बास, मी आता रिटायरमेंट घेतोय; बंगालमधील विजयानंतर प्रशांत किशोर यांची मोठी घोषणा

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी तृणमूल काँग्रेस पुन्हा एकदा बहुमतासह सत्ता स्थापन करण्याची चिन्हे आहेत.
prashant kishor will be quit as election strategist after bengal election
prashant kishor will be quit as election strategist after bengal election

कोलकता : पश्चिम बंगालमध्ये सत्ता स्थापनेचे भाजप स्वप्न भंगण्याची चित्र सध्या तरी दिसत आहे. राज्यातील एकूण 292 विधानसभा मतदारसंघांपैकी तब्बल 206 मतदारसंघात सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने आघाडी घेतली आहे. तसेच, नंदिग्राममध्ये पिछाडीवर असलेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या आता आघाडीवर गेल्या आहेत. यातच ममतांचे रणनीतीकार असलेले प्रशांत किशोर यांनी आता निवृत्ती जाहीर केली आहे. 

बंगालमधील लक्षवेधी कामगिरीच्या पार्श्वभूमीवर बोलताना एका वृत्तवाहिनीशी बोलताना प्रशांत किशोर म्हणाले की, मला आता हे काम करायचे नाही. मी खूप काम केले आहे. आता मी विश्रांती घेण्याची वेळ आली आहे. पुढील आयुष्यात मी आता वेगळे काही तरी करेन. मी राजकारणात जाणार नाही. कारण मी एक अपयशी राजकाऱणी आहे. पुढे काय करायचे यावर मी विचार करतोय. 

बंगालमधील तृणमूलच्या विजयावर किशोर म्हणाले की, निकालावरुन ही निवडणूक एकतर्फी झाल्याचे दिसत असले तरी ही खूप कठीण लढाई होती. निवडणूक आयोगाने आमच्या प्रचारावर अनेक बंधने आणली होती. परंतु, आम्ही ठाम होतो आणि चांगली कामगिरी केली आहे. भाजप केवळ प्रचारतंत्राच्या जोरावर बंगाल जिंकण्याचा प्रयत्न करीत होता. मोदी हे लोकप्रिय आहेत याचा अर्थ ते प्रत्येक निवडणूक जिंकतील असे नाही. 

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस 206, भाजप 83, डावे 1 असे चित्र आहे. राज्यात बहुमताचा आकडा पार करुन मोठ्या बहुमतासह पुन्हा एकदा ममता बॅनर्जी या सत्तास्थापन करतील, असे चित्र दिसत आहे. बंगालमध्ये भाजपचा हिंदुत्ववाद विरुद्ध ममतांची बंगाली अस्मिता अशी लढाई होती. 

भाजप प्रचंड ताकदीने या निवडणुकीत उतरला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपचे प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांच्यासह अनेकांनी प्रचारासाठी सर्व शक्ती पणाला लावली होती. मोदींच्या सभा, शहांचे रोड शो यामुळे भाजपची हवा तयार करण्यात यश आले होते. परंतु, निकाल पाहता राज्यातील जनतेने भाजपला नाकारल्याचे दिसत आहे. 

एक्झिट पोलपेक्षाही मततांची कामगिरी सरस 
एक्झिट पोलमध्ये पश्चिम बंगालमध्ये भाजपला मोठा धक्का बसण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. भाजपने प्रतिष्ठेच्या केलेल्या पश्चिम बंगालच्या लढतीत सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या गड राखण्यात यशस्वी ठरतील, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, तृणमूलला 149 जागा मिळवून ममता बॅनर्जी सत्ता ताब्यात ठेवतील. याचवेळी भाजपच्या जागांमध्ये मोठी वाढ होऊन पक्षाला 116 जागा मिळतील. काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या आघाडीला 16 जागा मिळतील. 

निवडणूक आयोगाकडून चारे राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील निवडणुका घेण्यात आल्या. यात पश्चिम बंगाल, तमिळनाडू, आसाम, केरळ ही चार राज्ये आणि पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशातील विधानसभेच्या निवडणुका 27 मार्च ते 29 एप्रिल कालावधीत झाल्या आहेत. या पाच राज्यांपैकी सध्या केवळ आसाममध्येच भाजपची सत्ता आहे. पुदुच्चेरीमध्ये सरकार कोसळल्यानंतर आता काँग्रेसची पाचपैकी एकाही राज्यात सत्ता नाही. आसाममधील सत्ता टिकविण्यासह अन्य राज्यांत सत्तेत येण्यासाठी भाजपने जोर लावला  होता. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com