महाआघाडीची लाट बघून नितीशकुमारांचे मानसिक संतुलन ढासळले

बिहारमधील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीत मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नालंदा जिल्ह्यात पक्षात बंडखोरी झाली आहे.
nitish kumar has lost mental balance says congress candidate ravi jyoti
nitish kumar has lost mental balance says congress candidate ravi jyoti

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा नालंदा जिल्हा आता त्यांची डोकेदुखी वाढवू लागला आहे. येथील राजगीर विधानसभा मतदारसंघातील नितीशकुमार यांच्या संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) विद्यमान आमदार रवी ज्योती यांनी बंडाचे निशाण फडकावले होते. पूर्वी पोलीस दलात एन्काउंटर स्पेशालिस्ट असलेले ज्योती आता काँग्रेसकडून उभे आहेत. त्यांनी थेट नितीशकुमारांवर हल्लाबोल केला आहे. 

रवी ज्योती यांच्यासमोर भाजप नेते व हरियानाचे राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य यांचे पुत्र कौशल किशोर यांना जेडीयूने उभे केले आहे. काही दिवसांपूर्वी नितीशकुमार यांनी रवी ज्योती यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली होती. ते जेथून आले आहेत, तेथेच त्यांना परत पाठवू, असे नितीशकुमार म्हणाले होते. या विधानावरुन बरात गदारोळ उडाला होता. याला रवी ज्योती यांनी उत्तर दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, महाआघाडीची लाट बिहारमध्ये आली आहे. ही लाट बघून मुख्यमंत्री नितीशकुमारांचे मानसिक संतुलन बिघडले आहेत. 

ज्योती हे पोलीस निरीक्षक होते. एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून त्यांचा मोठा दबदबा होता. मागील विधानसभा निवडणुकीत ते जायंट किलर ठरले होते. राजगीर मतदारसंघात सहा वेळा निवडून आलेल्या भाजपच्या सत्यदेव नारायण आर्य यांना ज्योतींनी पराभवाची धूळ चारली होती. आता आर्य यांचे पुत्र कौशल किशोर मैदानात आहेत. या वेळी ज्योती काँग्रेसकडून रिंगणात उतरले आहेत. ज्योती हे मागील विजयाची पुनरावृत्ती करतात की कौशल किशोर हे पित्याच्या पराभवाचा वचपा काढतात याची उत्सुकता आहे. 

बिहार विधानसभेची निवडणूक तीन टप्प्यांत होत आहे. यातील पहिला टप्पा २८ ऑक्टोबरला झाला असून, यात ७१ मतदारसंघ होते. दुसरा टप्पा  ३ नोव्हेंबरला असून, यात ९४ मतदारसंघ आहेत. तिसरा टप्पा ७ नोव्हेंबर असून, यात ७८ मतदारसंघ आहेत. निकाल १० नोव्हेंबरला जाहीर होणार आहेत. बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत सत्तारुढ संयुक्त जनता दल (जेडीयू) आणि भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात (एनडीए) राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), काँग्रेस आणि डावे यांची महाआघाडी असे चित्र आहे. 

एनडीएमधून लोक जनशक्ती पक्ष (एलजेपी) बाहेर पडला आहे. चिराग पासवान यांनी राष्ट्रीय स्तर आणि लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत राहण्याची भूमिका घेतली आहे. परंतु, बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पातळीवर जेडीयूसोबत वैचारिक मतभेद असल्याचे कारण देत स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.  

बिहारमधील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) आणि महाआघाडीला टक्कर देण्यासाठी ग्रँड डेमोक्रॅटिक सेक्युलर फ्रंट स्थापन करण्यात आला आहे. राष्ट्रीय लोक समता पक्षाचे उपेंद्र कुशवाह हे फ्रंटचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार आहेत. यात ओवेसी यांचा ऑल  इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुसलमीन (एआयएमआयएम), मायावती यांचा बहुजन समाज पक्ष (बसप), सुहेलदेव भारतीय समाज पार्टी, सामाजिक जनता दल (डेमोक्रॅटिक) आणि जनतांत्रिक पार्टी (सोशालिस्ट) समावेश आहे. 

Edited by Sanjay Jadhav 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com