पाटणा : बिहारमध्ये भाजप आणि संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) सरकार सत्तेवर आहे. जेडीयूचे संख्याबळ कमी असूनही, नितीशकुमार हे मुख्यमंत्रिपदी आहेत. मागील काळात दोन्ही पक्षांतील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. यामुळे राज्यात मध्यावधी निवडणुका लागणे निश्चित असल्याचा दावा राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) नेते तेजस्वी यादव यांनी केला आहे.
बिहारमध्ये सत्तेत असलेल्या दोन्ही घटक पक्षांतील मतभेद दिवसेंदिवस वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर जेडीयूशी कोणतीही हातमिळवणी करण्यास तेजस्वी यादव यांनी नकार दिला आहे. बिहारमध्ये आरजेडी हा सर्वाधिक जागा मिळवून सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. भाजप आणि जेडीयूमध्ये सध्या कुरघोडीचे राजकारण सुरू आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवरुन भाजप नेते नितीशकुमारांना लक्ष्य करीत आहेत. कारण गृह खाते मुख्यमंत्र्यांकडेच आहे.
तेजस्वी यादव यांनी म्हटले आहे की, पुन्हा आम्ही नितीशकुमारांच्या सोबत जाण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. हे सरकार फार काळ टिकणार नाही. आपोआप हे सरकार कोलमडेल. आम्ही मध्यावधीसाठी तयार आहोत. मागील 16 वर्षांत बिहारचे फार मोठे नुकसान झाले आहे. हे सरकार राज्यासाठी शाप आहे. या सरकारने तरुणांना बेरोजगार बनवले आहे. जनादेशाची चोरी करुन हे सरकार सत्तेवर आले आहे.
भाजपशी बिनसल्याने नितीशकुमारांना आरजेडीकडून ऑफर देण्यात आल्याची चर्चा सुरू होती. यावर बोलताना तेजस्वी यादव म्हणाले की, आम्ही नितीशकुमारांना कोणतीही ऑफर दिलेली नाही. बिहारमधील जनादेश हा त्यांच्या विरोधात होता. त्यांना कोणतीही नीती, विचारधारा नाही. हे सरकार गरीब आणि कामगारांचे नाही. त्यांच्याशी आमचे कधीही जमणार नाही आणि तसा विचारही आम्ही करणार नाही.
अरुणाचल प्रदेशमध्ये जेडीयूच्या सात आमदारांना भाजपने फोडले होते. तेव्हापासून दोन्ही पक्षांत नाराजी सुरु होती. यावरुन जेडीयूच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत भाजपला थेट इशारा देण्यात आला होता.यानंतर बिहारमधील कायदा व सुव्यवस्था आणि भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून नितीश कुमार सरकारवर भाजपने टीका सुरू केली होती. आम्ही कोणाच्याही दारात निमंत्रण घेऊन उभे नव्हतो, असा टोलाही आर. सी. पी. सिंह यांनी भाजपला लगावला होता.
Edited by Sanjay Jadhav
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.