नवी दिल्ली : आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत संरक्षण मंत्रालयाने १०१ प्रकारच्या युद्धविषयक सामग्रीच्या आयातीवर बंदी घातल्याची घोषणा संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी येथे केली. निर्धारित केलेल्या कालमर्यादेनंतर या वस्तू आयात करता येणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. देशांतर्गत संरक्षण उत्पादन वाढावे, यासाठी हे पाऊल उचलल्याचे राजनाथसिंह यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना लाॅकडाऊनच्या काळात आत्मनिर्भर भारत ही घोषणा केली. त्यातून प्रेरित होऊन संरक्षण मंत्रालयाने हा मोठा निर्णय घेतला असल्याचे राजनाथसिंह यांनी सांगितले. भारताला संरक्षण क्षेत्रातील उत्पादनात स्वावलंबी बनविण्याच्या दृष्टीने हे मोठे पाऊल असल्याचे ते म्हणाले.
''ज्या १०१ उत्पादनांची यादी बनविण्यात आली आहे त्यात केवळ लहान लहान सुट्या भागांचाच समावेश नाही. त्यापलीकडे जाऊन तोफा, रायफल्स, मोठ्या युद्धनौका, सोनार यंत्रणा, मालवाहतुकीसाठीची विमाने, रडार आणि अन्य उपकरणांचाही यात समावेश आहे,'' असेही राजनाथसिंह यांनी स्पष्ट केले. आयातीवरील ही बंदी २०२० ते २०२४ या काळात टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. देशांतर्गत उद्योगांना संरक्षण सामग्रीच्या गरजांची जाणीव होऊन त्यांनी त्या दृष्टीने स्वतःला सज्ज करावे, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
Edited By - Amit Golwalkar
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.