मोदी सरकारचे अमेरिकेला सणसणीत प्रत्युत्तर..
नवी दिल्ली : भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये नाक खुपसण्याच्या अमेरिकेच्या सवयीला भारताने पुन्हा फटकारले आहे. भारतात अल्पसंख्यांकांवरील हल्ल् वाढले, असा निष्कर्ष काढणाऱ्या एका ताज्या अहवालावर भारताने ‘ आंतरराष्ट्रीय संबंधांमध्येही दुर्देवाने ‘मतपेढीचे‘ राजकारण केले जात आहे,‘ असे प्रत्युत्तर दिले आहे.
भारताबाबत टिप्पणी करणाऱ्या अमेरिकेतील वर्णद्वेषी हल्ले व गोळीबाराच्या घटनांचाही आरसा भारताने दाखविला आहे. पक्षपातीपणा आणि प्रेरक हेतूंवर आधारित मते तयार करणे टाळावे, असे आवाहन आम्ही करीत आहोत, असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
भारतात २०२१ या वर्षात अल्पसंख्याक समाजातील नागरिकांवर सातत्याने हल्ले झाले आहेत, अशी नोंद करून अमेरिकी काँग्रेसमध्ये मांडण्यात आलेल्या अहवालावर तीव्र प्रतिक्रिया देताना भारताने म्हटले की, ‘अमेरिकी अधिकाऱयांच्या अत्यंत चुकीच्या- तुटपुंज्या व बिनबुडाच्या माहितीवर आधारित हा दस्तावेज आहे. विविधतापूर्ण समाज असलेल्या जगातील सर्वांत मोठ्या लोकशाही देशाबद्दल अशी कागदपत्रे प्रकाशित करताना पक्षपाती मते मांडणे टाळणे अपेक्षित असते.‘
अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने ‘आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य’ या विषयावरील वार्षिक अहवालत भारतात मागच्या वर्षी अल्पसंख्याक समुदायाच्या व्यक्तींची हत्या, मारहाण, अत्याचार आणि थेट हल्ले वाढले आहेत, असे म्हटले आहे. अमेरिकी विदेश मंत्रालयाच्या आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य विभागाचे राजदूत रशद हुसैन यांनी तयार केलेला हा अहवाल परराष्ट्रमंत्री ॲटोनी ब्लिंकन यांनी प्रकाशित केला. जगभरात धार्मिक स्वतंत्रतेबाबतची स्थिती आणि त्याचे उल्लंघन याबद्दलची मते अहवालात मांडली आहेत.
विदेश मंत्रालयाने अमेरिकेच्या या ताज्या उद्योगाला दुपारी सणसणीत प्रत्युत्तर देऊन, भारतातील अंतर्गत मुद्दे सोडविण्यासाठी देश सदैव समर्थ आहे असा प्रहार केला आहे. एक विविधतापूर्ण समाज या नात्याने भारत धार्मिक स्वातंत्र्य व मानवाधिकारांचा कायम सन्मान करतो. अमेरिकेबरोबरच्या चर्चांमध्ये भारताने तेथील वाढते वर्णद्वेषी हल्ले, अंदाधुंद गोळीबाराच्या घटनांचा उल्लेख केला आहे. कोणत्याही विदेशी सरकारला आमच्या नागरिकांच्या घटनात्मकरित्या संरक्षित अधिकाराबद्दल बोलण्याचा अधिकारच नाही, असेही भारताने सुनावले आहे.
अहवालात काय आहे ?
अमेरिकन काँग्रेसला सादर केलेल्या या अहवालात भारतातील २०२१ मधील अल्पसंख्यांकांवरील हल्ल्यांचा उल्लेख आहे. भाजपची मातृसंस्था असलेल्या संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी गेल्या वर्षी जुलै महिन्यात जाहीरपणे ‘भारतातील हिंदू-मुस्लिमांचे ‘जनुकीय सूत्र' म्हणजे ‘डिएनए’ एकच आहे आणि धार्मिक आधारावरून त्यांच्यात फरक करू नये,’ असे म्हटले होते.
देशात कधीही हिंदू किंवा मुस्लिमांचे वर्चस्व नव्हते. तेथे फक्त भारतीयांचेच वर्चस्व असू शकते. भारतात इस्लामला धोका आहे, अशी भीती मुस्लिम धर्मियांनी बाळगण्याचे कारण नाही. गोहत्येच्या आरोपावरून बिगर हिंदूंची हत्या करणे हे हिंदुत्वाच्या विरोधात असल्याचे भागवत म्हणाल्याचेही यात नमूद केले आहे. ‘पूर्वीच्या सरकारांनी लाभ वितरणात मुस्लिमांना जास्त प्राधान्य दिले होते, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी १२ सप्टेंबर रोजी म्हटले होते, असेही म्हटले आहे.

त्यांचीही विधाने अहवालात घेण्यात आली आहे. विविध सामाजिक संघटना, अल्पसंख्याक संस्थांनी त्यांच्यावरील हल्ल्यांविषयी केलेले आरोपांचाही यात उल्लेख केला आहे. अशा घटनांची अधिकाऱ्यांकडून होणारी चौकशी व त्यातील निष्कर्ष आणि सरकारची त्यावरील मते याविषयी अहवालात काहीही प्रकाश टाकलेला नाही. अहवालातील भारताच्या प्रकरणात म्हटले आहे, की धार्मिक अल्पसंख्याक समुदायांतील लोकांना मारहाण, हत्या, धमक्या अशा प्रकारचे हल्ले संपूर्ण वर्षभरात झाले आहेत. गोहत्या किंवा गोमांसाच्या व्यापाराच्या आरोपांवरून बिगर हिंदू नागरिकांवर गोरक्षकांनी केलेल्या हल्ल्यांचाही यात समावेश आहे.
अहवालातील अन्य नोंदी
- हिंदू किंवा हिंदुत्वाचा अपमान करणारी टिप्पणी केल्याने पोलिसांनी बिगर हिंदूना अटक केली.
- सामाजिक संघटनांनासह धार्मिक संघटनांना मिळणाऱ्या परकी देणग्यांमध्ये कपात केली
- परकीय निधी नियमन कायद्यात सुधारणा करून अशा परदेशातून मिळणाऱ्या देणग्यांसाठी परवानगी घेण्याची अट सरकारने घातली.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.