मोठी बातमी : सीबीआयनं अखेर सत्य शोधलं...सुशांतची हत्या नसून आत्महत्याच

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूवरुन मोठा गदारोळ उडाला होता. या प्रकरणी तीन केंद्रीय यंत्रणा तपास करीत होत्या. अखेर या प्रकरणातील गूढ उलगडले आहे.
sushant singh rajput committed suicide and he was not murdered says cbi sources
sushant singh rajput committed suicide and he was not murdered says cbi sources

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) त्याच्या मृत्यूचे गूढ उकलले आहे. या तपासात सीबीआयला सक्त वसुली संचालनालय (ईडी) आणि अमली पदार्थ विरोधी विभाग (एनसीबी) मदत करीत आहेत. सीबीआयने अखेर सुशांतने आत्महत्या केली असून, त्याची हत्या झाली नसल्याचा निष्कर्ष काढला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीबीआयने दोन वेळा सुशांतच्या मृत्यूच्या वेळचा घटनाक्रम त्याच्या फ्लॅटमध्ये तयार करुन पुन्हा तपासला होता. त्यानंतर सीबीआयच्या पथकासमवेत अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) तीन न्यायवैद्यक तज्ञांनी मुंबईतील सुशांतच्या घराची तपासणी केली होती. या  पथकाने सुशांतचा फ्लॅट आणि इमारतीच्या छताची काही काळ तपासणी केली होती. या पथकाने सुशांतच्या मृत्यूची वेळ शवविच्छेदन अहवालात नसल्याबद्दल प्रश्नचिन्हही उपस्थित केले होते. 

सीबीआयकडे 'एम्स'च्या पथकाने अहवाल सादर केला आहे. मुंबई पोलिसांनी दिलेला सुशांतचा शवविच्छेदन अहवाल आणि इतर पुराव्यांच्या आधारे तपासणी करुन 'एम्स'च्या पथकाने हा अहवाल तयार केला आहे. सीबीआयने या अहवालाचा अभ्यास केला. या प्रकरणातील इतर पुराव्यांच्या आधारे सीबीआय अंतिम निष्कर्षापर्यंत पोचली आहे. 'एम्स'च्या अहवालात सुशांतवर विषप्रयोग झाला नसल्याची बाबही नमूद करण्यात आली आहे. यामुळे सुशांतने आत्महत्या केली असून, त्याची हत्या झाली नसल्याचा निष्कर्ष सीबीआयने काढला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

याविषयी बोलताना 'एम्स'च्या न्यायवैद्यक विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता म्हणाले होते की, सुशांतची हत्या की आत्महत्या हे आता सीबीआयनेच ठरवायचे आहे. सीबीआय या प्रकरणी सर्व माहिती उघड करेल. आम्हाला माहिती नाही की हे प्रकरण कोणत्या दिशेला जात आहे.  

सुशांत हा 14 जूनला मृतावस्थेत आढळला होता आणि साडेतीन महिन्यांनंतरही त्याच्या मृत्यूचे गूढ कायम होते. या प्रकरणी सुरूवातीला मुंबई पोलीस तपास करीत होते. मुंबई पोलिसांनी हा आत्महत्येचा प्रकार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, अभिनेत्री कंगना राणावत, भाजपचे खासदार सुब्रह्मण्याम स्वामी आणि राज्यातील भाजप नेत्यांनी सुशांतची हत्या झाल्याचा दावा केला होता. यात नंतर बिहार सरकारनेही उडी घेतली होती. बिहारमध्ये एफआयआर दाखल करुन तेथील पोलीस पथक तपासासाठी मुंबईत दाखल झाले होते. हा तपास सीबीआयकडे सोपवावा यासाठी विरोधी पक्ष भाजपने आणि बिहार सरकारने आक्रमक भूमिका घेतली होती. अखेर सर्वोच्च न्यायालयाने हा तपास सीबीआयकडे सोपवला होता. 

या प्रकरणी तपास सोपवून दीड महिना उलटूनही सीबीआयला सुशांतच्या मृत्यूचे कारण सांगता आलेले नव्हते. यावरुन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल (ता.२) सीबीआयवर ताशेरे ओढले होते. ते म्हणाले होते की, सीबीआय चौकशीतून काय समोर येते याची मागील दीड महिन्यांपासून जनता वाट पाहत आहे. सुशांतने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली? या प्रकरणात मुंबई पोलीस चांगल्या पद्धतीने तपास करीत होते. अचानक हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले. त्यांनी आता तातडीने या प्रकरणी उत्तर द्यावे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com