चेन्नई : तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिला यांच्या निकटवर्ती व अण्णाद्रमुक पक्षाच्या नेत्या व्ही.के.शशिकला यांची शिक्षेचा कालावाधी पूर्ण होण्याआधी सुटका करण्यास कारागृह प्रशासनाने नकार दिला आहे. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी सध्या शशिकला या पराप्पना अग्रहार तुरुंगात आहेत. त्यांच्या शिक्षेचा कालावधी पुढील महिन्यात पूर्ण होत आहे. शशिकला यांच्या सुटकेनंतर तमिळनाडूत राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. त्यांची सुटका लांबणीवर पडल्याने राज्यातील राजकीय उलथापालथही लांबणीवर पडली आहे.
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी शशिकला यांना चार वर्षे तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. त्या 15 फेब्रुवारी 2017 रोजी तुरुंग अधिकाऱ्यांसमोर शरण आल्या होत्या. कारागृहातील चांगले वर्तन गृहित धरुन शिक्षेचा कालावधी संपण्याआधी सुटका करावी, अशी मागणी करणारा अर्ज त्यांनी कारागृह प्रशासनाकडे केला होता. कारागृह प्रशासनाने त्यांची ही मागणी फेटाळून लावली आहे. यामुळे शशिकला यांची लवकर सुटका होण्याची शक्यता मावळली आहे. शशिकला यांची आता पुढील महिन्यात शिक्षेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतरच सुटका होईल.
शशिकला यांनी केवळ एकदाच पॅरोल घेतला असून, तो 20 दिवसांपेक्षा कमी होता. त्यानंतर त्यांनी कोणतीही रजा घेतलेली नाही, त्यामुळे त्यांना शिक्षेतून सवलत मिळू शकते, अशी शक्यात आधी वर्तविण्यात आली होती. मात्र, त्यांची सुटका आता लांबवणीवर पडली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
भाजप पुन्हा तमिळनाडूच्या राजकारणात सक्रिय भूमिका बजावण्याच्या तयारीत आहे. द्रमुकला नामोहरम करण्यासाठी भाजपकडून अण्णाद्रमुकला मदत केली जात आहे. शशिकला या तुरुंगातून सुटल्यास तमिळनाडूतील राजकारणात फार मोठ्या उलथापालथी होण्याची शक्यता आहे. त्यांच्या राज्यातील राजकारणात सक्रिय होण्याने अनेक राजकीय समीकरणे बदलू शकतात. राज्यात 2021 मध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत.
जयललिता यांच्या निधनानंतर शशिकला यांची अण्णाद्रमुकच्या विधिमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली होती. मात्र, त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याआधी पक्षातील सहकारी ओ. पनीरसेल्वम यांनी बंड केले होते. त्यानंतर शशिकला यांनी तुरुंगात जाण्याआधी के.पलानीस्वामी यांची विधिमंडळ नेतेपदी निवड केली होती. अखेर पलानीस्वामी मुख्यमंत्री बनले होते. मुख्यमंत्री झाल्यानंतर पलानीस्वामी यांनी शशिकला यांचे पुतणे टी.टी.व्ही. दिनकरन पक्षातून हाकलून पनीरसेल्वम यांना पुन्हा पक्षात घेतले होते. यानंतर दिनकरन यांनी अम्मा मक्कल मुनेत्र कळघम पक्षाची स्थापना केली होती. यामुळे शशिकलांच्या सुटकेनंतर राज्यात मोठी उलथापालथ होणार आहे.
Edited by Sanjay Jadhav
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.