लखनौ : हाथरस येथील अत्याचार प्रकरणावरुन देशभरात वातावरण पेटले आहे. या प्रकरणी तपासासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात आली आहे. या पीडितेवर तिच्या कुटुंबीयांच्या परवानगीविना पोलिसांनी परस्पर अंत्यसंस्कार केल्याचा दावा करण्यात येत आहे. यावरुन उत्तर प्रदेश पोलिसांवर मोठ्या प्रमाणात टीका होता आहे. याबद्दल उत्तर प्रदेशचे पोलीस महासंचालक एच.सी.अवस्थी यांनी तो स्थानिक पातळीवरील प्रशासनाचा निर्णय असल्याचे सांगून टोलवाटोलवी केली आहे.
हाथरसमधील 19 वर्षांत्या दलित युवतीवर चार जणांनी अत्याचार केला होता. ही घटना दोन आठवड्यांपूर्वी घडली होती. नंतर उपचारादरम्यान दिल्लीतील रुग्णालयात त्या युवतीचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट पसरलीआहे. यातच पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने त्या पीडितेच्या कुटुंबीयांना विश्वासात न घेता परस्पर तिच्यावर अंत्यसंस्कार केले होते. पोलिसांनी या प्रकरणी पुरावे नष्ट केल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.
योगी आदित्यनाथ या प्रकरणी तपासासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने या प्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईची कुऱ्हाड चालवली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक चौकशीअंती हाथरसचे पोलीस अधीक्षक (एसपी), उपअधीक्षक (डीएसपी), पोलीस निरीक्षक आणि इतर अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक आणि उपअधीक्षकांची नार्को चाचणी करण्यात येणार आहे.
हाथरसमधील पीडितेवर तिच्या कुटुंबीयांची परवानगी न घेता पोलिसांनी परस्पर अंत्यसंस्कार केल्याचा दावा करण्यात येत आहे. याबाबत उत्तर प्रदेशचे पोलीस महासंचालक एच.सी.अवस्थी यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी टोलवाटोलवीची उत्तरे दिली. सुरूवातीला त्यांनी या प्रकरणावर न बोलण्याची भूमिका घेतली. नंतर त्यांनी हा निर्णय स्थानिक पातळीवरील प्रशासनाने घेतला होता, असे सांगून या प्रकरणातून अंग काढून घेण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, राहुल गांधी यांनी आज पुन्हा हाथरसला जाऊन पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्याचा निर्धार केला आहे. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे दोघे एकाच मोटारीतून हाथरसच्या दिशेने निघाले आहेत. ही मोटार प्रियंका गांधीच चालवत आहेत. या वेळी बोलताना प्रियंका गांधी यांनी आज आम्हाला अडवले तर पुन्हा आम्ही जाण्याचा प्रयत्न करु, असा निर्धार व्यक्त केला.
दिल्ली-नोएडा फ्लायवेवर मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. याचवेळी काँग्रेसचे अनेक बडे नेते आणि कार्यकर्तेही मोठ्या संख्येने जमा झाले होते. राहुल आणि प्रियंका यांचे येथे आगमन होताच कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी सुरू केली. या वेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी लाठीमार केला. राहुल गांधी यांनी काही काळ कार्यकर्त्यांशी संवादही साधला. अखेर योगी सरकारने राहुल आणि प्रियंका यांना हाथरसला जाण्याची परवानगी दिली. त्यानंतर ते हाथरसकडे रवाना झाले आहेत.
Edited by Sanjay Jadhav
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.