सुशांतच्या मृत्यूचं गूढ लवकरच उलगडण्याची शक्यता मावळली...

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणावरुन मोठा गदारोळ उडाला होता. यातील गूढ उलगडण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
supreme court dismisses pil in sushant singh rajput death case
supreme court dismisses pil in sushant singh rajput death case

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) अद्याप तपासाची प्रगती जाहीर केलेली नाही. सुमारे साडेसात महिन्यांनतरही सुशांतच्या मृत्यूचे गूढ कायम आहे. सीबीआयने या तपासाबद्दल मौन धारण केल्याने वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. आता याबाबत दाखल जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने  फेटाळली असून, या प्रकरणातील गूढ लवकरच उलगडण्याची शक्यताही मावळली आहे. 

वकील विनित धांडा यांच्यामार्फत या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. सुशांतच्या मृत्यू प्रकरणाचा तपास दोन महिन्यांत पूर्ण करुन तपास अहवाल सादर करण्याचे निर्देश सीबीआयला द्यावेत, अशी मागणी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात केली होते. याआधी दोन महिन्यांत तपास पूर्ण करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आधी सीबीआयला दिले होते.  

याचिकेत त्यांनी म्हटले होते की, सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयवर विश्वास ठेवून सुशांत प्रकरणाचा तपास सोपवला होता. न्यायालयाने 19 ऑगस्टला सीबीआयला तपासाचे निर्देश दिले होते. सीबीआयने अद्यापही याचा तपास पूर्ण केलेला नाही. सीबीआयने तपास जाहीर करावा, अशी मागणी सुशांतचे कुटुंबीय, चाहते वारंवार करीत आहेत.  

सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, आम्ही या याचिकेवर सुनावणी घेणार नाही. ही याचिका आम्ही फेटाळून लावत आहोत. तपास सुरू असलेल्या ठिकाणी तुम्ही उच्च न्यायालयात याचिका दाखल करा. 

सीबीआयने दोन वेळा सुशांतच्या मृत्यूच्या वेळचा घटनाक्रम त्याच्या फ्लॅटमध्ये तयार करुन पुन्हा तपासला होता. त्यानंतर सीबीआयच्या पथकासमवेत अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) तीन न्यायवैद्यक तज्ञांनी मुंबईतील सुशांतच्या घराची तपासणी केली होती. या  पथकाने सुशांतचा फ्लॅट आणि इमारतीच्या छताची काही काळ तपासणी केली होती. या पथकाने सुशांतच्या मृत्यूची वेळ शवविच्छेदन अहवालात नसल्याबद्दल प्रश्नचिन्हही उपस्थित केले होते. 

सीबीआयकडे 'एम्स'च्या पथकाने अहवाल सादर केला होता. मुंबई पोलिसांनी दिलेला सुशांतचा शवविच्छेदन अहवाल आणि इतर पुराव्यांच्या आधारे तपासणी करुन 'एम्स'च्या पथकाने हा अहवाल तयार केला होता. सीबीआयने या अहवालाचा अभ्यास केला आहे. या प्रकरणातील इतर पुराव्यांच्या आधारे सीबीआय अंतिम निष्कर्षापर्यंत पोचणार आहे. 'एम्स'च्या अहवालात सुशांतवर विषप्रयोग झाला नसल्याची बाबही नमूद करण्यात आली होती. यामुळे सुशांतने आत्महत्या केली असून, त्याची हत्या झाली नसल्याचा निष्कर्ष सीबीआयने काढला आहे, अशी चर्चा सुरू होती. 

मात्र, सीबीआयने या प्रकरणी खुलासा करीत तपास सुरू असल्याचे म्हटले होते. सीबीआयने म्हटले होते की, सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास अजून सुरू आहे. सर्व पैलू काळजीपूर्वक तपासून पाहण्याचे काम सुरू आहे. सीबीआयने याबाबत अद्याप कोणताही अंतिम निष्कर्ष काढलेला नाही. 

सुशांत हा 14 जूनला मृतावस्थेत आढळला होता आणि साडेतीन महिन्यांनंतरही त्याच्या मृत्यूचे गूढ कायम होते. या प्रकरणी सुरूवातीला मुंबई पोलीस तपास करीत होते. मुंबई पोलिसांनी हा आत्महत्येचा प्रकार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, अभिनेत्री कंगना राणावत, भाजपचे खासदार सुब्रह्मण्यम स्वामी आणि राज्यातील भाजप नेत्यांनी सुशांतची हत्या झाल्याचा दावा केला होता. 

या प्रकरणात नंतर बिहार सरकारनेही उडी घेतली होती. बिहारमध्ये एफआयआर दाखल करुन तेथील पोलीस पथक तपासासाठी मुंबईत दाखल झाले होते. हा तपास सीबीआयकडे सोपवावा यासाठी विरोधी पक्ष भाजपने आणि बिहार सरकारने आक्रमक भूमिका घेतली होती. अखेर सर्वोच्च न्यायालयाने हा तपास सीबीआयकडे सोपवला होता. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com