Cyclone Tauktae : काळ आला पण वेळ नाही...261 जणांसह ओएनजीसीची बार्ज समुद्रात भरकटूनही सुखरुप

अरबी समुद्रात तयार झालेल्या तौते चक्रीवादळाचा फटका आज ऑईल अँड नॅचरल गॅसच्या बार्जला बसला.
ongc barge in bombay hifh drifted is sea due to cyclone tauktae
ongc barge in bombay hifh drifted is sea due to cyclone tauktae

अहमदाबाद : अरबी समुद्रात तयार झालेल्या तौते चक्रीवादळाचा (Tauktae Cyclone) फटका आज ऑईल अँड नॅचरल गॅसच्या (ONGC) बार्जला बसला. बॉम्बे हाय येथे तेल उत्पादनासाठी ही बार्ज उभी करण्यात आली होती. परंतु, वादळामुळे ती समुद्रात भरकटली. या बार्जवर तब्बल 261 कर्मचारी उपस्थित होते. सुदैवाने नौदलाच्या (Navy) जहाजाने वेळेवर धाव घेतल्याने कोणताही अनर्थ घडला नाही. 

ओएनजीसीची तेल उत्पादन करणारी बार्ज आज चक्रीवादळामुळे बॉम्बे हाय येथे सुरक्षित अंतरावर उभी करण्यात आली होती. परंतु, चक्रीवादळामुळे तिचा अँकर सुटला आणि ती समुद्रात भरकटली. त्यावेळी बार्जवर 261 कर्मचारी होते. अखेर नौदलाला तातडीने संदेश पाठवण्यात आला. नौदलाच्या जहाजाच्या मदतीने ही बार्ज स्थिर करण्यात आली. नंतर बार्जवरील सर्व कर्मचाऱ्यांचा शोध घेण्यात आला. सुदैवाने यात सर्व कर्मचारी सुखरुप दिसून आले. 

ओएनजीसी समुद्रात खोदकाम करुन तेलाचे उत्पादन घेते. अरबी समुद्रात यासाठी बार्जचा वापर केला जातो. या बार्जवरील कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी हेलिकॉप्टरमधून नेले जाते. ओएनजीसी अशा प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून दिवसाला 50 हजार बॅरलपर्यंत तेलाचे उत्पादन घेते. बॉम्बे हाय हे अरबी समुद्रातील ओएनजीसीच्या मालकीचे तेलक्षेत्र आहे. 

तौते चक्रीवादळाने आता रौद्र रुप धारण केलं आहे. हे चक्रीवादळ पुढे सरकत असतानाच अधिक तीव्र होत असल्याने गुजरातचा धोका वाढत चालला आहे. आज रात्री 8 ते 11 वाजण्याच्या सुमारास गुजरात किनापट्टीवर धडकण्याची शक्यता असून अनेक जिल्ह्यांना त्याचा तडाखा बसण्याची भीती व्यक्त केली आहे. तर मुंबई व कोकणात काल रात्रीपासूनच जोरदार वारे वाहत असून अनेक भागात पाऊसही पडत आहे. तसेच काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याच्या घटनाही घडल्या आहेत. मुंबईत अनेक भागातील रस्ते जलमय झाले आहेत.

चक्रीवादळाचा सर्वाधिक तडाखा गुजरातला बसणार आहे. पोरबंदर व महुवा किनारपट्टीवर हे वादळ धडकणार असून तिथून पुढे राजस्थानच्या दिशेने सरकेल. त्यावेळी या भागातील वाऱ्याचा वेग ताशी 180 किलोमीटर असण्याची शक्यता आहे. तसेच समुद्रात 3 ते 4 मीटर उंच लाटा उसळू शकतात. वादळाची तीव्रता वाढत असल्याने धोका लक्षात घेऊन प्रशासनाने किनारपट्टी भागातील 655 गावांमधील सुमारे दीड लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलविले आहे. किनारपट्टीलगतची सर्व घरे रिकामी करण्यात आली आहेत. गुजरातमधील 17 जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गुजरामध्ये NDRF च्या 50 टीम तैनात करण्यात आल्या आहेत. 

दरम्यान, मागील आठवड्यात अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला होता. त्यानंतर त्याचे रुपांतर चक्रीवादळात झाले. सुरूवातीला या वादळाची तीव्रता कमी होती. पण पुढे सरकत असतानाच वादळाची तीव्रता वाढत चालली असून आता वादळाने रौद्र रुप धारण केले आहे. मागील दोन दिवसांत केरळ, कर्नाटक व गोव्याला वादळाने जोरदार तडाखा दिला आहे. हे वादळ आता महाराष्ट्राच्या किनारपट्टीजवळून जात आहे. मुंबई, कोकण, ठाणे या भागांसह पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दोन दिवसांपासून जोराचे वारे वाहत आहेत. त्यामुळे काही ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या आहेत. विजेचे खांब पडले असल्याने काही भागातील वीजपुरवठा बंद झाला आहे.

विमानतळ, सी लिंक बंद

मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ दुपारी दोनवाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण वादळाची तीव्रता वाढू लागल्याने आता हे विमानतळ सहा वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच सी लिंकही वादळाची तीव्रता कमी होईपर्यंत वाहतुकीसाठी बंद राहील. दक्षता म्हणून महापालिकेने आज लसीकरण केंद्रही बंद ठेवली आहेत. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com