अर्णब गोस्वामींना पुन्हा एकदा न्यायालयाचा दिलासा..!

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यामागील मुंबई पोलिसांचा ससेमिरा कायम आहे. बनावट टीआरपी प्रकरणात गोस्वामी हे अडचणीत आले आहेत.
high court gives relief to arnab goswami and republic tv employees on trp scam
high court gives relief to arnab goswami and republic tv employees on trp scam

मुंबई : मुंबई पोलिसांनी उघडकीस आणलेल्या बनावट टीआरपी रॅकेटमध्ये रिपब्लिक भारत, फक्त मराठी, महा मूव्ही आणि बॉक्‍स सिनेमा या चार चॅनेलचा समावेश होता. त्यांनी बनावट पद्धतीने टीआरपी मिळवल्याचे समोर आले होते. या प्रकरणी अडचणीत आलेले रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि इतर कर्मचाऱ्यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. 

बनावट टीआरपी प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी अडचणीत आले आहेत. या प्रकरणी रिपब्लिक टीव्हीच्या काही अधिकाऱ्यांना अटक झाली असून, चौकशीचा फेरा सुरू आहे. गोस्वामी यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मुंबईच्या पोलीस आयुक्तांना थेट आव्हान दिले होते. दरम्यान, अन्वय नाईक आणि त्यांच्या मातोश्री कुमुद नाईक आत्महत्येप्रकरणी गोस्वामी यांना अटक झाली होती. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना अंतरीम जामीन दिला आहे. 

उच्च न्यायालयाने या प्रकरणात अर्णब गोस्वामी यांच्यासह रिपब्लिक टीव्हीच्या कर्मचाऱ्यांना दिलासा दिला आहे. पोलिसांनी त्यांच्यावर 29 जानेवारीपर्यंत कोणतीही कारवाई करू नये, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. तसेच, त्यांना आठवड्यात दोन दिवसांपेक्षा अधिक दिवस चौकशीसाठी बोलावू नये, असेही उच्च न्यायालयाने बजावले आहे. 

न्यायालयाने या प्रकरणी मुंबई पोलिसांनी सादर केलेला तपास अहवाल नोंदवून घेतला आहे. रिपब्लिक टीव्हीची पालक कंपनी एआरजी मीडियाने या प्रकरणी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई करण्यापासून पोलिसांना प्रतिबंध करावा, अशी मागणी त्यांनी केली होती. 

या प्रकरणी पोलिसांनी ब्रॉडकास्ट रिसर्च ऑडियन्स कौन्सिलचे (बीएआरसी) माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थ दासगुप्ता यांना अटक केली होती. या प्रकरणी अटक झालेले ते पंधरावे आरोपी आहेत. त्यांच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. गोस्वामी हे रिपब्लिक टीव्हीचा टीआरपी वाढवण्यासाठी दासगुप्ता यांना लाखो रुपये देत असल्याची खळबळजनक बाब तपासात समोर आली होती. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दासगुप्ता या प्रकरणातील सूत्रधार आहेत. ते बीएआरसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी असताना 2016 ते 2019 या काळात हा गैरव्यवहार झाला. दासगुप्ता हे जून 2013 ते नोव्हेंबर 2019 या कालावधीत मुख्य कार्यकारी अधिकारी होते. त्यांना टीआरपी वाढवण्यासाठी गोस्वामी यांच्याकडून लाखो रुपये मिळत होते. याचा फायदा अखेर रिपब्लिक टीव्ही आणि रिपब्लिक भारत या चॅनलना होत होता. या पैशातून दासगुप्ता हे महागडे दागिने, घड्याळे आदी गोष्टींची खरेदी करीत होता. 

रिपब्लिक टीव्हीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास खानचंदानी आणि  सहउपाध्यक्ष धनश्यामसिंह यांना मुंबई पोलिसांच्या गुन्हे गुप्तचर विभागाने अटक केली होती. आतापर्यंत पोलिसांनी या प्रकरणात 15 जणांना अटक केली आहे. आता आधीच अडचणीत आलेल्या गोस्वामींच्या अडचणीत आणखी वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणातही गोस्वामी यांच्यावरही कारवाई होऊ शकते. पोलिसांनी या प्रकरणी नुकतेच आरोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. 

Edited by Sanjay Jadhav 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com