गल्वानची जखम अजून ताजीच...गोळीबार न होताही 20 जवान झाले होते हुतात्मा

सिक्कीममध्ये भारत आणि चीनच्या सैन्यांत झटापट होऊन दोन्ही बाजूंकडील जवान जखमी झाले आहेत. या निमित्ताने गल्वान खोऱ्यातील संघर्षाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.
skirmish between india and china army in sikkim is similar to galwan valley clash
skirmish between india and china army in sikkim is similar to galwan valley clash

नवी दिल्ली : भारत आणि चीनच्या सैन्यांत सिक्कीमध्ये झटापट झाल्याची बाब समोर आली आहे. यात चार भारतीय जवान आणि २० चिनी सैनिक जखमी झाले आहेत. या घटनेने मागील वर्षी भारत आणि चीनच्या सैन्यात गल्वान खोऱ्यात झालेल्या संघर्षाच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत. त्यावेळी गल्वान खोऱ्यात गोळीबार न होताही भारताचे 20 जवान हुतात्मा झाले होते. 

आताची घटना उत्तर सिक्कीमच्या नाकु खिंडीत घडली आहे. भारताच्या जवानांनी चीनच्या सैनिकांना रोखल्यानंतर जोरदार हाणामारी झाली. सिक्कीमच्या नाकु खिंडीत झालेल्या या घटनेच भारताचे चार जवान आणि चीनचे २० सैनिक जखमी झाले आहेत. मागील आठवडयात चीनच्या सैनिकांनी भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला होता, मात्र, भारतीय सैनिकांनी त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला. परंतु सैन्याकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी सीमेवर तणावाची स्थिती कायम आहे. 

आताच्या घटनेने मागील वर्षातील गल्वान खोऱ्यातील संघर्षाला पुन्हा उजाळा मिळाला आहे. मागील वर्षी पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीनचे सैन्य पाच आठवड्यांहून अधिक काळ आमनेसामने आलेले आहेत. यातून तोडगा काढण्यासाठी दोन्ही देशांदरम्यान लष्करी अधिकान्यांमध्ये चर्चा सुरू आहे. या चर्चेत दोन्ही देशांनी सैन्य मागे घेण्याचा तोडगा निघाला होता. त्यानुसार 15 जून 2020 रोजी रात्री गल्वान खोऱ्यातून चीनचे सैन्य माघार घेत होते. त्यावेळी दोन्ही सैन्यांमध्ये जोरदार जुंपली आणि त्यातूनच दोन्ही बाजूचे सैनिक मारले गेले होते. 

गल्वान खोऱ्यात दोन्ही देशांचे हजारो सैनिक तैनात असून, ते वारंवार आमनेसामने येऊन संघर्ष झाला होता. दोन्ही बाजूच्या सैन्यांमध्ये मारामारीचे प्रकार घडले होते मात्र, गोळीबार झालेला नव्हता. भारत आणि चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेत ठरल्याप्रमाणचे 15 जून 2020 रोजी रात्री चीनचे सैन्य गल्वान खोऱ्यातून माघार घेण्याच्या तयारीत होते. त्यावेळी दोन्ही देशांतील सैन्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. याचे पर्यावसान भांडणात झाले. त्यावेळी दोन्ही बाजूंच्या सैन्याने दगड आणि काठ्यांचा वापर केला. दोन्ही देशांच्या सैन्यात तुंबळ धुमश्चकी झाली. अखेर मध्यरात्रीनंतर हे सर्व शांत झाले. यात भारताचे 20 अधिकारी व जवान हुतात्मा झाले तर चीनचेही काही सैनिक मारले गेले होते. महत्वाचे म्हणजे या सर्व भांडणात दोन्ही बाजूंनी गोळीबार झालेला नव्हता.

भारत आणि चीन सीमेवर सुमारे 45 वर्षांच्या कालावधीनंतर अशा प्रकारची घटना प्रथमच गल्वानमध्ये घडली आहे. चीनसोबत झालेल्या संघर्षात एवढ्या वर्षांनंतर प्रथमच भारताने अधिकारी आणि जवान गमावले होते. त्याआधी अरुणाचल प्रदेशमध्ये 1975 साली टुलुंग खिंडीत सीमेवर चीनसोबत झालेल्या संघर्षात चार भारतीय जवान हुतात्मा झाले होते. 

Edited by Sanjay Jadhav
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com