जयपूर : राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरोधात सचिन पायलट यांनी बंड पुकारले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी विधानसभा अधिवेशन बोलावले आहे. यामुळे राज्यातील राजकीय हालचाली पुन्हा वेगवान झाल्या आहेत. आता बहुजन समाज पक्षाच्या (बसप) सहा आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
विधानसभा अधिवेशन १४ ऑगस्टपासून बोलावण्यास राज्यपालांनी मान्यता दिली आहे. याचबरोबर कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अधिवेशनादरम्यान सर्व उपाययोजना करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. आता विधानसभा अधिवेशन होणार असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. गेहलोत सरकारसाठी हे अधिवेशन कसोटीचे तर पायलट यांच्यासाठी अस्तित्वाचे ठरणार आहे. यामुळे गेहलोत हे फार खबरदारी घेत आहेत. त्यांनी आधी काँग्रेस आमदारांना जयपूरमधील हॉटेल फेअरमाँटमध्ये ठेवले होते. आता या आमदारांना जैसलमेरमधील सूर्यगड हॉटेलमध्ये हलविण्यात आले आहे.
राज्यात अशोक गेहलोत सरकार आले त्यावेळी बसपचा सहा आमदारांचा गट काँग्रेसमध्ये विलिन झाला होता. याला राजस्थानच्या उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. बसप आणि भाजप नेते मदन दिलावर यांनी या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. यावर उच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष आणि बसपच्या सहा आमदारांना नोटिसा बजावल्या आहेत. त्यांना पुढील सुनावणीआधी उत्तर देण्यासही उच्च न्यायालयाने सांगितले आहे.
हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी वर्ग करावे, अशी मागणी या आमदारांनी आज सर्वोच्च न्यायालयात केली. घटनेच्या दहाव्या परिशिष्टातील परिच्छेद चारच्या अन्वयार्थाशी निगडित अनेक प्रकरणे सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. त्यामुळे यात परस्परविरोधी निकाल लागण्याऐवजी सर्वोच्च न्यायालयानेच तातडीने निर्णय द्यावा, असे आमदारांनी म्हटले आहे.
राज्यातील सरकार पाडण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे, असा आरोप गेहलोत वारंवार करीत आहेत. या प्रकरणी त्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनाही पत्र लिहिले होते. तसेच, पंतप्रधान मोदींशी दूरध्वनीवरुन चर्चा करुन राज्यातील परिस्थिती त्यांच्या कानावर घातली होती. विधानसभा अधिवेशन जवळजवळ येत आहे तशा राज्यातील राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत.
पायलट हे राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री होते. त्यांनी मुख्यमंत्री गेहलोत यांच्याविरोधात बंड केल्याने काँग्रेसने त्यांची प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्रिपदावरुन 14 जुलैला उचलबांगडी केली होती. याचबरोबर विधानसभा अध्यक्षांनी पायलट आणि इतर १८ आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावली आहे. या नोटिशीला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. उच्च न्यायालयाने या प्रकरणी स्थगिती दिली आहे. याला विधानसभा अध्यक्ष सी.पी.जोशी यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. आता याला काँग्रेसचे मुख्य प्रतोद महेश जोशी यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
Edited by Sanjay Jadhav
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.