खट्टर सरकारला दणका...महामंडळ सोडून आमदाराची शेतकरी आंदोलनात उडी

कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सर्व प्रवेश मार्गावर आंदोलन सुरू केल्याने दिल्लीला वेढा पडला आहे. यावरुन हरियानात राजकीय वातावरण तापले आहे.
haryana mla resigns from livestock corporation to join farmers protest
haryana mla resigns from livestock corporation to join farmers protest

नवी दिल्ली : कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.  शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमांवरच ठाण मांडल्याने दिल्लीला वेढा पडल्याची स्थिती निर्माण झाली आहे. मागण्या मान्य न झाल्यास शेतकरी नेत्यांनी चार महिने दिल्लीच्या सीमांवर ठाण मांडण्याचे सूतोवाच केले आहे. सरकारचा सशर्त चर्चेचा प्रस्ताव शेतकरी आंदोलकांनी फेटाळला आहे. दरम्यान, हरियानातील आमदाराने पशुसंवर्धन महामंडळाचा राजीनामा देऊन आंदोलनात उडी घेतली आहे. 

शेतकरी आंदोलनाबाबत तोडगा काढण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्यात आज चर्चा झाली. या चर्चेनंतर अमित शहांनी बीकेयू एकता दाकोंडाचे अध्यक्ष बुटासिंग बुर्जगिल यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधून चर्चेचा प्रस्ताव ठेवला. मात्र, विनाशर्त चर्चेस यावे, अशी अटही शहांनी घातली होती. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही शेतकऱ्यांना चर्चेचे आवाहन केले आहे. शेतकरी संघटनांनी सरकारचा सशर्त चर्चेचा प्रस्ताव फेटाळला आहे. यामुळे आमच्या मार्गानेच चर्चा होईल, असा इशारा शेतकऱ्यांनी सरकारला दिला आहे. याचवेळी दिल्लीत प्रवेश करणाऱ्या महामार्गांवरील आंदोलन कायम ठेवण्याचा निर्णय शेतकरी संघटनांनी घेतला आहे.  

दरम्यान, हरियानातील मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर सरकारवर शेतकरी आंदोलकावर बळाचा वापर केल्याप्रकरणी मोठी टीका होत आहे. आता खट्टर सरकारला शेतकरी आंदोलनाचा पहिलाच मोठा दणका बसला आहे. आमदार सोमबीर संगवान यांनी हरियाना पशुसंवर्धन महामंडळाचा राजीनामा दिला आहे. संगवान हे दादरी मतदारसंघातील अपक्ष आमदार आहेत. त्यांनी सरकारला पाठिंबा दिल्याने त्यांची महामंडळावर नियुक्ती करण्यात आली होती. शेतकरी आंदोलनात सहभागी होण्यासाठी त्यांनी महामंडळाचा राजीनामा दिला आहे. 

संगवान हे संगवान खापचे प्रमुख आहे. या खापच्या कार्यक्षेत्रात भिवानी आणि दादरी जिल्ह्यातील सुमारे 40 गावे येतात. संगवान यांनी खट्टर यांना महामंडळाचा राजीनामा पाठवला आहे. शेतकरी आंदोलनात सहभागी होण्यासाठी राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे. 

सिंघू आणि टिकरी सीमेवर आंदोलनाचा शेतकऱ्यांच्या आज सलग पाचवा दिवस आहे. केंद्र सरकारने चर्चेसाठी कोणतीही अट घालू नये, अशी भूमिका शेतकरी नेत्यांनी घेतली आहे. राष्ट्रीय किसान महासंघ आणि भारतीय किसान युनियनच्या अनेक गटांनी दिल्ली चलो या आंदोलनाची हाक दिली आहे. 

दिल्लीत आंदोलनासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना सीमेवर अडवून त्यांच्यावर बळाचा वापर करणारे हरियाना आणि दिल्लीतील पोलीस टीकेची धनी बनले आहेत. भाजप सरकारकडून शेतकऱ्यांवर लाठीमार करण्यासोबत अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. यात अनेक शेतकरी जखमी झाले आहेत. शेतकऱ्यांवर पोलिसांकडून खुनाच्या प्रयत्नासह दंगल आणि कोरोनाविषयक नियमांच्या भंगाचे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. 

पोलिसांना शेतकऱ्यांना रोखण्यासाठी महामार्गांवर काटेरी तार कुंपणासोबत सिमेंटचे मोठे ब्लॉक्स अडथळे म्हणून लावले आहेत. काही ठिकाणी तर शेतकऱ्यांना रोखण्यासाठी रस्तेही जेसीबीने उखडण्यात आले आहेत. शेतकऱ्यांनी दिल्ली पोलिसांनी अखेर दिल्लीतील बुराडी मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी दिली होती. बुराडी मैदानावर शेतकऱ्यांनी आंदोलन करण्यास नकार दिला आहे. मोठ्या प्रमाणात शेतकरी दिल्लीच्या सीमांवर थाबंले आहेत. सिंघू आणि टिकरी सीमांवर हजारो शेतकरी थांबले आहेत. या शेतकऱ्यांनी दिल्लीचे पाचही प्रवेश मार्ग अडवून आता दिल्लीला वेढा घातला आहे. 

Edited by Sanjay Jadhav 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com