ममता बॅनर्जी म्हणाल्या, केंद्र सरकार माझं सरकार अन् ट्विटरच्या मागे लागलंय!

पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखर आणि राज्य सरकार असा वाद निर्माण झाला आहे. यावरुन ममता बॅनर्जींनी केंद्राला फटकारले आहे.
mamata banerjee says bjp is trying to bulldoze my government
mamata banerjee says bjp is trying to bulldoze my government

कोलकता : पश्चिम बंगालचे (West Bengal) राज्यपाल जगदीप धनखर (Jagdeep Dhankhar) आणि राज्य सरकार असा वाद निर्माण झाला आहे. राज्यपाल (Governor) दिल्लीत दाखल झाले असून, विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनांबाबत ते दिल्लीत पंतप्रधानांसह गृहमंत्र्यांना भेटण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी केंद्र  सरकारवर हल्लाबोल केला आहे. 

राज्यपाल आज दिल्लीत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना भेटले. यानंतर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांना भेटण्याची शक्यता आहे. त्यांना बंगालमध्ये झालेल्या हिंसाचाराचा अहवाल ते सादर करतील, अशी चर्चा आहे. भाजपनेही हा मुद्दा उचलून धरल्याने सातत्याने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना लक्ष्य केलं जात आहे. तृणमूल काँग्रेसनेच हा हिंसाचार घडवून आणल्याचा दावा भाजपकडून केला जात आहे. तर ममतादीदींनी भाजपकडे बोट दाखविले आहे. 

याबाबत बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, पश्चिम बंगालमध्ये कोणताही राजकीय हिंसाचार नाही. आम्ही हिंसाचाराचा कायम निषेध करीत आलो आहोत. राजकीय हिंसाचार हे भाजपचे हत्यार आहे. बंगालमध्ये पाहण्यापेक्षा त्यांनी उत्तर प्रदेशात जावे. उत्तर प्रदेशात मृतदेह नद्यांमध्ये तरंगताना दिसत आहेत. 

यास चक्रीवादळानंतर केंद्र सरकारने बंगालला अद्याप कोणतीही नुकसानभरपाई दिलेली नाही, असा दावा करुन ममता म्हणाल्या की, केंद्र सरकार ट्विटरवर नियंत्रण ठेवू शकत नाही म्हणून ते कंपनीला नेस्तनाबूत करण्याच्या मागे लागले आहेत. त्याचप्रमाणे ते मलाही नियंत्रित करु शकत नसल्याने मलाही संपवण्याचा प्रयत्न करीत आहेत. हे केंद्र सरकारने तातडीने थांबवायला हवे. 

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर बंगालमध्ये अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या. भाजपच्या कार्यकर्त्यांना मारहाण करून खून करण्यात आले. महिलांवर अत्याचार करण्यात आले, असे अनेक गंभीर आरोप भाजपने केले आहेत. या हिंसाचारामध्ये तृणमूलच्या काही कार्यकर्त्यांचाही मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे. या हिंसाचारानंतर राज्यपालांनी राज्याच्या मुख्य सचिवांसह पोलिस महासंचालकांची बैठक घेतली. केंद्रीय गृह मंत्रालयाचे एक पथक हिंसाचार झालेल्या भागाची पाहणीही करून गेले आहे. 

राज्यपाल धनखर यांच्याकडून सातत्याने ममता बॅनर्जी यांनाही लक्ष्य केलं जात आहे. राज्यातील कायदा-सुव्यवस्थेची स्थिती चांगली नसल्याचा आरोप करत त्यांनी राज्यात लोकशाही श्वास घेऊ शकत नाही, असा आरोप केला आहे. राज्यातील स्थिती खूपच चिंताजनक असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे. यापार्श्वभूमीवर राज्यपाल दिल्लीत दाखल झाले आहेत. ते 18 जूनपर्यंत ते दिल्लीतच राहणार असल्याची माहिती त्यांनी ट्विटरवरून दिली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com