काबूल : अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबान्यांनी (Taliban) सत्ता स्थापन केली असून, हजारो नागरिक देश सोडून पलायन करू लागले आहेत. काबूलच्या (Kabul) विमानतळावर हजारो जणांनी गर्दी केली आहे. यात 5 जण ठार झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, भारताचे (India) परराष्ट्र मंत्रालयाचे कर्मचारी आणि निमलष्करी दलाचे जवान यांच्यासह सुमारे दोनशे जण काबूलमध्ये अडकले आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे 200 भारतीय अफगाणिस्तानमध्ये अडकले आहेत. यात परराष्ट्र मंत्रालयाचे कर्मचारी आणि निमलष्करी दलाच्या जवानांचाही समावेश आहेत. त्यांना तेथून बाहेर काढण्यासाठी भारत सरकारचे प्रयत्न सुरू आहे. काबूल विमानतळावर मोठा गोंधळ सुरू आहे. भारताचे एक विमान काबूल विमानतळावर उभे असले तरी भारतीय दूतावासातून या भारतीयांनी विमानापर्यंत नेणे सध्याच्या परिस्थितीत शक्य नाही. तालिबानने शहरातील अनेक भागांमध्ये संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव दूतावासातून या भारतीयांना विमानतळावर नेणे धोक्याचे आहे.
काबूलमध्ये अडकलेल्यांमध्ये इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीसचे 100 जवान आहेत. त्यांच्यावर अफगाणिस्तानमधील दूतावासाच्या सुरक्षेची जबाबदारी आहे. अफगाणिस्तानने हवाई हद्द बंद केली आहे. यामुळे इतर देशांना अफगाणिस्तानच्या हवाई क्षेत्रातून प्रवास करण्यास मनाई आहे. भारत सरकार अफगाणिस्तानमधील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. तेथे अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
अफगाणिस्तानमध्ये शिल्लक असलेले अमेरिकी सैनिक काबूल विमानतळाची सुरक्षा करीत आहेत. लोकांचा लोंढा विमानतळावर येत असून, त्याला रोखणे अमेरिकी सैनिकांनी अवघड जात आहे. दरम्यान, हजारो जणांनी विमानतळावर गर्दी केल्याने गोंधळ वाढला आहे. विमानात घुसण्याचा प्रयत्न हजारो प्रवासी करीत आहेत. यातच विमानतळावर धुमश्चक्री होऊन गोळीबार झाला. यात 5 जण ठार झाल्याचे वृत्त रॉयटर्सने दिले आहे.
काबूल विमानतळावर उभ्या असलेल्या विमानात बसण्यासाठी गर्दी केलेल्या प्रवाशांचा व्हिडीओ समोर आला आहे. विमानात बसण्यासाठी लोक धक्काबुक्की करीत आहेत. त्याचबरोबर विमानाला लोंबकळत असल्याचे दिसत आहे. अनेक जण विमानाच्या जिन्याला लोंबकळून आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करीत होते. एखाद्या गर्दीच्या बसस्थानकासारखी काबूल विमानतळाची अवस्था झाली आहे. लोकांचे लोंढे विमानतळावर येत आहेत. परंतु, देश सोडून बाहेर जाण्यासाठी विमानात बसण्यास अनेकांना जागा मिळत नसल्याचे चित्र आहे.
तालिबान्यांनी काबूलमध्ये पाऊल ठेवताच अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घनी देश सोडून पळाले आहेत. ते ओमानमध्ये आश्रयास गेले आहेत. तालिबान्यांनी अध्यक्षीय भवनावर कब्जा मिळवत अफगाणिस्तानात आपली सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे लोकनियुक्त सरकार जाऊन आता अफगाणिस्तान तालिबान्यांच्या हातात गेलं आहे. तालिबानचा कमांडर मुल्ला अब्दुल गनी बरदार अफगाणिस्तानचा नवा प्रमुख असू शकतो.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.