चेन्नई : तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिला यांच्या निकटवर्ती व अण्णाद्रमुक पक्षाच्या नेत्या व्ही.के.शशिकला यांची 27 जानेवारीला कारागृहातून सुटका होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एडापड्डी के. पलानीस्वामी आणि उपमुख्यमंत्री ओ.पनीरसेल्वम यांच्यासमोर शशिकला या राजकीय संकट उभे करतील, असा अंदाज राजकीय विश्लेषक व्यक्त करीत आहेत. या पार्श्वभूमीवर द्रमुकचे प्रमुख एम.के.स्टॅलिन यांनी मोठे भाकित केले आहे.
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी शशिकला यांना चार वर्षे तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. त्या 15 फेब्रुवारी 2017 रोजी तुरुंग अधिकाऱ्यांसमोर शरण आल्या होत्या. त्या कर्नाटकातील पराप्पना अग्रहार कारागृहात आहेत. शशिकला यांची शिक्षेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर 27 जानेवारीला सुटका होईल, अशी शक्यता आहे. शशिकलांच्या सुटका होण्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरणात अस्वस्थता निर्माण झाली आहे. विशेषत: अण्णाद्रमुक पक्षात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे आहेत. यामुळे मुख्यमंत्री पलानीस्वामी आणि उपमुख्यमंत्री पनीरसेल्वम धास्तावले आहेत. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या गटांनी एकत्र येऊन शशिकलांच्या विरोधात रणनीती आखण्यास सुरवात केली आहे.
मुख्यमंत्री पलानीस्वामी यांच्या एडापड्डी मतदारसंघात द्रमुकचे प्रमुख स्टॅलिन यांनी आज शक्तिप्रदर्शन केले. या वेळी ते म्हणाले की, राज्यातील जनतेने जयललिता यांची मुख्यमंत्री म्हणून निवड केली होती. मात्र, एडापड्डी पलानीस्वामी यांना राज्यातील जनतेने नव्हे तर शशिकलांनी मुख्यमंत्री केले आहे. त्यांनी नंतर शशिकलांचा विश्वासघात केला आहे. यामुळे त्या कारागृहातून सुटल्यानंतर पलानीस्वामी यांचा 'गेम ओव्हर' होईल.
जयललिता यांच्या गूढ मृत्यूची योग्य चौकशी झाली नसल्याचा आरोप करीत स्टॅलिन म्हणाले की, ओ. पनीरसेल्वम यांनी बंडखोरी केली त्यावेळी त्यांनी जयललिता यांचा मृत्यू संशयास्पद असल्याचे म्हटले होते. मात्र, सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर त्यांनी ही भूमिका गुंडाळून ठेवली. आता अम्मा सरकार चालवत असलेले पलानीस्वामी जयललितांच्या मृत्यूच्या चौकशीसाठी मात्र, काही करीत नाहीत.
भाजप पुन्हा तमिळनाडूच्या राजकारणात सक्रिय भूमिका बजावण्याच्या तयारीत आहे. द्रमुकला नामोहरम करण्यासाठी भाजपकडून अण्णाद्रमुकला मदत केली जात आहे. अण्णाद्रमुकने पलानीस्वामी यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार जाहीर केले आहे. या प्रकरणी सुरवातीला आढेवेढे घेणाऱ्या भाजपने अखेर पलानीस्वामी यांच्या नावाला पसंती दिली आहे.
जयललिता यांच्या निधनानंतर शशिकला यांची अण्णाद्रमुकच्या विधिमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली होती. मात्र, त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याआधी पक्षातील सहकारी ओ. पनीरसेल्वम यांनी बंड केले होते. त्यानंतर शशिकला यांनी तुरुंगात जाण्याआधी के.पलानीस्वामी यांची विधिमंडळ नेतेपदी निवड केली होती. अखेर पलानीस्वामी मुख्यमंत्री बनले होते. मुख्यमंत्री झाल्यानंतर पलानीस्वामी यांनी शशिकला यांचे पुतणे टी.टी.व्ही. दिनकरन पक्षातून हाकलून पनीरसेल्वम यांना पुन्हा पक्षात घेतले होते. यानंतर दिनकरन यांनी अम्मा मक्कल मुनेत्र कळघम पक्षाची स्थापना केली होती. यामुळे शशिकलांच्या सुटकेनंतर राज्यात मोठी उलथापालथ होणार आहे.
Edited by Sanjay Jadhav
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.