बंडखोरांमुळे जेरीस आलेले मुख्यमंत्री म्हणाले, कुठंय बंड?

कर्नाटकात मागील काही दिवसांपासून नेतृत्व बदलाची चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांना बदलले जाईल, अशी शक्यता व्यक्त होते आहे.
karnataka cm b s yediyurappa denies any political resentment
karnataka cm b s yediyurappa denies any political resentment

बंगळूर : कर्नाटकात (Karnataka) मागील काही दिवसांपासून नेतृत्व बदलाची चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा (B.S.Yediyurappa) यांना बदलले जाईल, अशी शक्यता व्यक्त होते आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे (BJP) राष्ट्रीय सरचिटणीस व कर्नाटक प्रदेश भाजपचे प्रभारी अरुणसिंह हे राज्यात आले होते. येडियुरप्पांनी यांनी मात्र, त्यांच्याविरोधात बंड सुरू  असल्याचा इन्कार केला. 

येडियुरप्पा म्हणाले की, पक्षातील कुणीही राजकीय बंड केलेले नाही. थोडा गोंधळ असून, केवळ एक-दोघे प्रसारमाध्यमांमध्ये बोलत आहेत आणि तेच सगळीकडे दाखवले जात आहे. ते सुरवातीपासूनच असे करीत आहेत. पक्षाचे प्रभारी अरुणसिंह हे त्यांना भेटलेच नाहीत. मंत्रिमंडळातील एक सदस्य नाराज नाही. पक्षाच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या नेत्यांवर कारवाई करण्याचा निर्णय पक्षनेतृत्व घेईल. 

कर्नाटकात मागील काही काळापासून भाजपच्या नेत्यांनी उघडपणे मुख्यमंत्र्यांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. याचबरोबर काही आमदारांनी तर थेटपणे मुख्यमंत्र्यांना आव्हान दिले आहे. राज्यातील भाजप नेत्यांमध्ये मुख्यमंत्र्यांबद्दल मोठी नाराजी आहे. ही नाराजी दूर करण्यासाठी त्यांना पदावरुन हटवले जाईल, अशी चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाचे प्रभारी अरुणसिंह हे कर्नाटकमध्ये दाखल झाले आहेत. 

अरुणसिंह यांनी पक्षाच्या नेत्यांशी संवाद साधण्यास सुरवात केली आहे. या वेळी पक्षाचे नेते आमदार एच.विश्वनाथ यांनी येडियुरप्पांबद्दल संपूर्ण मंत्रिमंडळच नाराज असल्याचा बॉम्ब टाकला होता. विश्वनाथ म्हणाले होते की, येडियुरप्पा यांचे वय 78 आहे. त्यांना आतापर्यंत पक्षासाठी दिलेले योगदान मोठे आहे. परंतु, आता वय आणि आरोग्यामुळे त्यांना काम करणे शक्य नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी कायम घराणेशाहीच्या विरोधात बोलत असतात. मग कर्नाटकात हाच प्रकार कसा सुरू आहे. कर्नाटकातील भाजप मोदींना विसरली आहे. सरकारबद्दल जनमत नकारात्मक बनले आहे. 

राज्य सरकारमध्ये येडियुरप्पा कुटुंबीयांचा सातत्याने हस्तक्षेप सुरू आहे. सरकारच्या प्रत्येक विभागात येडियुरप्पांचा मुलगा ढवळाढवळ करीत आहे. कवडीमोल किमतीने खासगी कंपन्यांना सरकारी जमीन दिली जात आहे. मुख्यमंत्र्यांनी 20 हजार कोटी रुपयांचे सिंचन प्रकल्प कोणत्याही बैठकीविना मंजूर केले, असा आरोपही विश्वनाथ यांनी केला होता. 

विश्वनाथ यांनी यात राज्य भाजपमधील वादात पंतप्रधानांना ओढले होते. राज्यातील धर्मनिरपेक्ष जनता दल (जेडीएस) आणि काँग्रेसचे सरकार कोसळून भाजपचे सरकार आले होते. विश्वनाथ यांच्यासह 18 आमदार फुटून भाजपमध्ये आल्यामुळे हे सरकार बनले होते आणि येडियुरप्पा पुन्हा मुख्यमंत्री बनले होते. आता येडियुरप्पांच्या विरोधात विश्वनाथ यांच्यासह अनेक नेते मैदानात उतरले आहेत. येडियुरप्पांचे एकेकाळचे निकटवर्ती सहकारी के.एस.ईश्वरप्पा यांनीही विरोधात मोहीम उघडली आहे. ईश्वरप्पा यांनी तर मुख्यमंत्र्यांच्या विरोधात थेट राज्यपालांकडे तक्रार केली होती. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com