नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हाथरस प्रकरणी जिल्हा पोलीस अधिक्षकासह पाच पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित केलं आहे. पोलीस अधिक्षक विक्रांत सिंह, क्षेत्रिय पोलीस अधिकारी राम शब्द, फैाजदार दिनेश कुमार, उपनिरीक्षक जगवीर सिंह, महेश पाल यांना निंलबित करण्यात आले आहे. याबरोबर आदित्यनाथ यांनी आरोपी आणि पिडीत कुंटुबीय, घटनास्थळी उपस्थित पोलीस अधिकारी यांची नार्को टेस्ट व पॅालीग्राफ टेस्ट करण्याचे आदेश दिले आहेत.
हाथरस प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. आता पिडीत कुंटुबीयांच्या नार्को टेस्ट आणि पॅालीग्राफ टेस्ट करण्यास विरोध करणारी जनहित याचिका अलाहाबाद उच्चन्यायालयात दाखल करण्यात आली आहे. ही याचिका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे मित्र आणि मुंबई येथील सामाजिक कार्यक्रते साकेत गोखले यांनी ही याचिका दाखल केली आहे.
साकेत गोखले हे राहुल गांधी यांचे जवळचे मित्र असल्याचे बोलले जाते. राहुल गांधीच्या टि्वटला ते नेहमीच रिटि्वट करीत असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात ते सोशल मीडीयावर सक्रीय आहेत. याबाबत 12 तारखेला सुनावणी होणार आहे.
काही दिवसापूर्वी अयोध्येत झालेल्या राम मंदीर भूमिपूजनाला विरोध करण्यासाठी साकेत गोखले यांनी अशाच प्रकारची याचिका उच्चन्यायालयात दाखल केली होती. बकरी ईदला सामुहीक नमाज अदा करण्यासाठी न्यायालयाने परवानगी नाकारली होती, तर राम मंदीराच्या भूमिपूजनाला परवानगी का दिली, असं साकेत गोखले यांनी याचिकेत म्हटलं होतं. राम मंदिर भूमिपूजन कार्यक्रमास नागरिकांची गर्दी होणार असल्यामुळे कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता असल्यामुळे ही परवानगी देऊ नये असं गोखले यांनी म्हटलं होतं. उच्चन्यायालयानं त्यांची याचिका रद्द केली होती.
उत्तर प्रदेश मधील हाथरस या ठिकाणी एका दलित युवतीवर गावातील सवर्ण तरुणांनी अत्याचार करून तिच्या पाठीचा कणा तोडला व जीभ कापली त्यानंतर तिला शेतात मेली आहे, असे समजून टाकून दिले. १४ सप्टेंबर रोजी झालेल्या घटनेनंतर या तरुणीने या दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात शेवटचा श्वास घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून आरोपींना कठोर शासन करण्यासाठी तातडीने पाऊल उचलण्याच्या सूचना दिल्या आहेत. या धक्कादायक प्रकरणानंतर यूपीतील योगी आदित्यनाथ सरकारवर चौबाजूने हल्लाबोल होत आहे.
कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनीही ट्विट करून या प्रकरणाचा निषेध करतानाच योगी सरकारला आरोपीच्या पिंजण्यात उभे केले आहे. पिडितीच्या नातेवाईकांनी पोलिसांवर अंत्यसंस्कार रात्रीच का आटपून घेतले हा प्रश्नही केला आहे. मात्र पोलिसांच्या म्हणण्यानुसार पिडितीच्या नातेवाईकांच्या परवानगीनेच रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
हे सर्व असले तरी हाथरस प्रकरणाने निर्भयाप्रकरणाची आठवण देशाला करून दिली. ज्या दलित मुलीवर अत्याचार झाले ते निदर्यपणे केले होते. बलात्कार आणि हत्या प्रकरणाने देशाला हादरा बसला आहे. पिडितेच्या वडलांनी डोळ्यातून अश्रू गाळत एनडीटीव्हीशी बोलताना सांगितले, की नातेवाईक सोडा आमच्या लेकराजवळ आम्हालाही जावू दिले. तिचा चेहराही नीट पाहता आला नाही. सकाळी अंत्यसंस्कार करू या अशी हातजोडून मी मागणी करीत होतो पण, पोलिसांनी ऐकले नाही. जबरदस्तीने अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलीचा मृतदेह पोलिस घेऊन गेले आणि अंत्यसंस्कार केले.
Edited by : Mangesh Mahale
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.