नवी दिल्ली : कोरोना लसीच्या दोन डोसमधील अंतर जेवढे जास्त असेल तेवढी ही लस अधिक परिणामकारक ठरेल, असा दावा सिरम इन्स्टिट्यूटने केला आहे. पहिल्या डोसनंतर चार आठवड्यांच्या कालावधीत दुसरा डोस घेतल्यास ही लस 70 ते 80 टक्के प्रभावी ठरते. पण हा कालावधी 6, 8 किंवा 10 आठवड्यांपर्यंत वाढत गेल्यास ती अधिक परिणामकारक ठरू शकते. तसेच लस घेतल्यानंतरही कोरोनाचा संसर्ग होईल, पण त्याचा कसलाही धोका नसेल, असे सिरमकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
सिरम इन्स्टिट्यूटकडून कोव्हिशिल्ड या कोरोना लशीचे उत्पादन केले जात आहे. ही लस ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेन्का कंपनीने विकसित केली आहे. कोरोना लशीच्या सुरक्षिततेविषयी वेगवेगळी चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सिरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी लसीची सुरक्षितता आणि परिणामकारकता समोर यावी, यासाठी स्वत: लस घेतली. याबाबतच
व्हिडिओही त्यांनी ट्विटरवर टाकला आहे.
इन्स्टिट्युटचे कार्यकारी संचालक सुरेश जाधव यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना लशीच्या परिणामकारकेतवर भाष्य केले आहे. दोन डोसमधील अंतर जेवढे वाढेल, तेवढी या लशीची परिणामकारकता अधिक असेल, असे त्यांनी म्हटले आहे. भारतामध्ये चार आठवड्याच्या अंतराने लशीचा दुसरा डोस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
जाधव म्हणाले की, दोन लसींमधील अंतर चार आठवड्यांचे असले तरी लशीची परिणामकारकता 70 ते 80 टक्क्यांपर्यंत जाते. पण हे अंतर वाढत गेल्यानंतर त्याचा परिणाम अधिक चांगला होऊ शकतो. भारतात तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचण्यांदरम्यान दोन डोसमध्ये 28 दिवसांचे अंतर होते. त्यामुळे तेच प्रमाण मानले जात आहे. लशीचा परिणाम अधिक काळापर्यंत राहण्यासाठी दुसरा डोस सहा किंवा आठ आठवड्यांनी घेणे, अधिक फायदेशीर ठरेल. यापूर्वी कोरोनाचा संसर्ग झालेल्या नागिरकांनीही लस घेणे आवश्यक असल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले.
Edited by Rajanand More
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.