Rama Navami News: राज्यासह देशभरात ठिकठिकाणी रामनवमी उत्साहात साजरी करण्यात आली. मात्र, काही ठिकाणी या रामनवमी उत्सवाला गालबोट लागलं आहे. छत्रपती संभाजीनगरनंतर पश्चिम बंगालमधील हावडा येथेही रामनवमीनिमित्त काढलेल्या मिरवणुकीत दोन गटात वाद निर्माण झाल्यानंतर दगडफेक व जाळपोळीची खळबळजनक घटना घडली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये दिवशी किराडपुरा रामनवमीच्या आदल्या दिवशी दोन गटांत बाचाबाची झाली. त्याचं रुपांतर तुफान राड्यात झालं. यानंतर वाद विकोपाला गेला आणि हाणामारी, दगडफेकीसह पोलिसांच्या आणि खासगी मिळून अशा एकूण 13 गाड्या जाळण्यात आल्या आहेत. यामुळे शहरात तणावाचं वातावरण होतं.
याचदरम्यान, पश्चिम बंगालमधील हावडा येथे रामनवमी (Rama Navami) निमित्त शोभायात्रा काढण्यात आली होती. मिरवणुकीत दोन गटात वाद निर्माण झाल्यानंतर दगडफेक व जाळपोळ झाल्याचे वृत्त आहे. यामध्ये समाजकंटकांनी अनेक वाहने पेटवून दिली आहेत. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे. या हिंसाचारात अनेक लोक जखमी झाल्याचं समोर आलं आहे. हिंसाचार व जाळपोळीच्या घटनेची माहिती मिळताच परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी काय म्हणाल्या होत्या?
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी(Mamata Banerjee) यांनी रामनवमी सण शांततेत साजरा करण्याचं आणि मिरवणूक काढताना कोणत्याही प्रकारचा हिंसाचार होणार नाही याची काळजी घेण्याचं आवाहन केलं होतं. रामनवमीची मिरवणूक शांततेत काढा. सध्या रमजान सुरू असल्याने मुस्लिम भागातून मिरवणूक काढणं टाळा. रामनवमी शांततेने साजरी करा, हिंसाचार घडवण्याचा प्रयत्न करू नका. चिथावणी देऊ नका असंही बॅनर्जी म्हणाल्या होत्या.
गुजरातमध्ये मिरवणुकीवर दगडफेक...
रामनवमीनिमित्त काढलेल्या मिरवणुकीत दगडफेक झाल्याची घटना गुजरातमधील वडोदरा शहरात घडली होती. फतेपुरा गराना पोलिस चौकीजवळ अचानक शोभायात्रेवर दगडफेक सुरु झाली. त्यानंतर दोन्ही गट एकमेकांवर दगड फेकू लागले. घटनास्थळी पोलीस पोहोचल्याने पुढील अनर्थ टळला.
पोलीस सीसीटीव्ही फुटेजवरुन आरोपींचा शोध घेत आहेत. सध्या घटनास्थळी मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात आहे. डीसीपी यशपाल जागानिया यांनी सांगितलं की, रामनवमी शोभायात्रेदरम्यान एका मशिदीसमोर परिस्थिती बिघडली होती. परंतु सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती समोर येत आहे.
मध्य प्रदेशात राम मंदिरात दुर्घटना...
मध्य प्रदेशातील इंदूर(Indore) मधील पटेल नगर भागात गुरुवारी रामनवमीच्या उत्सवादरम्यान मंदिराचा काही भाग कोसळल्याने 13 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. पटेल नगरमध्ये श्री बेलेश्वर महादेव झुलेलाल मंदिराच्या आवारात बांधलेल्या विहिरीवरील छत कोसळूल्याने 25 हून अधिक जण विहिरीत पडल्याची घटना घडली. त्यापैकी आतापर्यंत 13 जणांचे मृतदेह सापडले आहेत. त्यामध्ये 10 महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.