नवी दिल्ली : देशात कोरोना लशीचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी आधी भारतीयांना ही लस देण्याची भूमिका घेतली आहे. तसेच, भारतानेही कोरोना लशीच्या निर्यातीवर निर्बंध घातले आहेत. यामुळे जगातील अनेक देशांना लस मिळण्यास विलंब होत आहे. यावरुन अॅस्ट्राझेनेका कंपनीने सिरमला कायदेशीर नोटीस बजावली आहे. यावर अखेर अदर पूनावाला यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.
सिरम ही जगातील सर्वांत मोठी लस निर्यातदार कंपनी आहे. अॅस्ट्राझेनेका कंपनी आणि ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीने विकसित केलेल्या कोव्हिशिल्ड लशीचे उत्पादन सिरम करीत आहेत. अनेक देश कोरोना लशीसाठी सिरमवर अवलंबून आहेत. परंतु, देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी सिरमला लशीची निर्यात थांबवावी लागणार आहे. याचा फटका अनेक देशांतील कोरोना लसीकरणाला बसणार आहे. या लशीच्या निर्यातीसंदर्भात अनेक देशांशी करार झाले आहेत. आता अनेक देशांना ही लस मिळण्यास विलंब होत असल्याने अॅस्ट्राझेनेकाने सिरमला कायदेशीर नोटीस बजावली आहे.
यावर बोलताना अदर पूनावाला म्हणाले की, अॅस्ट्राझेनेकाच्या नोटिशीवर मी बोलू शकत नाही कारण ती गोपनीय आहे. परस्पर सामंजस्याने मार्ग काढण्याचे सर्व प्रयत्न आम्ही करीत आहोत. सिरमकडून प्राधान्याने भारतातील मागणीचा विचार होत आहे. यामुळे इतर देशांना लस मिळण्यास विलंह होत असून, आधी करण्यात आलेल्या करारांमुळे कायदेशीर बंधने येत आहेत. या प्रकरणी प्रत्येक जण सामंजस्याची भूमिका घेत असून, सरकारही यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करीत आहे.
देशभरात आता कोरोनाची दुसरी लाट आली आहे. कोरोना रुग्णसंख्या आणि मृत्यूचे आकडे विक्रमी पातळीवर गेली आहे. देशातील रुग्णसंख्या मागील 24 तासांत 1 लाख 15 हजारांवर गेली आहे. याचबरोबर कोरोनाने होणारे मृत्यूही वाढले आहेत. देशात लशीचा तुटवडा निर्माण झाला आहे. महाराष्ट्रात लशीच्या टंचाईमुळे अनेक लसीकरण केंद्रे बंद ठेवण्याची वेळ आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सर्वच प्रौढ नागरिकांना कोरोना लस द्यावी, अशी मागणी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे केली होती. यावर आरोग्य मंत्रालयाने लशीचा तुटवडा असल्याचे कारण देत गरज असेल त्यांनाच प्रथम लस देण्याची भूमिका घेतली आहे. वेळ आल्यानंतर सर्वांना लस देण्यात येईल, असेही म्हटले होते.
या पार्श्वभूमीवर बोलताना अदर पूनावाला म्हणाले आहेत की, भारतात कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे. यामुळे पुढील दोन महिने देशातील मागणी पूर्ण करण्यावर भर राहणार आहे. देशातील रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर दोन महिन्यांनी जूनमध्ये लशीची निर्यात सुरू करण्याचा विचार करण्यात येईल.
Edited by Sanjay Jadhav
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.