रामविलास पासवान यांच्या मृत्यूच्या चौकशीच्या मागणीवर संतापून चिराग म्हणाले...

बिहारच्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. लोक जनशक्ती पक्षाचे संस्थापक रामविलास पासवान यांच्या मृत्यूची चौकशी करण्याचा मुद्दा आता तापू लागला आहे.
ljp chief chirag paswan questions ham leader jitanram manjhi
ljp chief chirag paswan questions ham leader jitanram manjhi

पाटणा :  लोक जनशक्ती पक्षाचे (एलजेपी) संस्थापक रामविलास पासवान यांच्या मृत्यूची चौकशी करावी, अशी मागणी हिंदुस्तान आवाम मोर्चाचे प्रमुख व माजी मुख्यमंत्री जितनराम मांझी यांनी केली आहे. यावरुन राज्यात मोठा गदारोळ सुरू झाला आहे. आता एलजेपीचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी याबाबत जाहीर भूमिका घेतली आहे. 

राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) एलजेपी बाहेर पडला आहे. चिराग पासवान यांनी राष्ट्रीय स्तरावर आणि लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत राहण्याची भूमिका घेतली आहे. परंतु, बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पातळीवर जेडीयूसोबत वैचारिक मतभेद असल्याचे कारण देत स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, भाजपचे मोठ्या प्रमाणात बंडखोर नेते एलजेपीत दाखल झाले आहेत. ते जेडीयूच्या विरोधात मैदानात उतरले आहेत. यामुळे भाजप आणि चिराग पासवान यांची छुपी युती असल्याची चर्चा सुरू आहे. 

रामविलास पासवान यांच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी करण्यात आल्याने राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. यावर चिराग यांनी ही मागणी करणाऱ्यांना सुनावले आहे. ते म्हणाले की, एका पुत्राबद्दल असे प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना लाज वाटायला हवी. माझ्या वडिलांची प्रकृती गंभीर होती त्यावेळी मी मांझींना कॉल केला होता. तरीही शेवटपर्यंत ते माझ्या आजारी वडिलांना पाहायला आले नव्हते. 

माझ्या वडिलांबद्दल आता मांझी बोलत आहेत. माझे वडील रुग्णालयात असताना तेवढी चिंता त्यांना का दाखवली नाही? मृत व्यक्तीचे नाव घेऊन सर्वजण राजकारण करीत आहेत परंतु, जिवंत असताना त्यांना कोणी भेटायला आले नाही, असे चिराग पासवान यांनी म्हटले आहे. 

बिहार विधानसभेची निवडणूक तीन टप्प्यांत होत आहे. पहिला टप्पा २८ ऑक्टोबरला झाला असून, यात ७१ मतदारसंघ होते. दुसरा टप्पा  ३ नोव्हेंबरला असून, यात ९४ मतदारसंघ आहेत. तिसरा टप्पा ७ नोव्हेंबर असून, यात ७८ मतदारसंघ आहेत. निकाल १० नोव्हेंबरला जाहीर होणार आहेत.  बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत सत्तारुढ संयुक्त जनता दल (जेडीयू) आणि भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात (एनडीए) राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), काँग्रेस आणि डावे यांची महाआघाडी असे चित्र आहे.

बिहारमधील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) आणि महाआघाडीला टक्कर देण्यासाठी ग्रँड डेमोक्रॅटिक सेक्युलर फ्रंट स्थापन करण्यात आला आहे. राष्ट्रीय लोक समता पक्षाचे उपेंद्र कुशवाह हे फ्रंटचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार आहेत. यात ओवेसी यांचा ऑल  इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुसलमीन (एआयएमआयएम), मायावती यांचा बहुजन समाज पक्ष (बसप), सुहेलदेव भारतीय समाज पार्टी, सामाजिक जनता दल (डेमोक्रॅटिक) आणि जनतांत्रिक पार्टी (सोशालिस्ट) समावेश आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com