राज्यपाल विरूध्द मुख्यमंत्री संघर्ष आता व्यक्तिगत चिखलफेकीवर...

राज्यपालांचं नाव 1996 मधील जैन हवाला प्रकरणात होतं, असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला आहे.
Governor Jagdeep Dhankhar attacks on CM Mamata Banerjee
Governor Jagdeep Dhankhar attacks on CM Mamata Banerjee

कोलकता : राज्यपाल आणि मुख्ममंत्र्यांमधील संघर्ष आता वाढतच चालला आहे. सतत एकमेकांवर टीका सुरू असल्यानं राज्याच्या राजकारणात वादाचा नवा अध्याय लिहिला जात आहे. अनेक राज्यांमध्ये राज्यपाल विरूध्द राज्य शासन असा सामना पाहायला मिळतो. पण बंगालमधील संघर्ष आता वैयक्तिक पातळीवर येऊन ठेपल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. (Governor Jagdeep Dhankhar attacks on CM Mamata Banerjee)

पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी राज्यपाल जगदीप धनखर यांच्यावर थेट भ्रष्टाचाराचे आरोप केले. राज्यपालांचं नाव 1996 मधील जैन हवाला प्रकरणात होतं, असा दावा त्यांनी केला. तेच त्यांना हटवण्यासाठी आपण तीन वेळा पत्रव्यवहार केल्याचंही ममतांनी सांगितलं. आमच्या सरकारला मोठं बहुमत मिळूनही ते एकाधिकारशाही का गाजवत आहेत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. 

या गंभीर आरोपांनंतर राज्यपालांनीही त्याला प्रत्युत्तर दिलं आहे. मुख्यमंत्री पदाला अशी सनसनाटी निर्माण करणं शोभत नसल्याची टीका धनखर यांनी केली आहे. ते म्हणाले, त्यांच्या पदाच्या नेत्याकडून अशी सनसनाटी निर्माण करणे आणि चुकीची माहिती देणे अपेक्षित नव्हते. राज्याच्या मुख्यमंत्र्यांची ही वक्तव्य दुर्दैवी आहेत. तुमच्या राज्यपालांचे नाव कधीच आरोपपत्रात नव्हतं. आरोपी असल्याबाबतचं कोणतंही कागदपत्रं उपलब्ध नाही. ही चुकीची माहिती आहे. मी कधीही हवाला प्रकरणात न्यायालयाची स्थगिती घेतलेली नाही, कारण असं काही घडलंच नाही.

यशवंत सिन्हा हे एका हवाला प्रकरणात होते, त्यामुळं ममता बॅनर्जी यांनी त्यांच्याशी चर्चा करावी. तुम्हाला सर्व संविधानिक संस्था नष्ट करण्यासाठी जनमत मिळालं आहे का, असा सवालही राज्यपालांनी उपस्थित केला. दरम्यान, बंगालच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर पुढील काही दिवस राज्यात अनेक ठिकाणी हिंसाचार उफाळून आला. हा हिंसाचार तृणमूल काँग्रेसनेच घडवून आणल्याचा आरोप भाजपकडून सातत्याने केला जात आहे. राज्यपाल जगदीप धनखर यांच्याकडूनही सातत्याने राज्य सरकारला जबाबदार धरले जात आहे. ते सातत्याने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना लक्ष्य करत आहेत. तसेच तृणमूलच्या नेत्यांकडून राज्यपालांवर आरोप केले जात आहेत.

दरम्यान, ममता सरकारकडून विधानसभेत राज्यपालांना हटवण्याबाबत ठराव मंजूर करण्याची शक्यता आहे. येत्या दोन जुलै रोजी विधानसभेचे अधिवेशन होणार आहे. या अधिवेशन हा ठराव मांडला जाईल, असे सुत्रांकडून सांगितलं जात आहे. या मुद्यांवर सरकारमध्ये खलबतं सुरू असून ममतानी विधानसभा अध्यक्ष बिमन बॅनर्जी यांच्याशीही चर्चा केल्याचं समजतं. बिमन बॅनर्जी यांनीही लोकसभा अधयक्ष ओम बिर्ला यांच्याकडे राज्यपालांची तक्रार केली आहे. 

राज्यपाल जगदीप धनखर हे काही दिवसांपूर्वीच दिल्लीत जाऊन आले आहेत. त्यांनी तिथं दोनवेळा गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. तसेच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनाही ते भेटले. या भेटीनंतर ते थेट उत्तर बंगालच्या दौऱ्यावर आठ दिवसांसाठी गेले. तिथून ते नुकतेच परतले असून लगेचच राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत. राज्यात लोकशाही नसल्याचा आरोपही त्यांच्याकडून सातत्याने केला जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com