Maharashtra Politics : काँग्रेस नेते व माजी खासदार राहुल गांधी यांनी मोदी आडनावाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यामुळे त्यांनी संपूर्ण ओबीसी समाजाची माफी मागावी. तसेच परदेशात जाऊन भारताची बदनामी केल्याचा आरोप करीत गांधींनी देशाची माफी मागावी. भाजपची मागणी राहुल यांनी धुडकावली. तसेच 'मी सावरकर नाही. गांधी आहे. आणि गांधी कधी माफी मागत नाहीत', असे वारंवार वक्तव्य केले. हा सावरकरांचा आपमान आहे, असे म्हणत देशभरात भाजप आक्रमक झाली आहे. तर महाविकास आघाडीतील शिवसेनेने (ठाकरे गट) नाराजी व्यक्त केली.
मालेगावच्या जाहीर सभेतून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राहुल गांधींना थेट इशाराच दिला होता. ते म्हणाले, "स्वातंत्र्यवीर सावरकर आमचे दैवत आहे. देशासाठी त्यांनी ज्या यातना भोगल्या, त्या कुणीही भोगल्या नाहीत. यापुढे आम्ही सावरकरांचा आपमान सहन करणार नाही." तसेच खासदार संजय राऊत यांनीही गांधींना सावरकरांचा आपमान न करण्याचा सूचना केली होती.
दरम्यान, दिल्ली येथे काँग्रेसने विरोधकांच्या बैठकीचे आयोजन केले होते. त्या बैठकीवर ठाकरे गटातील खासदारांनी बहिष्कार टाकला होता. त्या बैठकीतच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी राहुल गांधी यांना आघाडी टिकविण्यासाठी सावरकर मुद्द्यावर काही सूचना केल्या आहेत. त्या राहुल (Rahul Gandhi) यांनीही ती मान्य केल्याची माहिती आहे.
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लीकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांच्या निवासस्थानी सर्व विरोधकांची बैठक पार पडली. त्यावेळी शरद पवार यांनी सावरकर यांच्यावरील राहुल यांची वक्तव्ये आणि महाविकास आघाडीवर बोलले. तसेच त्यांनी सावरकराबद्दल गांधी यांना माहिती देत त्यांच्यावरील वक्तव्य टाळण्याची सूचना केली.
यावेळी पवार यांनी वीर सावकर कोण होते, त्यांची भूमिका काय होती, यावर भाष्य केले. त्यांच्या राजकिय आणि समाजिक कार्याबद्दल राहुल यांना सांगितले. तसेच अशा वक्तव्यामुळे राज्यातील महाविकास आघाडीत वितुष्ट येण्याची कल्पनाही दिली. त्यास अनेक विरोधीपक्षातील खासदारांनी पाठिंबा दिला. त्यानंतर राहुल गांधी सावरकर विषयावरून 'बॅकफूट'वर आल्याची माहिती आहे.
यावर संजय राऊत म्हणाले की, "राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या सावरकरांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्यावर आम्ही टीका केली आहे. दरम्यान, विरोधकांच्या बैठकीत शरद पवार यांनी सावरकरांबाबत मते मांडली. त्यांच्या कार्यांबद्दल गांधींना माहिती दिली. तसेच या वक्तव्यामुळे आघाडीत वितुष्ट येण्याची कल्पनाही दिली. त्यास अनेक खासदारांनी पाठिंबा दिला. त्यानंतर भाजपविरोधात उभारलेल्या लढ्यातील सहभागी घटक पक्षात फूट नको, ही बाब राहुल गांधींच्याही लक्षात आली. त्यावर त्यांनी अशा वक्तव्यांमुळे घटक पक्ष नाराज होत असेल तर सावरकरांवरील टीका थांबवू. तसेच यापुढे असे वक्तव्य करणार नसल्याची भूमिका घेतली आहे."
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.