एकमेकांचे कट्टर विरोधक आले मोदींसमोर एकत्र...

जातीवर आधारित जनगणनेच्या मुदद्यावर बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आज थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली.
rivals nitish kumar and tejashwi yadav meet narendra modi
rivals nitish kumar and tejashwi yadav meet narendra modi

नवी दिल्ली : जातीवर आधारित जनगणनेच्या (Caste Census) मुदद्यावर बिहारचे (Bihar) मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitish Kumar) यांनी आज थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींची (Narendra Modi) भेट घेतली. त्यावेळी त्यांच्यासोबत कट्टर विरोधक व राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) नेते तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) हेसुद्धा उपस्थित होते. एकमेकांचे कट्टर विरोधक आज मोदींसमोर एकाच मुद्द्यावर एकत्र आल्याचे चित्र दिसले. 

नितीशकुमार यांच्यासोबत 10 पक्षांच्या शिष्टमंडळाने आज मोदींची भेट घेतली. या शिष्टमंडळात विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव, भाजपचे जनकराम, काँग्रेस नेत अजित शर्मा, हिंदुस्तानी आवाम मोर्चाचे अध्यक्ष जितनराम मांझी आणि डाव्या पक्षांचे प्रतिनिधींचा समावेश होता. या शिष्टमंडळाच्या मागणीवर योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन मोदींनी दिले आहे. आता बिहारमधील सत्ताधारी आणि विरोधी पक्षांना मोदींच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे. 

नितीशकुमार आणि तेजस्वी हे राज्यात विरोधात असले तरी या मुद्द्यावर ते एकत्र आले आहेत. तेजस्वी हे राज्य सरकारवर दररोज हल्लाबोल करीत असताना त्यांचे या मुद्द्यावर एकत्र येण्याचे वेगवेगळे अर्थ लावले जात आहेत. काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांनी नितीशकुमारांचे तोंडभरून कौतुक केले होते. यामुळे या दोघांच्या एकत्र येण्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले जात आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.   

जातीनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावर नितीश यांनी मोदींना पत्र लिहिले होते. या पत्राला अनेक दिवस मोदींनी उत्तर दिले नव्हते. यामुळे नितीश यांनी नुकतीच उघड नाराजी व्यक्त केली होती. ते म्हणाले होते की, पंतप्रधान मोदींनी मी लिहिलेल्या पत्रावर अद्याप त्यांचे उत्तर मिळालेले नाही. आम्हाला जातीवर आधारित जनगणना हवी आहे. ही आमची जुनीच मागणी आहे. अशा जनगणनेमुळे सर्व जातींची नेमकी लोकसंख्या समोर येईल. यानुसार मग सरकारला धोरणे आखता येतील. हे मी देशाच्या भल्यासाठीच सांगत आहे. 

पेगॅसस प्रकरणाची चौकशी आणि जातीवर आधारित जनगणना या दोन मागण्यांच्या आडून नितीशकुमार हे भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. याचवेळी बिहारमधील राजकीय समीकरणे आगामी काळात बदलण्याची चिन्हे समोर येऊ लागली आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीच्या काळात लोक जनशक्ती पक्षाचे संस्थापक रामविलास पासवान यांचे पुत्र चिराग यांनी नितीशकुमार यांना तुरूंगात पाठवण्याची धमकी दिली होती. आता मात्र ते नितीशकुमार यांच्या जवळ येऊ लागले आहेत. याचबरोबर तेजस्वी यादवही नितीशकुमारांच्या सुरात सूर मिसळू लागले आहेत. 

चिराग पासवान यांनीही जातीवर आधारित जनगणनेला पाठिंबा देणारी भूमिका घेतली आहे. या दोघांना एकत्र आणण्यामागे जातीवर आधारित जनगणना हे कारण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मी हनुमान आहे, असे जाहीरपणे सांगणारे चिराग पासवान आता भाजपपासून दुरावले आहेत. पासवान यांच्या लोक जनशक्ती  पक्षात फूट पडली आहे. त्यांचे काका खासदार पशुपतिकुमार पारस यांनी पक्षात फूट पाडली आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपने नितीशकुमार यांच्याविरोधात चिराग पासवान यांचा वापर करुन घेतला होता.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com