu Rio) यांनी 2002 मध्ये काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यानंतर त्यांनी नागा पीपल्स फ्रंटमध्ये (NPF) प्रवेश केला. या पक्षाची भाजपसोबत आघाडी होती. या आघाडीने 2003, 2008 आणि 2013 मध्येही सरकार बनवले. एनपीएफने भाजपशी काडीमोड घेतल्यानंतर जानेवारी 2018 मध्ये रियो यांनी नॅशनल डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव पक्षात प्रवेश केला. निवडणुकीपूर्वी रियो यांनी भाजपशी हातमिळवणी केली. या निवडणुकीतही त्यांना विजय मिळाला अन् पुन्हा ते मुख्यमंत्री बनले.
पुदुच्चेरी : एन. रंगास्वामी
एन. रंगास्वामी (N. Rangaswamy) हे 2001 ते 2008 या कालावधीत राज्याचे काँग्रेसचे मुख्यमंत्री होते. पण त्यांनी 2011 मध्ये काँग्रेस सोडत स्वतंत्र पक्ष स्थापन केला. त्यानंतर 2011 ते 2016 मध्य ते एन. आर. काँग्रेसच्या माध्यमातून पुन्हा मुख्यमंत्री बनले. 2016 ते 2021 मध्ये ते विरोधी पक्षनेते होते. 2021 च्या निवडणुकीत त्यांनी भाजपशी आघाडी करत पुन्हा सत्ता मिळवली अन् पुन्हा मुख्यमंत्रिपदाची माळ गळ्यात पडली.
अरूणाचल प्रदेश : पेमा खांडू
पेमा खांडू (Pema Khandu) यांनी 2016 मध्ये राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा ते काँग्रेसमध्ये होते. पण त्यानंतर अवघ्या दोन महिन्यातच पक्षात फोडाफोडीचं राजकारण करून 43 आमदारांसह त्यांनी पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल हा स्वतंत्र पक्ष बनवला. त्यानंतर खांडू यांनी चार महिन्यात आपला पक्ष भाजपमध्ये विलीन केला आणि ते भाजपचे मुख्यमंत्री बनले. 2019 मध्ये भाजपला 41 जागांसह पूर्ण बहुमत आल्यावर भाजपकडून त्यांना दुसऱ्यांदा संधी देण्यात आली.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.