चेन्नई : तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिला यांच्या निकटवर्ती सहकारी व्ही.के.शशिकला यांनी अचानक राजकारणासह सार्वजनिक जीवनातून निवृत्ती जाहीर करुन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. त्यांना पक्षाची दारे बंद आहेत, असे जाहीर करणाऱ्या अण्णाद्रमुकने पुन्हा एकदा शशिकलांसाठी पायघड्या अंथरल्या आहेत.खुद्द उपमुख्यमंत्री ओ.पनीरसेल्वम यांनी शशिकलांना खुले आमंत्रण दिले आहे.
शशिकलांना पक्षात न घेण्यास मुख्यमंत्री एडापड्डी पलानीस्वामी आणि उपमुख्यमंत्री ओ.पनीरसेल्वम यांचा सर्वांत जास्त विरोध होता. पलानीस्वामी हे सरकारचे नेतृत्व करीत आहेत तर पनीरसेल्वम हे पक्षाचे नेतृत्व करीत आहेत. जयललिता यांच्या निधनानंतर शशिकलांनी पनीरसेल्वम यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा घेतला होता. नंतर कारागृहात जाण्याआधी त्यांनी एडापड्डी पलानीस्वामी यांना मुख्यमंत्री बनवले होते. यामुळे पनीरसेल्वम यांनी बंड केले होते. नंतर दोघांमध्ये समेट होऊन ते शशिकलांच्या विरोधात एकत्र आले होते. त्यांनी शशिकला तुरुंगात असताना त्यांची आणि त्यांचे भाचे टी.टी.व्ही.दिनकरन यांची पक्षातून हकालपट्टी केली होती.
आता पनीरसेल्वम यांनी शशिकलांना पुन्हा एकदा पक्षात येण्याचे आमंत्रण दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, शशिकलांनी चार वर्षे कारागृहात घालवली आहेत. त्यांनी अम्मांसोबत (जयललिता) 32 वर्षे काम केले आहे. मानवतेच्या भूमिकेतून आम्ही त्यांचा विचार करीत आहोत. पक्षाची सध्याची रचना मान्य असेल तर त्या पुन्हा परतण्याचा विचार करु शकतात. पक्ष हा एका व्यक्ती अथवा कुटुंबासाठी चालत नसतो. मी आधी त्यांना विरोध केला असला तरी माझ्या मनात त्यांच्याबद्दल वाईट काही नाही.
शशिकलांनी काल 3 मार्चला निवेदन जाहीर केले. त्यात त्यांनी म्हटले होते की, जया (जयललिता) जिवंत असताना मी कधीही सत्ता अथवा पदाच्या मागे धावले नाही. जललितांचा मृत्यू झाल्यानंतर असे कदापी घडणे शक्य नाही. तमिळनाडूत अण्णाद्रमुकला सोन्याचे दिवस यावेत यासाठी मी राजकारणापासून दूर राहत आहे. मी ईश्वर आणि माझ्या बहिणीला (जयललिता) अण्णाद्रमुकच्या विजयासाठी प्रार्थना करते. पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन द्रमुकचा पराभव करावा. जयललितांचा वारसा कायम राखण्यासाठी पक्षाच्या सर्वच कार्यकर्त्यांनी काम करावे.
भाजपने तमिळनाडूत अण्णाद्रमुकशी आघाडी केली आहे. मागील लोकसभा निवडणुकीत 2019 मध्ये मतविभाजणी झाली होती. तसा प्रकार होऊन नये यासाठी अण्णाद्रमुक एक राहावा म्हणून भाजपने प्रयत्न केले. याबद्दल मी त्यांचे आभार मानते, असे शशिकलांनी म्हटले होते. मागील लोकसभा निवडणुकीत भाजप आणि अण्णाद्रमुक आघाडीचा तमिळनाडूत मोठा पराभव झाला होता. अण्णाद्रमुकला केवळ एक जागा मिळाली होती. त्याचवेळी द्रमुक आणि काँग्रेस आघाडीला तब्बल 38 जागा मिळाल्या होत्या.
Edited by Sanjay Jadhav
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.