आंदोलन करण्यासाठी गाय आणून थेट पोलीस ठाण्यातच बांधली..!

हरियानातील भाजप सरकारच्या विरोधात शेतकरी आंदोलन करीत आहेत. या आंदोलनात गायही सहभागी झाली आहे.
protesting farmers bring cow to police stations in haryana
protesting farmers bring cow to police stations in haryana

नवी दिल्ली : हरियानात (Haryana) कृषी कायद्यांना विरोध करत सत्ताधारी आमदाराच्या (MLA) घराला घेराव घातल्याप्रकरणी दोन शेतकऱ्यांना (Farmers) पोलिसांनी अटक केली. यामुळे शेतकरी संघटनांना तोहाना सदर पोलीस ठाण्यासमोर (Police Station) आंदोलन सुरू केले आहे. परंतु, या आंदोलनात शेतकऱ्यांसोबत सहभागी झालेल्या गायीने (Cow) सर्वाधिक लक्ष वेधून घेतले. 

जननायक जनता पक्षाचे (जेजेपी) आमदार देवेंदरसिंह बबली यांच्या घराला 1 जूनला शेतकऱ्यांनी घेराव घातला होता. कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी हे आंदोलन होते. यानंतर शेतकरी आंदोलक विकास सिसर आणि रवि आझाद यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली होती. दरम्यान, आमदार बबली यांनी आम्हाला शिवीगाळ केली, असा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. 

यानंतर शेतकरी नेते राकेश टिकैत, गुरनामसिंह चाडुनी, योगेंद्र यादव यांनी फतेहाबाद जिल्ह्यातील तोहाना सदर पोलीस ठाण्यासमोर आंदोलन सुरू केले आहे. याचबरोबर आज राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांना घेराव घालण्याचा इशारा देण्यात आला होता. अखेर जिल्हा प्रशासनाने शेतकरी नेत्यांशी चर्चा केली आणि दोन्ही शेतकऱ्यांना सोडले. यानंतर राज्यभर पोलीस ठाण्यांना घेराव घालण्याचे आंदोलन मागे घेण्याची घोषणा करण्यात आली. 

या आंदोलनात शेतकऱ्यांसोबत सहभागी झालेल्या एका गायीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. शेतकऱ्यांना अटक केल्याची ती 41 वी साक्षीदार आहे, असा दावा शेतकऱ्यांनी केला. आता गाईचा चारा आणि पाण्याची जबाबदारी पोलिसांवर असेल, अशी भूमिकाही शेतकऱ्यांनी घेतली. पोलीस ठाण्याच्या आवारातच एका खांबाला ही गाई बांधण्यात आली आहे. तिच्यासमोर चारा आणि पाणीही ठेवण्यात आले आहे. 

विषयी बोलताना आंदोलन करणारे शेतकरी म्हणाले की, सध्याचे सरकार हे स्वत:ला गोपूजक अथवा गोप्रेमी सरकार मानते. गाई ही पवित्र आणि शुद्ध मानले जाते म्हणून आम्ही आंदोलनात तिला आणले आहे. तिच्या उपस्थितीमुळे तरी सरकारला काही सुबुद्धी सुचेल. 

तोहाना सदर पोलीस ठाण्यासमोरील आंदोलन शेतकऱ्यांनी कायम ठेवले आहे. याबद्दल राकेश टिकैत म्हणाले की, आणखी एक शेतकरी माखन सिंह हा पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याची सुटका करावी आणि त्याच्यावरील गुन्हा रद्द करावा, अशी आमची मागणी आहे. 

दरम्यान, काही दिवसांपूर्वी हिस्सार येथे शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर हे एका कार्यक्रमासाठी येणार असल्याने शेतकऱ्यांनी आंदोलन केले होतेय या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. यानंतर शेतकऱ्यांनी पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे शेतकऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची घोषणा सरकारने केली होती. आंदोलनात मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्याच्या मुलाला सरकारी नोकरीही देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com