अन्नदाता निराश होऊन रस्त्यावर उतरलाय...चौटालांकडून भाजपला निर्वाणीचा इशारा

कृषी कायद्यांच्या विरोधात रान पेटले असून, हजारो शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करीत आहेत. या आंदोलनामुळे हरियानातमोठा गदारोळ उडाला आहे.
Jannayak Janta Party founder Ajay Chautala warns bjp government
Jannayak Janta Party founder Ajay Chautala warns bjp government

नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनावरुन देशभरात वातावरण तापले आहे. या आंदोलनाच्या हाताळणीवरुन हरियानातील भाजप सरकार अडचणीत आले आहे. हरियानात सरकारमध्ये सहभागी असलेल्या जननायक जनता पार्टीने (जेजेपी) आता भाजपला निर्वाणीचा इशारा दिला आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांवर केंद्र सरकारने तातडीने तोडगा काढावा, अशी भूमिका जेजेपीचे संस्थापक अजय चौटाला यांनी घेतली आहे. 

हरियानातील मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर सरकारवर शेतकरी आंदोलकावर बळाचा वापर केल्याप्रकरणी मोठी टीका होत आहे. खट्टर सरकार जननायक जनता पार्टीच्या पाठिंब्यावर तरुन आहे. उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांचे पिता व जेजेपीचे संस्थापक अजय चौटाला यांनी या मुद्द्यावर सरकारला धारेवर धरले आहे. यामुळे खट्टर सरकार अडचणीत आले आहे. जेजेपीची व्होटबँक ही प्रामुख्याने शेतकरी आहेत. 

अजय चौटाला म्हणाले की, सरकारने हा प्रश्न तातडीने सोडवायला हवा. हमी भाव कायम राहणार याची खात्री सरकारने शेतकऱ्यांना द्यावी. कृषी कायद्यांत हमी भावाचा समावेश करावा. अन्नदाता निराश होऊन रस्त्यावर उतरला आहे. 

दरम्यान, अपक्ष आमदार सोमबीर संगवान यांनी हरियाना पशुसंवर्धन महामंडळाचा राजीनामा दिला आहे. संगवान हे दादरी मतदारसंघातील अपक्ष आमदार आहेत. त्यांनी सरकारला पाठिंबा दिल्याने त्यांची महामंडळावर नियुक्ती करण्यात आली होती. शेतकरी आंदोलनात सहभागी होण्यासाठी त्यांनी महामंडळाचा राजीनामा दिला आहे. आता संगवान यांनी पाठिंबा काढल्याने सरकारला काठावरचे बहुमत आहे. याआधी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर अपक्ष आमदार बलराज कुंडू यांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे. 

संगवान हे संगवान खापचे प्रमुख आहे. या खापच्या कार्यक्षेत्रात भिवानी आणि दादरी जिल्ह्यातील सुमारे 40 गावे येतात. संगवान यांनी खट्टर यांना महामंडळाचा राजीनामा पाठवला आहे. संगवान यांनी आज खट्टर सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याचा निर्णय आज जाहीर केला. आता संगवान यांच्या नेतृत्वाखाली खाप पंचायत शेतकरी आंदोलनात उतरत आहे. 

दिल्लीत आंदोलनासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना सीमेवर अडवून त्यांच्यावर बळाचा वापर करणारे हरियाना आणि दिल्लीतील पोलीस टीकेची धनी बनले आहेत. भाजप सरकारकडून शेतकऱ्यांवर लाठीमार करण्यासोबत अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. यात अनेक शेतकरी जखमी झाले आहेत. शेतकऱ्यांवर पोलिसांकडून खुनाच्या प्रयत्नासह दंगल आणि कोरोनाविषयक नियमांच्या भंगाचे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. 

केंद्रीय कृषिमंत्री तोमर यांची शेतकरी नेत्यांसोबत विज्ञान भवनात  ही चर्चा होत आहे. या चर्चेला पंजाबमधील 30 शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत. या चर्चेतून आंदोलनावर तोडगा काढण्याचा प्रयत्न आहे. यानंतर सायंकाळी 7 वाजता उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरियाना आणि दिल्लीतील शेतकरी संघटनांशी सरकार चर्चा करणार आहे. 

सिंघू आणि टिकरी सीमेवर आंदोलनाचा शेतकऱ्यांच्या आज सलग सहावा दिवस आहे. केंद्र सरकारने चर्चेसाठी कोणतीही अट घालू नये, अशी भूमिका शेतकरी नेत्यांनी घेतली आहे. राष्ट्रीय किसान महासंघ आणि भारतीय किसान युनियनच्या अनेक गटांनी दिल्ली चलो या आंदोलनाची हाक दिली आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com