भाजपसमोर तिढा; शपथविधी झाला पण खातेवाटपावरून वाद वाढला

भाजपने महत्वाची खाती मागितल्याने हा तिढा वाढत चालला असल्याचे समजते.
Rift between AINRC and BJP widens over portfolio allocation in puducherry
Rift between AINRC and BJP widens over portfolio allocation in puducherry

पुदुच्चेरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या मंत्रिमंडळाचा मेगाविस्तार दोन दिवसांपूर्वी झाला. ज्या दिवशी शपथविधी झाला त्याच दिवशी खातेवाटपही जाहीर करण्यात आले. पण केंद्रशासित प्रदेश असलेल्या पुदुच्चेरीमध्ये (Puducherry) एनआर काँग्रेस (NR Congress) आणि भाजप (BJP) यांच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी दोन आठवड्यांपूर्वी होऊनही अद्याप खातेवाटप झालेले नाही. भाजपने महत्वाची खाती मागितल्याने हा तिढा वाढत चालला असल्याचे समजते. (Rift between AINRC and BJP widens over portfolio allocation in puducherry) 

मुख्यमंत्री एन. रंगास्वामी यांच्या एनआर काँग्रेसला तीन तर भाजपला दोन मंत्रिपदे मिळाली आहेत. खातेटवाटपावरुन एनआर काँग्रेस आणि भाजपमध्ये वाद निर्माण झाला आहे. मंत्रिमंडळाची संख्या लहान असल्याने एका-एका मंत्र्याकडे अनेक खात्यांच्या कार्यभार येणार आहे. महत्वाची खाती आपल्याकडे यावीत, यासाठी मंत्र्यांनी लॉबींग करण्यास सुरवात केली आहे. याचबरोबर गृह आणि अर्थ खात्यावरुन दोन्ही पक्षांमध्ये मतभेद आहेत. त्यामुळे खातेवाटपास थोडा विलंब लागत आहे. 

भाजपने सार्वजनिक बांधकाम, स्थानिक प्रशासन, पर्यटन, उत्पादन शुल्क यांसह दहा खाती मागितली आहे. त्यामध्ये महत्वाच्या गृह खात्याचाही समावेश असल्याचे सुत्रांनी सांगितले. महत्वाची खाती भाजपला दिल्यास तर एआयएनआरसीच्या तीन मंत्र्यांनी कमी महत्वाची खाती मिळतील. त्यावरून पक्षांतर्गत नाराजी वाढेल, अशी भीती नेत्यांनी व्यक्त केली आहे. भाजपला विधानसभेचे अध्यक्षपद दिल्याने आधीच नेते नाराज आहेत, असेही हा नेता म्हणाला.

या वादावरून माजी मुख्यमंत्री एन. नारायणसामी यांनी टीका केली आहे. ते म्हणाले, दोन्ही पक्षांचा एकमेकांवर विश्वास नाही. निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन दोन महिने उलटले तर अद्याप सरकार अस्तित्वात आलेले नाही. दोन्ही पक्ष मतदारांवर अन्याय करत आहेत, अशी टीका त्यांनी केली. 

दरम्यान, एनआर काँग्रेस आणि भाजप आघाडीला एप्रिलमध्ये झालेल्या निवडणुकीत विजय मिळाला होता. त्यानंतर 7 मे रोजी रंगास्वामी यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. तेव्हापासून मंत्रिमंडळाबाबत उत्सुकता होती. एनआर काँग्रेस आणि भाजपमध्ये मंत्रिपदांवरुन रस्सीखेच सुरू होती. अखेर एनआर काँग्रेसला 3 आणि भाजपला 2 मंत्रिपदे मिळाली आहे. 

एनआर काँग्रेसचे के.लक्ष्मीनारायण, सी.देजाकुमार आणि चंदिरा प्रियांगा यांचा मंत्र्यांमध्ये समावेश आहे. भाजपचे नमशिवायम आणि साई जे सर्वानन यांना मंत्रिपद मिळाले आहे. त्यांचा शपथविधी राजभवनात झाला. चंदिरा प्रियांगा या मागील 41 वर्षांतील पुदुच्चेरीमधील पहिल्या महिला मंत्री ठरल्या आहेत. भाजपने उपमुख्यमंत्रिपदाची मागणी लावून धरल्याने नवीन मंत्रिमंडळाची स्थापना रखडली होती. अखेर भाजपला विधानसभा अध्यक्षपद देण्यात आले. भाजपने विधानसभा अध्यक्षपदी आर.सेल्वम यांची निवड केली आहे. त्यानंतर अखेर मंत्रिमंडळाची स्थापना झाली. मुख्यमंत्री रंगास्वामी यांच्या मंत्रिमंडळात एकूण सहा मंत्री असून, यात एनआर काँग्रेसचे तीन आणि भाजपचे दोन मंत्री आहेत.     

पुदुच्चेरीतील एकूण 30 विधानसभा मतदारसंघांपैकी 16 जागांवर भाजप आघाडीने विजय मिळवला होता. यात एनआर काँग्रेसला 10 आणि भाजपला 6 जागा मिळाल्या होत्या.  द्रमुक आणि काँग्रेसला अनुक्रमे 6 आणि 2 जागा मिळाल्या होत्या. मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या जागा 15 होत्या. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बहुमत गेल्याने पुदुच्चेरीत काँग्रेसला सत्ता सोडावी लागली. त्यामुळे काँग्रेसच्या हातातून आणखी एक राज्य निसटले होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com