काँग्रेसमध्ये आनंदीआनंद...पुन्हा एकदा मिले सूर मेरा तुम्हारा!

राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरोधात सचिन पायलट यांनी पुकारलेले बंड अखेर शमले आहे. विधानसभा अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बंडखोर आमदार पुन्हा काँग्रेसच्या गोटात परतले आहेत.
rebel congress mlas returned to jaipur says minister pratap singh khachariyawas
rebel congress mlas returned to jaipur says minister pratap singh khachariyawas

जयपूर : राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरोधात सचिन पायलट यांनी बंड पुकारले होते. आता पायलट यांचे बंड शमले असून काँग्रेसमध्ये आनंदाचे वातावरण आहे. राज्यपालांनी 14 ऑगस्टला विधानसभा अधिवेशन बोलावले असल्याने राज्यातील राजकीय हालचाली पुन्हा वेगवान झाल्या आहेत. आता गेहलोत आणि पायलट यांच्या मनोमिलनाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 

पायलट यांनी ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांची 9 ऑगस्टला भेट घेतली होती. यानंतर 10 ऑगस्टला त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भेटीची वेळ मागितली होती. त्यांना तातडीने भेटीची वेळ देण्यात आली होती. राहुल गांधी यांच्या निवासस्थानी झालेल्या या भेटीत राहुल यांच्यासोबत प्रियांका गांधी याही होत्या. या दोन्ही नेत्यांनी पायलट यांच्याशी चर्चा केली. याचबरोबर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल आणि के.सी.वेणुगोपाल यांच्या संपर्कात पायलट कायम होते. पायलट यांनी आता मवाळ भूमिका घेतली आहे. ते पक्षात परत आले आहेत. 

पायलट यांचे समर्थक आमदार आता पुन्हा काँग्रेसच्या गोटात परतले आहेत. त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही, असे आश्वासन पक्षश्रेष्ठींनी पायलट यांना दिले आहे. मात्र, याचवेळी सरकारवरील विश्वासदर्शक ठरावावेळी गेहलोत यांच्या पारड्यात मत टाकण्याची अट पायलट यांच्यासह बंडखोर आमदारांना घालण्यात आली आहे. यामुळे काही बंडखोर आमदार हे गेहलोत यांना भेटले आहेत. त्यांनी गेहलोत सरकारला पाठिंबाही दर्शविला आहे. गेहलोत यांच्याविरोधात बंडाचे निशाण फडकावल्यानंतर पायलट हे हरियानात गेले होते. तब्बल महिन्यानंतर पुन्हा राजस्थानमध्ये ते दाखल झाले आहेत. जयपूरमधील निवासस्थानी समर्थकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. 

राज्यातील काँग्रेसमधील बंड अखेर शमल्याने पक्षात आनंदाचे वातावरण आहे. बंडखोर आमदारही आता परतले आहेत. काँग्रेसचे सर्व आमदार आता हॉटेल फेअरमाँट येथे ठेवण्यात आले आहेत. याबाबत बोलताना राजस्थानमधील मंत्री प्रतापसिंह कचारीयावास म्हणाले की, पक्षातून बाहेर गेलेले सर्व आमदार परतले आहेत. सर्व आमदार आता हॉटेल फेअरमाँट येथे आहे. विधानसभा अधिवेशन 14 ऑगस्टला होत असून, सर्व आमदार हॉटेलमधून थेट विधानसभेत जातील. आता बहुमत सिद्ध करण्यात आम्हाला कोणतीही अडचण नाही. 

पायलट हे राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री होते. त्यांनी मुख्यमंत्री गेहलोत यांच्याविरोधात बंड केल्याने काँग्रेसने त्यांची प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्रिपदावरुन 14 जुलैला उचलबांगडी केली होती. याचबरोबर विधानसभा अध्यक्षांनी पायलट आणि इतर १८ आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावली होती. 

Edited by Sanjay Jadhav
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com