नवी दिल्ली : देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढला आहे. आज सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासांत सुमारे 3 लाख नवीन रुग्ण सापडले असून, 2 हजार 23 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोनाचे संकट दिवसेंदिवस बिकट होत असून, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच जबाबदार आहेत, अशी टीका निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी केला आहे. यासाठी त्यांना चार मुद्दे मांडले आहेत.
पंतप्रधान मोदींनी कालच (ता.20) कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर देशाला संबोधून भाषण केले होते. यानंतर प्रशांत किशोर यांनी मोदींचे अपयश आज मांडले आहे. दूरदृष्टीचा अभाव आणि कोरोना संकटाची पुरेशी समज मोदींकडे नव्हती, असे किशोर यांनी म्हटले आहे. कोरोना महामारीवर आपण विजय मिळवला असे सांगून त्यांनी लोकांची दिशाभूल केली, असा आरोपही त्यांनी केला आहे.
प्रशांत किशोर यांनी मोदी सरकारच्या कोरोना संकटाच्या हाताळणीतील अपयशाचे मांडलेले मुद्दे :
1. पुरेशी जाण आणि दूरदृष्टी नसल्याने समस्येकडे दुर्लक्ष
2. अचानक नियंत्रण आपली हाती घेणे आणि आपण विजय मिळवल्याचा दावा करणे
3. समस्या कायम राहिल्यास त्याचे खापर दुसऱ्यांवर फोडणे
4. परिस्थिती सुधारल्यास श्रेय घेण्यासाठी भक्तांसह परत मैदानात उतरणे
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. राज्यात सत्ताधारी तृणमूल काँग्रेस विरुद्ध भाजप असा सामना रंगला आहे. तृणमूलकडून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या एकहाती किल्ला लढवत आहेत. भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळ मैदानात उतरले आहे. विशेष म्हणजे प्रशांत किशोर हे ममतांचे रणनीतीकार आहेत.
देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता 1 कोटी 56 लाख 16 हजार 130 झाली असून, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 1 लाख 82 हजार 553 झाली आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. आज सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासांत कोरोनाचे नवीन 2 लाख 95 हजार रुग्ण सापडले. यामुळे देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 21 लाखांवर गेली आहे. देशातील कोरोनाची रुग्णसंख्या सलग 42 व्या दिवशी वाजढली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 21 लाख 57 हजार 538 असून, एकूण बाधितांमध्ये याचे प्रमाण 13.82 टक्के आहे. याचवेळी बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी होऊन ते 85.01 टक्क्यावर आले आहे.
देशात बरे झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या 1 कोटी 32 लाख 76 हजार 39 आहे. याचवेळी मृत्यूदर 1.17 टक्के आहे. देशातील कोरोना रुग्णांची संख्या 7 ऑगस्ट 20 लाख, 23 ऑगस्ट 20 लाख, 5 सप्टेंबर 40 लाख, 16 सप्टेंबर 50 लाख अशी वाढत गेली. त्यानंतर 28 सप्टेंबर 60 लाखस 11 ऑक्टोबर 70 लाख, 29 ऑक्टोबर 80 लाख, 20 नोव्हेंबर 90 लाख आणि 19 डिसेंबर 1 कोटी अशी वाढत गेली. देशातील कोरोना रुग्णसंख्या 19 एप्रिलला दीड कोटींवर गेली.
Edited by Sanjay Jadhav
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.