नवी दिल्ली : जातीवर आधारित जनगणनेच्या मुदद्यावर बिहारचे (Bihar) मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitish Kumar) यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे त्यांचा मित्र पक्ष भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. या प्रकरणी नितीश यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) पत्र लिहिले होते. परंतु, याला उत्तर न मिळाल्याने नितीश यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे.
जातीनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावर नितीश यांनी मोदींना पत्र लिहिले होते. या पत्राला अद्याप मोदींनी उत्तर दिलेले नाही. यामुळे नितीश यांनी आज उघड नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी मी लिहिलेल्या पत्रावर अद्याप त्यांचे उत्तर मिळालेले नाही. आम्हाला जातीवर आधारित जनगणना हवी आहे. ही आमची जुनीच मागणी आहे. अशा जनगणनेमुळे सर्व जातींची नेमकी लोकसंख्या समोर येईल. यानुसार मग सरकारला धोरणे आखता येतील. हे मी देशाच्या भल्यासाठीच सांगत आहे.
पेगॅसस प्रकरणाची चौकशी आणि जातीवर आधारित जनगणना या दोन मागण्यांच्या आडून नितीशकुमार हे भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. याचवेळी बिहारमधील राजकीय समीकरणे आगामी काळात बदलण्याची चिन्हे समोर येऊ लागली आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीच्या काळात लोक जनशक्ती पक्षाचे संस्थापक रामविलास पासवान यांचे पुत्र चिराग यांनी नितीशकुमार यांना तुरूंगात पाठवण्याची धमकी दिली होती. आता मात्र ते नितीशकुमार यांच्या जवळ येऊ लागले आहेत.
चिराग पासवान यांनी जातीवर आधारित जनगणनेला पाठिंबा देणारी भूमिका घेतली आहे. या दोघांना एकत्र आणण्यामागे जातीवर आधारित जनगणना हे कारण आहे. जनगणनेशिवाय समाजात असलेल्या वेगवेगळ्या जातींची सद्य:स्थिती समजणार नाही, असा पासवान यांचा दावा आहे. या प्रकारच्या जनगणनेच्या आकडेवारीतून सरकारला पिछाडीवर असलेल्या जातींच्या विकासाबाबत योजना तयार करणे शक्य होईल, असे ते सांगत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मी हनुमान आहे, असे जाहीरपणे सांगणारे चिराग पासवान आता भाजपपासून दुरावले आहेत. पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षात फूट पडली आहे. त्यांचे काका खासदार पशुपतिकुमार पारस यांनी पक्षात फूट पाडली आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपने नितीशकुमार यांच्याविरोधात चिराग पासवान यांचा वापर करुन घेतला होता.
जातीवर आधारित जनगणनेच्या मुद्यावरून नितीशकुमार आणि विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव हेसुद्धा एकत्र आले आहेत. तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्र्यांची भेटही घेतली होती. केंद्र सरकारने जातीवर आधारित जनगणना केली नाही तर केरळप्रमाणे बिहार सरकारही काम करू शकते. हे कोणत्याही राज्याला शक्य आहे, तेजस्वी यादव यांनी म्हटले होते. या मताला दुजोरा देत नितीशकुमार यांनीही केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणना केली नाही तर बिहारसाठी हा पर्याय खुला राहील, असे स्पष्ट केले होते. या मुद्द्यावरून भाजपने मात्र विरोधात आघाडी उघडली आहे. जातीवर आधारित जनगणनेची गरज नसल्याचे भाजप नेते म्हणत आहेत.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.