नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोरोना लसीकरण मोहिमेला देशात सुरवात झाली आहे. या लशीच्या सुरक्षिततेवरुन प्रश्न उपस्थित होत आहेत. आता कोरोना लस घेतलेल्या आरोग्य कर्मचाऱ्याचा दुसऱ्याच दिवशी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. त्याचा मृत्यू लसीकरणामुळे झाल्याचा दावा नातेवाईकांनी केला. मात्र, हदयविकारामुळे मृत्यू झाल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे.
जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरणास 16 जानेवारीपासून देशशात सुरवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन झाले. या वेळी मोदींनी देशवासींयाशी संवाद साधला. लस घेतल्यानंतरही काळजी घेणे गरजेचे आहे. लस घेतल्यानंतर मास्क लावणे, हात धुणे गरजेचे आहे, असल्याचा संदेश मोदींनी दिला होता. तीन कोटी लोकांना लस मोफत देण्यात येणार आहे. ज्येष्ठ व्यक्तींना दुसऱ्या टप्यात लस दिली जाणार आहे.
आता कोरोना लस घेतलेल्या आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याने उत्तर प्रदेशमध्ये खळबळ उडाली आहे. महिपाल सिंह (वय ४६) असे मृत वॉर्डबॉयचे नाव असून, ते मोरादाबाद जिल्हा रुग्णालयात सेवेत होते. त्यांना 16 जानेवारीला लस दिल्यानंतर चोवीस तासांनी म्हणजे 17 जानेवारीला त्यांची तब्येत बिघडली आणि रात्री त्यांचा मृत्यू झाला.
मोरादाबाद जिल्हा रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांना 16 जानेवारीला लस देण्यात आली होती. जिल्हा रुग्णालयाचे वॉर्डबॉय महिपाल सिंह यांना त्यादिवशी दुपारी १२ वाजता लस दिली गेली. यानंतर त्यांनी मुलाला दवाखान्यात बोलावले आणि त्याच्यासमवेत घरी गेले. त्या रात्री त्यांची आपत्कालिन कक्षात ड्यूटी होती. रविवारी काम संपवून घरी गेल्यानंतर अचानक त्यांची तब्येत ढासळली. त्यामुळे त्यांना जिल्हा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
लसीकरणामुळे महिपाल यांची तब्येत बिघडल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. महिपाल यांचा मुलगा विशाल म्हणाला की, वडील सकाळी घरी परतले तेव्हा त्यांना अस्वस्थ वाटत होते. तेव्हा मी घरी नव्हतो. वडिलांची तब्येत बिघडल्याचा मला फोन आला आणि मी लगेच घरी आलो. त्यांना दवाखान्यात नेले असता तेथे त्यांना मृत जाहीर केले. वडिलांना न्यूमोनिया झाला होता.
या घटनेनंतर मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. मिलिंद चंद्र गर्ग हे त्यांच्या घरी पोचले. गर्ग यांच्या मते, महिपाल यांना छातीत दुखू लागले आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागला होता. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना दवाखान्यात मृतावस्थेत आणले. त्यांना कोरोना झालेला नव्हता आणि लशीची अन्य बाधा झाल्याचेही निष्पन्न झालेले नाही. त्यांचा मृत्यू हदयविकाराच्या झटक्याने झाला आहे, असा दावा त्यांनी केला.
केंद्र सरकारने लस देण्याचा प्राधान्यक्रम ठरवला आहे. या आरोग्य कर्मचारी, कोरोनाच्या आघाडीवर लढणारे पोलीस, नागरी सुरक्षा कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचारी यांचा समावेश आहे. त्यानंतर ही लस 50 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना दिली जाणार आहे. यात मधुमेह आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांचा समावेश असेल.
Edited by Sanjay Jadhav
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.