Congress Aggresive on BJP Government
नवी दिल्ली : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना सक्तवसुली महासंचालनालयाने (ED) आज चौकशीला बोलावल्यावर कॉंग्रेस पक्षाने निदर्शने करून, सत्याग्रहाचे लेबल लावून तपास संस्थांवरच दबाव आणण्याचा जो प्रयत्न चालविला आहे तो निंदनीय आहे. राहुल गांधी हे एका भ्रष्टाचारात जामिनावर सुटले आहेत व त्यांना केवळ चौकशीला बोलावले म्हणून कॉंग्रेसने जो आरडाओरडा चालविला आहे तो, ‘हा सारा पक्षच भ्रष्टाचाराबरोबर असल्याचे दाखवितो‘ असा हल्लाबोल भारतीय जनता पक्षाने केला. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या चौकशीच्या निमित्ताने देशभर कॉंग्रेस पक्ष संघटनेत पुन्हा जे चैतन्य सळसळू लागले आहे त्यामुळे भाजपच्या वरिष्ठ वर्तुळात अस्वस्थता दिसत आहे.
भाजपने राहुल गांधी यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडण्यासाठी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना मैदानात उतरविले. ईडीच्या कारवाईला सामोरे जाण्यासाठी राहुल गांधी व प्रियांका गांधी- वाड्रा यांनी जो पवित्रा घेतला व पदयात्रेने ईडी कचेरीत जाण्याचा जो निर्णय घेतला त्यानंतर सारा कॉंग्रेस पक्षच ॲक्शन मोडमध्ये आल्याचे दिसते. भाजपच्या माऱयासमोर केवळ ट्विटरच्या सहाय्याने प्रतिउत्तरे देणारे कॉंग्रेस नेते आज दिल्लीपासून अनेक राज्यांतील पोलिस ठाण्यांसमोर आंदोलने करू लागले. एखादी निवडणूक असली की भाजप निराधार आरोप करून व तपास यंत्रणांचा वापर करून विरोधी पक्षनेत्यांना सतावतो तेच इथेही दिसत असल्याची भावना कॉंग्रेसमध्ये सर्वदूर पसरली.
दिल्लीत राज्यसभेचे विरोधी पक्षनेत मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील नेते अधीर रंजन चौधरी, ज्येष्ठ नेते पी. चिंदंबरम व जयराम रमेश, रणदीप सुरजेवाला, के. सी. वेणूगोपाल यांच्यासह पक्षाचे अनेक खासदार व स्वतः प्रियांका गांधीच रस्त्यावर उतरल्याने पोलिसांची चांगलीच धावपळ झाली. तर जनपथ व परिसरातील वाहतूक कॉंग्रेसच्या या अचानक आंदोलनामुळे विस्कळीत झाली. प्रियांका गांधी यांनी सरळ तुघलक पोलिस ठाणे गाठले. हे पोलिस ठाणे कॉंंग्रेससाठी एतिहासिक आहे. कारण १९४८ मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणारा नथूराम गोडसे याला त्या वर्षी ३० जानेवारीच्या संध्याकाळी अटक करून सर्वप्रथम याच ठाण्यात आणण्यात आले होते.
पक्षनेत्या सोनिया गांधी रूग्णालयात असूनही कॉंग्रेसमध्ये हा जो उत्साह संचारला तो भाजपला काहीसा अनपेक्षित होता असे पक्षनेते मान्य करतात. त्यामुळेच भाजपने ‘कॉंग्रेस का हाथ भ्रष्टाचार के साथ' ही टॅगलाईन चालविण्याची रणनीती आखली. इराणी यांनी १९३० मध्ये स्थापन झालेली असोसिएट जनरल लिमीटेड कंपनी (एएलजी) व नॅशनल हेराल्ड हे बंद पडलेले वृत्तपत्र यांची २००० कोटींची मालमत्ता राहुल गांधी व गांधी घराण्याने हडपल्याचा आरोप केला. त्या म्हणाल्या की, 'कॉंग्रेसच्या लोकांचा हा सत्याग्रह नाही तर गांधी कुटुंबाच्या भ्रष्टाचाराला त्यांची ही साथ आहे. कॉंग्रेसने एका भ्रष्टाचारी नेत्यासाठी दिल्लीला वेठीला धरले. कॉंग्रेसची नीदर्शने तपास संस्थांवर दबाव आणण्यासाठी आहेत. लोकशाहीला नव्हे तर भ्रष्टाचारात गुंतलेल्या गांधी घराण्याला वाचविण्यासाठी ही निदर्शने आहेत.
इराणी म्हणाल्या की, 'दिल्ली उच्च न्यायालयाने २०१९ मध्ये या भ्रष्टाचार कटल्यात स्पष्टपणे म्हटले होते की एएलजीचे समभाग गांधी घराण्याच्या यंग इंडियन्स कंपनीकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया म्हणजे या कंपनीची व वृत्तपत्राची २००० कोटींची मालमत्ता विकून बांधकाम क्षेत्रात व्यवसाय करण्याचा हा प्रयत्न आहे. राहुल गांधी ज्या सत्याचा आग्रह धरल्याचे दाखवतात ते सत्य दिल्ली न्यायालयाने दाखविले आहे.
कॉंग्रेस नेत्यांनी या भ्रष्टाचार प्रकरणी आपल्या नेत्याला वाचविण्याचे प्रयत्न चालविल्याचे सांगून इराणी म्हणाल्या की जो पक्षच इंग्रजांनी स्थापन केला त्या पक्षाने आम्हाला ज्ञान देऊ नये. ज्यांना रामाचे अस्तितवही मुळात मान्य नाही त्या कॉंग्रेसला आज रावणाची आठवण येणे हे विनोदी आहे, असेही स्मृती इराणी यांनी म्हटलं आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.