कर्नाटक सीमेवरुन तमिळनाडूत एंट्री झाल्यापासून चेन्नईपर्यंत शशिकलांचे होणार जंगी स्वागत

शशिकला यांच्या सुटकेने राज्यातील राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलण्यास सुरवात झाली आहे. शशिकलांच्या जंगी स्वागताची जोरदार तयारी सुरू आहे.
Grand reception will be given to Sasikala from Hosur to all the way till Chennai
Grand reception will be given to Sasikala from Hosur to all the way till Chennai

चेन्नई : तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिला यांच्या निकटवर्ती सहकारी व्ही.के.शशिकला यांच्या सुटकेनंतर राज्यातील राजकीय समीकरणे बदलण्यास सुरवात झाली आहे. शशिकलांना कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे त्यांना बंगळूरमधून रुग्णालयातून सोडल्यानंतर सात दिवस विलगीकरणात ठेवण्यात आले होते. जयललितांच्या खऱ्या कार्यकर्त्यांच्या डोळे आता शशिकलांच्या वाटेकडे लागले असून, त्या रविवारी (ता.7) तमिळनाडूत परततील, अशी माहिती त्यांचे भाचे व आमदार टी.टी.व्ही दिनकरन यांनी दिली. 

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी शशिकला यांना चार वर्षे तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. त्या 15 फेब्रुवारी 2017 रोजी तुरुंग अधिकाऱ्यांसमोर शरण आल्या होत्या. त्या कर्नाटकातील पराप्पना अग्रहार कारागृहात होत्या. शिक्षेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांची 27 जानेवारीला सुटका झाली आहे. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने बंगळूरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना 31 जानेवारीला रुग्णालयातून सोडण्यात आले. परंतु, कोरोना संसर्गामुळे त्यांना सात दिवस विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यांच्या विलगीकरणाचा कालावधी संपल्यानंतर त्या 7 फेब्रुवारीला तमिळनाडूत परतणार आहेत. 

याविषयी बोलताना शशिकलांचे भाचे व अम्मा मक्कल मुनेत्र कळघम पक्षाचे नेते टी.टी.व्ही दिनकरन म्हणाले की, शशिकला या बंगळूरमधील विलगीकरणाचा कालावधी संपवून 7 फेब्रुवारीला तमिळनाडूत परतत आहेत. जयललितांचे खरे कार्यकर्ते त्यांच्या वाट पाहत आहेत. राज्यात शशिकला या पुन्हा अम्मा सरकार स्थापन करतील. शशिकलांनी कर्नाटकातून तमिळनाडूत प्रवेश केल्यानंतर होसूरपासून चेन्नईपर्यंत त्यांचे जंगी स्वागत करण्यात येईल. 

शशिकलांची अण्णाद्रमुक पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यावेळी पक्षात दोन गट पडून पक्षावर नेमका कुणाचा अधिकार हा वाद झाला होता. त्यानंतर 23 नोव्हेंबर 2017 रोजी निवडणूक आयोगाने  मुख्यमंत्री पलानीस्वामी यांच्या नेतृत्वाखालील गटाला पक्षाचे चिन्ह दिले होते.  हा वाद नंतर सर्वोच्च न्यायालयात गेला होता. अखेर सर्वोच्च न्यायालयाने पक्षाचे नाव आणि दोन पानाचे चिन्ह पलानीस्वामी गटाला दिले होते. 

शशिकलांच्या सुटकेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरणात अस्वस्थता निर्माण झाली आहे. विशेषत: अण्णाद्रमुक पक्षात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे आहेत. शशिकलांच्या सुटकेमुळे राज्यात बदलणाऱ्या राजकीय समीकरणांचा धसका मुख्यमंत्री एडापड्डी के. पलानीस्वामी आणि उपमुख्यमंत्री ओ.पनीरसेल्वम यांनी घेतला आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या गटांनी एकत्र येऊन शशिकलांच्या विरोधात रणनीती आखण्यास सुरवात केली आहे. 

शशिकला मुख्यमंत्री व्हाव्यात यासाठी पनीरसेल्वम यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. मात्र, नंतर कारागृहात जाण्याआधी त्यांनी एडापड्डी पलानीस्वामी यांना मुख्यमंत्री बनवले होते. यामुळे पनीरसेल्वम यांनी बंड केले होते. नंतर दोघांमध्ये समेट होऊन ते शशिकलांच्या विरोधात एकत्र आले होते. त्यांनी शशिकला तुरुंगात असताना त्यांची आणि त्यांचे भाचे टी.टी.व्ही.दिनकरन यांची पक्षातून हकालपट्टी केली होती.

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com