बाबरी निकालावर शिवसेना म्हणते,..तर मग राम मंदिराचे भूमिपूजनही झाले नसते!

बाबरी पाडल्याप्रकरणी न्यायालयाने लालकृष्ण अडवानींसह 32 जणांची मुक्तता केली आहे. या निकालाचे शिवसेनेने स्वागत केले आहे.
If the babri masjid was not demolished we would not have seen any bhumi pujan says sanjay raut
If the babri masjid was not demolished we would not have seen any bhumi pujan says sanjay raut

नवी दिल्ली : बाबरी मशीद पाडल्याप्रकरणी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांच्यासह 32 जणांची केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) न्यायालयाने आज निर्दोष मुक्तता केली आहे. या निकालावरुन आता मोठा गदारोळ उडाला आहे. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी या निकालाचे स्वागत केले असून, हा निकाल अपेक्षित असल्याचे म्हटले आहे. 

अयोध्येत 6 डिसेंबर 1992 रोजी लाखो कारसेवकांच्या उपस्थित बाबरी मशीद पाडण्यात आली होती. त्यावेळी देशात काँग्रेसचे सरकार होते आणि पी. व्ही. नरसिंह राव हे पंतप्रधान होते. अयोध्येतील वादग्रस्त जागेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने काही महिन्यांपूर्वी निकाल दिला होता. त्यानंतर राम मंदिर भूमिपूजनचा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला होता. वास्तविक राम मंदिराबाबत निकाल लागल्याने आजचा निकालही अपेक्षित होता, अशा प्रतिक्रिया उमटल्या आहेत. 

या प्रकरणाचा तपास करणाऱ्या केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) न्यायालयासमोर  351 साक्षीदार आणि सुमारे 600 कागदपत्रे पुरावा म्हणून सादर केली होती. न्यायालयात 48 जणांविरोधात आरोप निश्‍चित करण्यात आले. मात्र, त्यापैकी 16 जणांचा खटला सुरु असताना मृत्यू झाला आहे. सोळाव्या शतकातील ही मशीद पाडण्यासाठी आरोपींनी कारस्थान रचले आणि कारसेवकांना मशीद पाडण्यासाठी चिथावणी दिली, असा आरोप सीबीआयने ठेवला होता. 

अडवानी आणि मुरली मनोहर जोशी यांना प्रकृतीच्या कारणास्तव आज गैरहजर राहण्याची मुभा देण्यात आली होती. उमा भारती यांना कोरोनाची लागण झाली असून, कल्याणसिंह सध्या प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल आहेत. आज एकूण 16 आरोपी न्यायालयात  हजर होते. यामध्ये साध्वी ऋतंभरा, चंपत राय, विनय कटियार, ब्रिजमोहन शरणसिंह आणि इतर काही जणांचा समावेश होता.  

याविषयी बोलताना शिवसेनेचे नेते संजय राऊत म्हणाले की, शिवसेना न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करीत असून, या प्रकरणातून निर्दोष मुक्तता झालेले लालकृष्ण अडवानी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती आणि इतर सर्वांचे अभिनंदन करते. बाबरी पाडण्यामागे कोणतीही कारस्थान नव्हते, असे निकालात म्हटले आहे. ही त्यावेळच्या परिस्थितीतून उमटलेली प्रतिक्रिया होती, असेही निकालात म्हटले आहे. आपण आता तो भाग विसरून जायला हवा. बाबरी मशीद पाडलीच नसती तर राम मंदिराचे भूमिपूजनही आपल्याला पाहायला मिळाले नसते. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com