मास्क घातला नाही म्हणून पोलिसांनी महिलेला मुलीसमोरच भरबाजारात केली बेदम मारहाण

देशातील कोरोना संसर्गाची दुसरी लाट आली आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी देशभरात कडक निर्बंध लादण्यात आले आहेत.
police thrash woman for not wearing mask in madhya pradesh
police thrash woman for not wearing mask in madhya pradesh

भोपाळ : देशातील कोरोना (Covid19) संसर्गाची दुसरी लाट आली आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी देशभरात कडक निर्बंध (Lockdown) लादण्यात आले आहेत. नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडण्यास मनाई असून, मास्क (Mask) घालणे बंधनकारक आहे. परंतु, भाजी खरेदीसाठी गेलेल्या महिलेला केवळ मास्क घातला नाही म्हणून भरबाजारात पोलिसांनी (Police) मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे या महिलेची मुलगीही त्यावेळी तिच्यासमवेत होती. 

ही घटना मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात जिल्ह्यातील राहली येथे घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. संबंधित महिला मुलीसमवेत भाजी खरेदी करण्यासाठी गेली होती. त्यावेळी तिने मास्क घातला नव्हता. यामुळे पोलिसांनी तिला बेदम मारहाण केली. तिच्या मुलीने पोलिसांनी अनेक वेळा विनवणी करुनही पोलिसांनी मारहाण सुरू ठेवली. या घटनेमुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागली आहे. 

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये काही महिला पोलिसासह काही पुरुष पोलीस कर्मचारी एका महिलेला मारहाण करताना दिसत आहेत. ते तिला जमिनीवर खाली पाडून केसाला पकडून तिला फरफटत ओढून नेतानाही दिसत आहेत. तिला पोलीस जीपमध्ये बसवण्याचा प्रयत्न करीत असताना ती विरोध करीत आहे आणि पोलीस तिला मारहाण करीत आहेत. 

पोलीस म्हणतात, आमची चूक नाहीच
पोलिसांनी मात्र, या प्रकरणात आपली चूक नसल्याची भूमिका घेतली आहे. पोलिसांनी म्हटले आहे की, संबंधित महिलेने मास्क न घातल्याने आम्ही तिला अडवले. तिला खुल्या कारागृहात शिक्षा देण्यासाठी आम्ही नेत असतानी तिने विरोध केला. तसेच, आमच्या एका महिला पोलिसाला मारहाण केली. 

राहलीचे उपविभागीय अधिकारी कमलसिंह म्हणाले की, व्हिडीओमध्ये केवळ अर्धाच भाग आहे. त्या महिलेने सुरवातीला महिला पोलिसाला मारहाण केली. संबंधित महिला पोलिसाच्या तोंडावर जखमा झाल्या आहेत. 

देशात 24 तासांत 3 हजार 874 मृत्यू 
देशात आज सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासांत 2 लाख 76 हजार 110 नवीन रुग्ण सापडले असून, 3 हजार 874 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता 2 कोटी 57 लाख 72 हजार 440 झाली असून, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 2 लाख 87 हजार 122 झाली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. रुग्णसंख्या कमी होत असून 21 एप्रिलनंतर प्रथमच 17 मेपासून रोजची रुग्णसंख्या 3 लाखांच्या खाली आली आहे. तरीही मृत्यूचा आकडा वाढत असून, याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. 

Edited by Sanjay Jadhav
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com