कृषी विधेयकांच्या मंजुरीनंतर पंतप्रधान मोदींचा हमी भावाबाबत मोठा खुलासा

कृषी विधेयकांवरुन देशभरात वातावरण पेटले असताना मोदी सरकारने अखेर ती मंजूर करण्यात यश मिळविले आहे. या विधेयकांवरुन राज्यसभेत रणकंदन माजले होते.
prime minister narendra modi clarifies about msp after passage of agriculture bills
prime minister narendra modi clarifies about msp after passage of agriculture bills

नवी दिल्ली : देशभरात कृषी विधयेकांवरुन वातावरण तापले आहे. मोदी सरकारने ही विधेयके संमत करण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. ही बहुचर्चित दोन कृषी विधेयके आज राज्यसभेत मांडण्यात आली. विरोधकांनी घातलेल्या अभूतपूर्व गोंधळातच सरकारने आवाजी मतदानाने ही दोन्ही विधेयके मंजूर केली. या विधेयकांना मंजुरी मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अखेर शेतकरी मुक्त झाल्याचे म्हटले आहे. याचबरोबर हमीभावाबाबतही त्यांनी मोठा खुलासा केला आहे. 

कृषि उत्पादन व्यापार आणि वाणिज्य (संवर्धन व सुविधा) विधेयक 2020, शेतकऱ्यांना मूल्य आश्वासन (सुरक्षा) करार  व कृषि सेवा विधेयक 2020 ही विधेयके लोकसभेत मंजूर झाली होती. आज त्यावर राज्यसभेची मोहोर उमटली. या वेळी विरोधी पक्षांच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत गोंधळ केला. सभापतींसमोरील हौद्यात जाऊन सदस्यांनी विधेयकाविरोधात घोषणा दिल्या. अखेर या गोंधळातच आवाजी मतदानाने ही विधेयके मंजूर करुन घेण्यात सरकारला यश आले. राज्यसभेचे कामकाज उद्या सकाळी 9 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे.  

कृषी विधेयकांना विरोध करीत विरोधकांनी उपसभापतींसमोरील हौद्यात आणि सभागृहात ठाण मांडले होते. कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी विधेयकांवर उत्तर देण्यास सुरूवात केल्यानंतर गोंधळ आणखी वाढला. कृषी मंत्र्यांचे उत्तर गोंधळामुळे सदस्यांना ऐकायला जात नव्हते. अखेर काही मिनिटांतच त्यांनी उत्तर संपल्याचे जाहीर केले. 

यामुळे विरोधी सदस्यांनी उपसभापती हरिवंशसिंह यांचा माईक हिसकावण्याचा प्रयत्न केला. याचवेळी काही सदस्यांनी उपसभापतींना हौद्यातून रूलबुकही दाखविले. विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद यांनी राज्यसभेचे कामकाज एक दिवसासाठी तहकूब करावे, अशी मागणी केली. मात्र, उपसभापतींनी कृषी विधेयकांवर आवाजी मतदान घेतले. या वेळी विरोधकांची घोषणाबाजीही वाढली. अखेर या गोंधळातच आवाजी मतदानाने ही विधेयके मंजूर करण्यात आली. या वेळी विरोधी पक्षांतील अनेक सदस्य आणि भाजपचे सदस्यांमध्ये जुंपल्याचे चित्रही आज पाहायला मिळाले.  

या विधेयकांवरुन मोदींना सुरुवातीपासून आक्रमक भूमिका घेतली होती. या विधेयकांसाठी ते स्वत: मैदानात उतरुन विरोधकांवर हल्लाबोल करीत होते. कृषी विधेयकांना विरोध होत असला तरी ती संसदेत मंजूर करण्यावर पंतप्रधान  मोदी ठाम होते. हरसिमरत कौर बादल यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी 12 तासाच्या आत मंजूर केल्याने मोदी सरकार या मुद्द्यावर अकाली दलासह इतर कोणत्या विरोधाला जुमानणार नाही हे अधोरेखित झाले होते. 

विधेयकांना मंजुरी मिळाल्यानंतर मोदी यांनी म्हटले आहे की, दशकानुदशके भारतीय शेतकरी अनेक बंधने आणि मध्यस्थांच्या कचाट्यात अडकला होता. संसदेने ही विधेयके मंजूर करुन शेतकऱ्यांना अशा बंधनातून मुक्त केले आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्याच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी ही विधेयके महत्वाची ठरतील. 

याचबरोबर हमी भावाबाबत मोदी म्हणाले की, मी आधीही सांगितले होते आणि आता पुन्हा सांगतो की हमी भाव कायम राहील. याचबरोबर  सरकारी खरेदी कायम राहील. आम्ही येथे आमच्या शेतकऱ्यांच्या सेवेसाठी आहोत. अन्नदात्याला सर्वप्रकारे मदत करण्याच्या आमचा प्रयत्न आहे. त्यांच्या पुढील पिढीचे जीवन आम्हाला चांगले बनवायचे आहे.  

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com