पायलट म्हणाले, आधी मी सरकारमध्ये होतो परंतु आता नाही...

राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरोधात पायलट यांनी पुकारलेले बंड अखेर शमले आहे. सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला असला तरी दोन्ही नेत्यांच्या सूर जुळणार की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.
earlier i was part of government but now i am not said congress leader sachin pilot
earlier i was part of government but now i am not said congress leader sachin pilot

जयपूर : राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरोधात सचिन पायलट यांनी पुकारलेले बंड शमले असून, काँग्रेसमध्ये आनंदाचे वातावरण आहे. विधानसभेत सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला असून, गेहलोत यांनी पुन्हा एकदा सरकारवरील पकड घट्ट केली आहे. याचवेळी पायलट यांची विधानसभेतील बसण्याची जागा बदलण्यावरुन मोठा वादंग सुरू झाली आहे. यावर पायलट हे जाहीरपणे बोलले असून, गेहलोत आणि पायलट यांच्या मनोमिलनाबद्दल 24 तासांच्या आता प्रश्न उपस्थित होत आहेत. 

पायलट यांचे समर्थक आमदार आता पुन्हा काँग्रेसच्या गोटात परतले आहेत. त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही, असे आश्वासन पक्षश्रेष्ठींनी पायलट यांना दिले आहे. मात्र, याचवेळी सरकारवरील विश्वासदर्शक ठरावावेळी गेहलोत यांच्या पारड्यात मत टाकण्याची अट पायलट यांच्यासह बंडखोर आमदारांना घालण्यात आली होती. गेहलोत यांच्याविरोधात बंडाचे निशाण फडकावल्यानंतर पायलट हे हरियानात गेले होते. तब्बल महिन्यानंतर पुन्हा राजस्थानमध्ये ते दाखल झाले आहेत. जयपूरमधील निवासस्थानी समर्थकांनी त्यांचे जोरदार स्वागत झाले होते. 

काँग्रेसने आज विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडला. हा ठराव अखेर गेहलोत यांच्या नेतृत्वाखालील सरकारने जिंकला आहे. या ठरावावर बोलताना गेहलोत यांनी भाजपला लक्ष्य केले. ते म्हणाले की, तुम्ही सक्त वसुली संचालनालय (ईडी), केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि प्राप्तिकर विभाग (आयटी) यांचा गैरवापर केला. तुम्ही दूरध्वनीवरुन बोलत असताना समोरच्याला फेसटाईम आणि व्हॉट्सअॅपवर तुमच्याशी संवाद साधण्यास सांगू शकत नाही. लोकशाहीत असे प्रकार योग्य नाहीत. 

गेहलोत आणि पायलट यांचे हस्तांदोलन आणि गळामिठ्या पाहता दोघांमधील संघर्ष संपला असेच चित्र होते. पायलट आज विधानसभा अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी आले. मात्र, त्यांची जागाच बदललेली दिसली. आधीच्या जागेपासून आताची त्यांची जागा सभागृहात अगदी विरुद्ध बाजूला आहे. त्यांना विरोधी पक्षांच्या बाजूची जागा देण्यात आली आहे. यावरील आश्चर्य स्वत: पायलटही लपवू शकले नाहीत. मात्र, आजच्या सभागृहातील बसण्याच्या जागेवरुन अजूनही धुसफूस सुरू असल्याचे समोर आले आहे. 

पायलट यांनी सभागृहात बोलताना मला सीमेवरील जागा देण्यात आली, असे म्हटले. शूर आणि ताकदवान योद्ध्याला सीमेवर लढण्यासाठी पाठवले जाते, असा टोलाही त्यांनी लगावला. सभागृहातून बाहेर आल्यानंतर माध्यमांशी बोलताना पायलट म्हणाले की, मी आधी सरकारमध्ये होतो परंतु आता नाही. कोण कुठे बसते याला महत्व नसून, जनतेच्या मनात आणि हृदयात कोणाला स्थान आहे, याला महत्व आहे. बसण्याच्या जागेबाबतचा निर्णय विधानसभा अध्यक्ष आणि पक्ष ठरवत असतो. त्यावर मला काही बोलायचे नाही. 

पायलट हे राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री होते. त्यांनी मुख्यमंत्री गेहलोत यांच्याविरोधात बंड केल्याने काँग्रेसने त्यांची प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्रिपदावरुन 14 जुलैला उचलबांगडी केली होती. याचबरोबर विधानसभा अध्यक्षांनी पायलट आणि इतर १८ आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावली होती. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com