सर्वोच्च न्यायालयात अर्णब गोस्वामींना 'स्पेशल ट्रीटमेंट'..?

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेवरुन गदारोळ सुरू आहे. त्यांनी या प्रकरणी आता थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
SCBA chief slams selective listing of Arnab Goswamis plea in supreme court
SCBA chief slams selective listing of Arnab Goswamis plea in supreme court

मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेच्या मुद्द्यावरुन मोठा गदारोळ सुरू आहे. गोस्वामी यांची 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे. गोस्वामी हे सध्या तळोजा तुरुंगात आहेत. गोस्वामी यांचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला होता. त्यावर गोस्वामी यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून, त्यावरील सुनावणी आता सुरू आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयात गोस्वामींना 'स्पेशल ट्रीटमेंट' दिली जात असल्यावरुन गदारोळ सुरू झाला आहे.   

गोस्वामी यांना वरळीतील निवासस्थानातून 4 नोव्हेंबरला अटक करुन अलिबाग जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने गोस्वामी यांची रवानगी 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत केली होती. न्यायालयीन कोठडीमुळे गोस्वामी यांना सध्या तळोजा कारागृहात ठेवण्यात आले आहे. 

गोस्वामी यांनी अटकेला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाने 9 नोव्हेंबरला गोस्वामी यांच्या जामीन अर्जावर निर्णय दिला. उच्च न्यायालयाने गोस्वामी यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. दरम्यान, गोस्वामी यांनी अलिबाग सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. यावर अलिबाग न्यायालयाला चार दिवसांत निर्णय देण्याचेही उच्च न्यायालयाने निर्देश दिले होते. 

याप्रकरणी गोस्वामी यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. आता गोस्वामी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून  'स्पेशल ट्रीटमेंट' दिली जात असल्यावरुन गदारोळ सुरू झाला आहे. या प्रकरणी सुप्रिम कोर्ट बार असोसिएशनच्या अध्यक्षांनी सर्वोच्च न्यायालयाच्या महासचिवांना पत्र लिहून निषेध नोंदवला आहे. गोस्वामी यांच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यात येत असल्याबद्दल त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. 

निवडक प्रकरणांची अशा प्रकारे सुनावणी घेण्याबाबत बार असोसिएशनने आक्षेप घेतला आहे. बार असोसिएशनचे अध्यक्ष दुष्यंत दवे म्हणाले की, हे पत्रकार सर्वोच्च न्यायालयात आल्यानंतर त्यांच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेतली जाते. याचवेळी हजारो नागरिक कैक आठवडे आणि महिने सुनावणी होत नसल्याने कारागृहात खितपत पडले आहेत. 

इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक व त्यांची आई कुमुद नाईक यांच्या २०१८ मध्ये झालेल्या मृत्युप्रकरणी रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना बुधवारी (ता.4) महाराष्ट्र पोलिसांनी अटक केली होती. इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक व त्यांच्या मातोश्री कुमुद नाईक हे दोघे २०१८ मध्ये अलिबाग येथे मृतावस्थेत सापडले होते. या दोघांनीही आत्महत्या केली होती. 

पोलिसांना त्यावेळी अन्वय यांनी लिहिलेली चिठ्ठी सापडली होती. अर्णब गोस्वामी व अन्य दोघांनी आपणास व्यवहाराचे ५ कोटी ४० लाख रुपये न दिल्याने आपण आर्थिक अडचणीत आलो असून, त्यामुळे आत्महत्या करावी लागत असल्याचे या चिठ्ठीत म्हटले होते. त्यावेळी पोलिसांनी अर्णब यांच्या विरोधात अन्वय व त्यांच्या आईला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला होता. ही फाईल नंतर बंद करण्यात आली. या वर्षीच्या मे महिन्यात अन्वय यांची कन्या अज्ञा नाईक हिने हा तपास नीट झाला नसल्याची तक्रार केल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणी चौकशीचा आदेश दिला होता. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com