नवी दिल्ली : कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या आंदोलनासाठी दिल्लीत येणाऱ्या शेतकऱ्यांनी सीमांवर रोखणे केंद्र सरकारला महागात पडले आहे. शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमांवरच ठाण मांडल्याने दिल्लीला वेढा पडल्याची स्थिती निर्माण झाली आहे. मागण्या मान्य न झाल्यास शेतकरी नेत्यांनी चार महिने दिल्लीच्या सीमांवर ठाण मांडण्याचे सूतोवाच केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना या प्रकरणी विरोधकांना जबाबदार धरले आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी शेतकऱ्यांना बुराडी मैदानावर आंदोलन करण्यास यावे, असे आवाहन आधी केले होते. शेतकरी बुराडी मैदानावर आंदोलन करण्यास आल्यानंतर केंद्र सरकार चर्चा करेल, अशी अटही घातली होती. त्यामुळे हे आवाहन शेतकरी नेत्यांनी फेटाळून लावले होते. शहा आणि केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्यात आज चर्चा झाली. या चर्चेनंतर अमित शहांनी बीकेयू एकता दाकोंडाचे अध्यक्ष बुटासिंग बुर्जगिल यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधून चर्चेचा प्रस्ताव ठेवला. मात्र, विनाशर्त चर्चेस यावे, असे शहांनी सांगितले. यावर शेतकरी नेत्यांनी चर्चेचे लेखी आमंत्रण आल्यानंतरच उद्या चर्चा करु, अशी भूमिका घेतली आहे.
सिंघू आणि टिकरी सीमेवर आंदोलनाचा शेतकऱ्यांच्या आज सलग पाचवा दिवस आहे. केंद्र सरकारने चर्चेसाठी कोणतीही अट घालू नये, अशी भूमिका शेतकरी नेत्यांनी घेतली आहे. राष्ट्रीय किसान महासंघ आणि भारतीय किसान युनियनच्या अनेक गटांनी दिल्ली चलो या आंदोलनाची हाक दिली आहे.
शेतकरी आंदोलनाविषयी बोलताना पंतप्रधान मोदींनी विरोधकांना जबाबदार धरले. ते म्हणाले की, हा तर आता नवीन ट्रेंड दिसू लागला आहे. आधी सरकारच्या निर्णयांना विरोध होत होता. आता अफवांच्या आधारे विरोधक चुकीची माहिती पसरवत आहेत. आमचा निर्णय योग्य असूनही, खोटा प्रचार केला जात आहे. नवे कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी आणण्यात आले आहेत. आगामी काळात या कायद्यांमुळे होणारे फायदे सर्वांनाच दिसतील.
भविष्यात शेतकऱ्यांच्या हिताला धक्का बसेल, अशी भीती दाखवून विरोधकांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल सुरू आहे. सरकारने शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी नवे कृषी कायदे आणले आहेत. हे कायदे शेतकऱ्यांना धोका देण्यासाठी आणलेले नसून, त्यांच्या हेतू या गंगाजलाप्रमाणे पवित्र आहे. स्वामिनाथन आयोगाच्या म्हणण्याप्रमाणे शेतकऱ्यांनी दीडपट हमी भाव देण्याचे आश्वासन आम्ही पूर्ण केले आहे. हे आश्वासन केवळ कागदावर पूर्ण केले नसून, प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसा जमा झाला आहे, असे मोदींनी स्पष्ट केले.
दिल्लीत आंदोलनासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना सीमेवर अडवून त्यांच्यावर बळाचा वापर करणारे हरियाना आणि दिल्लीतील पोलीस टीकेची धनी बनले आहेत. भाजप सरकारकडून शेतकऱ्यांवर लाठीमार करण्यासोबत अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. यात अनेक शेतकरी जखमी झाले आहेत. शेतकऱ्यांवर पोलिसांकडून खुनाच्या प्रयत्नासह दंगल आणि कोरोनाविषयक नियमांच्या भंगाचे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत.
पोलिसांना शेतकऱ्यांना रोखण्यासाठी महामार्गांवर काटेरी तार कुंपणासोबत सिमेंटचे मोठे ब्लॉक्स अडथळे म्हणून लावले आहेत. काही ठिकाणी तर शेतकऱ्यांना रोखण्यासाठी रस्तेही जेसीबीने उखडण्यात आले आहेत. शेतकऱ्यांनी दिल्ली पोलिसांनी अखेर दिल्लीतील बुराडी मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी दिली होती. बुराडी मैदानावर शेतकऱ्यांनी आंदोलन करण्यास नकार दिला आहे. मोठ्या प्रमाणात शेतकरी दिल्लीच्या सीमांवर थाबंले आहेत. सिंघू आणि टिकरी सीमांवर हजारो शेतकरी थांबले आहेत. या शेतकऱ्यांनी दिल्लीचे पाचही प्रवेश मार्ग अडवून आता दिल्लीला वेढा घातला आहे.
याबाबत बोलताना भारतीय किसान युनियन क्रांतिकारीचे (पंजाब) अध्यक्ष सुरजित एस. फूल म्हणाले होते की, आम्ही बुराडीच्या खुल्या कारागृहात जाण्याऐवजी दिल्लीला वेढा घातला आहे. दिल्लीत प्रवेश करण्याचे पाचही मार्ग आम्ही अडवले आहेत. आमच्याकडे चार महिने पुरेल एवढा शिधा असल्याने आम्हाला कोणतीही काळजी नाही. आमची समिती आता यापुढील आंदोलनाची दिशा ठरवेल.
Edited by Sanjay Jadhav
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.