धक्कादायक : देशात कोरोना लस घेतल्यानंतर 180 मृत्यू अन् त्यातील 75 टक्के तीन दिवसांतच

देशात कोरोनाची लाट आली असून, सरकारने कोरोना लसीकरणाचा वेग वाढवला आहे.
in india 180 deaths reported after taking covid vaccine till march
in india 180 deaths reported after taking covid vaccine till march

नवी दिल्ली : देशात कोरोनाची लाट आली असून, सरकारने कोरोना लसीकरणाचा वेग वाढवला आहे. देशभरात 31 मापर्यंत कोरोना लस घेतल्यानंतर झालेल्या 180 मृत्यूंची नोंद झाली आहे. केंद्र सरकारच्या लसीकरणविषयी समितीने ही माहिती दिली आहे. यातील तब्बल 75 टक्के मृत्यू हे लस घेतल्यानंतर तीन दिवसांत झालेले आहेत, असेही समितीने स्पष्ट केले आहे. 

कोरोनाची लस घेतल्यानंतर 31 मार्चपर्यंत 180 मृत्यूंची नोंद देशभरात झाली आहे. केंद्र सरकारच्या लसीकरण समितीने यातील 75 टक्के मृत्यू हे लस घेतल्यानंतर तीन दिवसांत झाल्याचे म्हटले आहे. दैनंदिन पातळीवर या मृत्यूंची नोंद समितीकडून घेतली जात असली तरी केवळ 10 मृत्यूंची माहिती सरकारी संकेतस्थळावर देण्यात आली आहे. या प्रक्रियेत आणखी पारदर्शकता असावी, अशी मागणी केली जात आहे. 

कोरोनाची लस घेतल्यानंतर झालेले मृत्यू हे रक्ताच्या गुठळ्या होऊन झालेले आहेत. युरोपसह इतर देशांमध्ये झालेल्या मृत्यूंमध्ये आणि भारतातील मृत्यूंमध्ये मोठे साधर्म्य आहे. युरोपमध्ये लस घेतल्यानंतर होत असलेल्या मृत्यूंबद्दल युरोपियन मेडिसीन्स एजन्सीने म्हटले होते की, आरोग्यसेवक आणि इतर नागरिकांना कोरोनाची लस घेताना यामुळे होणारे दुष्परिणाम माहिती असायला हवेत. ही लस घेतल्यानंतर 2 आठवड्यांत रक्ताच्या गुठळ्या आणी रक्तातील प्लेटलेट्सचे प्रमाण कमी होण्याचे प्रकार समोर आले आहेत. 

1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्वांना कोरोना लस दिली जात आहे. यासाठी सरकारने नोंदणीचे दोन पर्याय ठेवले आहेत. यासाठी सरकारी को-विन अॅपवर ऑनलाइन नोंदणी करण्याचा पहिला पर्याय आहे. दुसरा पर्याय हा प्रत्यक्ष लसीकरण केंद्रावर जाऊन नोंदणी करण्याचा असेल. मात्र, प्रत्यक्ष नोंदणीसाठी नागरिकांना दुपारी 3 वाजल्यानंतर लसीकरण केंद्रावर जावे लागेल.

जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरणास भारतात 16 जानेवारीला सुरवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले होते. सरकारने लस देण्याचा प्राधान्यक्रम ठरवला आहे. यातील पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, कोरोनाच्या आघाडीवर लढणारे पोलीस, नागरी सुरक्षा कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचारी यांचा समावेश होता. 

लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ही लस 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना देण्यात आली. तसेच, मधुमेह आणि उच्च रक्तदाबासह इतर आजार असलेल्या 45 वर्षांवरील रुग्णांनाही लस दिली गेली. १ एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना ही लस दिली जात आहे. सरकारी रुग्णालयात ही लस मोफत देण्यात येत आहे. मात्र, खासगी रुग्णालयात यासाठी 250 रुपये मोजावे लागत होते. सरकारने आता ही किंमत कमी करुन 200 रुपयांवर आणली आहे. 

देशात कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लशींचा वापर लसीकरणासाठी होत आहे. यातील कोव्हिशिल्डच्या दोन डोसमधील अंतर सरकारने वाढवून 6 ते 8 आठवडे केले आहे. याआधी या दोन्ही लशींसाठी दोन डोसमधील अंतर 4 आठवडे होते. त्यामुळे आधी पहिला डोस घेतल्यानंतर दुसऱ्या डोससाठी नोंदणी आपोआप होत होती. आता दोन्ही लशींच्या दोन डोसमधील अंतर वेगवेगळे असल्याने आपोआप नोंदणी बंद करण्यात आली आहे. नागरिकांना पहिला डोस घेतल्यानंतर त्यांना पुन्हा दुसऱ्या डोससाठी नोंदणी करावी लागेल. 

सिरम इन्स्टिट्यूट ही कोव्हिशिल्ड या कोरोना लशीचे उत्पादन करीत आहे. ही लस ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेन्का यांनी विकसित केली आहे. दुसरी लस ही भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही आहे.  सध्या दोन कोरोना लशी उपलब्ध असून, आणखी सात कोरोना लशींवर काम सुरू असल्याचे सरकारने नुकतेच जाहीर केले होते. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com