नवी दिल्ली : निवडणूक आयोगाकडून चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. पश्चिम बंगाल, तमिळनाडू, आसाम, केरळ या राज्यांसह आणि पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशात विधानसभेच्या निवडणुका 27 मार्च ते 29 एप्रिल या कालावधीत होणार आहेत. आता बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचे रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी मोठा दावा केला आहे.
पश्चिम बंगालमध्ये सध्या तृणमूल काँग्रेस सत्तेत असून, ममता बॅनर्जी या मुख्यमंत्री आहेत. 2016 मध्ये झालेल्या निवडणुकीत तृणमूलला 294 पैकी 211 जागा मिळाल्या होत्या तर, डावे पक्ष व काँग्रेसचे 76 उमेदवार निवडून आले होते. भाजपला केवळ 3 जागा मिळाल्या होत्या. मात्र, यावेळी भाजपने सत्तापालट करण्यासाठी जोर लावला आहे. मागील लोकसभा निवडणुकीत भाजपने 42 पैकी 28 जागा जिंकल्याने त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. सध्या तृणमूल विरुध्द भाजप असेच चित्र दिसत आहे. तर डावे पक्ष व काँग्रेसची आघाडी या निवडणुकीतही कायम राहणार आहे.
प्रशांत किशोर हे विधानसभा निवडणुकीसाठी ममतांचे रणनीतीकार आहेत. त्यांनी एक ट्विट केले आहे. यात म्हटले आहे की, देशात बंगालमध्ये लोकशाही वाचवण्याची सर्वांत मोठी लढाई लढली जात आहे. बंगालमधील जनता संदेश देण्यासाठी तयार असून, तिने राईट (योग्य) कार्ड दाखवण्याचा निर्धार केला आहे. बंगालला फक्त आपली मुलगी हवी आहे. ता.क. 2 मे रोजी मला तुम्ही माझ्या या ट्विटची आठवण करु द्या.
राज्यातील निवडणुका आठ टप्प्यांत घेण्याबद्दल ममतांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्या म्हणाल्या की, भाजपची निवडणूक प्रचार मोहीम डोळ्यासमोर ठेवून निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सूचनेनुसारच हे घडले असावे, असा माझा संशय आहे. निवडणूक आयोगाने राज्याकडे भगव्या नजरेतून पाहू नये. मी निवडणूक आयोगाचा आदर करते. पंरतु, माझे काही प्रश्न आहेत. इतर राज्यांत एकाच टप्प्यात निवडणूक होत असताना बंगालमध्ये एवढ्या टप्प्यात निवडणूक का? निवडणूक आयोगच जर न्याय देऊ शकत नसेल तर लोकांनी जायचं कुठे? निवडणूक आयुक्तांनी बंगालकडे त्यांचे स्वत:चे राज्य म्हणून पाहावे.
निवडणूक आयोगाने आमचा बालेकिल्ला असलेल्या दक्षिण 24 परगणा आणि उत्तर 24 परगण्याचे तीन भाग केले आहेत. असे कधीही घडले नव्हते. या सर्व खेळी केंद्र सरकारने खेळल्या तरी शेवटी विजय हा आमचाच होणार आहे. माझ्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपला हव्या त्या तारखेला निवडणुका घेतल्या जात आहेत. नरेंद्र मोदी आणि अमित शहांच्या सूचनेनुसार हे होत आहे का? राज्यांच्या निवडणुकांत ते अशा प्रकारे सत्तेचा गैरवापर करु शकत नाहीत. निवडणूक आयोगाने सत्ता आणि पैशाचा निवडणुकीत वापर रोखावा, असे ममतांनी म्हटले आहे.
बंगाल विधानसभा निवडणूक कार्यक्रम :
मतदान : पहिला टप्पा 27 मार्च, दुसरा टप्पा 1 एप्रिल, तिसरा टप्पा 6 एप्रिल, चौथा टप्पा 10 एप्रिल, पाचवा टप्पा 17 एप्रिल, सहावा टप्पा 22 एप्रिल, सातवा टप्पा 26 एप्रिल, आठवा टप्पा 29 एप्रिल
मतमोजणी : 2 मे
Edited by Sanjay Jadhav
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.