तोपर्यंत माझ्या मुलावर अंत्यसंस्कार करणार नाही! पित्याने घेतली भूमिका

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथे घडलेल्या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचा एक थरारक व्हिडीओ समोर आला आहे.
Lovepreet Singh
Lovepreet Singh

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखीमपूर खिरी (Lakhimpur Kheri) येथे घडलेल्या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचा एक थरारक व्हिडीओ समोर आला आहे. रस्त्यावर उभ्या असलेल्या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना (Farmers) चिरडत वाहनांचा ताफा निघून गेल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. यातील एका मृत शेतकऱ्याच्या पित्याने मुलावर अंत्यसस्कार न करण्याची भूमिका घेतली आहे.

लखीमपूर खीरीतील घटनेत लवप्रीतसिंग (वय 19) या तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता. लवप्रीतसिंग याच्या शवपेटीत ठेवलेल्या मृतदेहाशेजारी त्यांचे कुटुंबीय आणि नातेवाईक बसून आहेत. त्यांनी लवप्रीतसिंग याच्या शवविच्छेदन अहवालाची प्रत मागितली असून, केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा पुत्र आशिष याच्यावर दाखल एफआयआरची प्रत द्यावी, अशीही मागणी केली आहे. या दोन्ही मागण्या पूर्ण होईपर्यंत लवप्रीतसिंगवर अंत्यसंस्कार न करणार नाही, असे त्याच्या कुटुंबीयांनी म्हटले आहे. माझ्या मुलाला गाडीखाली चिरडले तरीही त्यांनी दोषींवर काहीही कारवाई केलेली नाही. प्रशासन सगळे प्रकरण दाबून टाकत आहे, असा आरोपही लवप्रीतसिंगचे वडील सतनामसिंग यांनी केला आहे.

केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या वाहनांच्या ताफ्याने 3 ऑक्टोबरला आठ जणांना चिरडल्याचा आरोप करण्यात आला आहे. यातील एक गाडी खुद्द त्यांचा मुलगा आशिष चालवत होता, असाही दावा करण्यात आला आहे. मृतांमध्ये चार शेतकरी (Farmers) आणि भाजप कार्यकर्त्यांचा समावेश आहे. मात्र, गृहराज्यमंत्र्यांनी हा दावा फेटाळून लावत आपला मुलगा तिथे उपस्थित नव्हता असे म्हटले होते. त्यानंतर या घटनेबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. त्यातच या घटनेचा व्हिडीओ आता ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे.

शेतकरी आंदोलन करत असताना वाहनांचा ताफा त्यांच्या अंगावरून पुढे गेल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानं शेतकरी संघटनांमधील रोष आणखी वाढला आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनीही हा व्हिडीओ शेअर करत अजूनही शेतकऱ्यांना चिरडणारा व्यक्तीला अटक का केली नाही, असा सवाल मोदी सरकारला केला आहे. तसेच इतर नेत्यांनीही हा व्हिडीओ शेअर केला आहे.

Lovepreet Singh
मोदी अन् शहा गप्प असताना भाजप खासदाराने टाकला 'ट्विटबॉम्ब'

दरम्यान, लखीमपूर खिरीतील घटनेमुळे भाजप सरकार अडचणीत आले आहे. मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी जाणाऱ्या विरोधी पक्षांच्या नेत्यांना ताब्यात घेतले जात आहे. पोलिसांनी लखीमपूर खिरीमध्ये जमावबंदी लागू केली आहे. या घटनेची तीव्रता लक्षात घेऊन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना 45 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. याचबरोबर या प्रकरणी न्यायिक चौकशी करण्याची घोषणाही त्यांनी केली आहे.

Lovepreet Singh
फक्त लाच मागितली म्हणून पोलीस शिपायाला झाली अटक

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात गेली वर्षभरापासून शेतकरी शांततामय मार्गाने आंदोलन करीत आहेत. काल लखीमपूर खिरी येथे केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा आणि उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य हे आले होते. त्यावेळी केंद्रीय गृहराज्य मंत्री मिश्रा यांचा मुलगा अभिषेक आणि आंदोलक शेतकऱ्यांमध्ये बाचाबाची झाली होती. याचवेळी ही घटना घडली होती. यात 4 शेतकरी आणि 4 भाजप कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com