पोलीस उपायुक्त त्रिमुखेंना दणका तर अर्णब गोस्वामींना दिलासा

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना न्यायालयाने दिलासा दिला आहे. याचवेळी पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखेंना दणका दिला आहे.
court dismisses ips abhishek trimukhe defamation plea against arnab goswami
court dismisses ips abhishek trimukhe defamation plea against arnab goswami

मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना सत्र न्यायालयाने दिलासा दिला आहे. मुंबईतील पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी गोस्वामी यांच्याविरोधात दाखल केलेला अब्रुनुकसानीची खटला न्यायालयाने रद्दबातल ठरवला आहे. गोस्वामी यांनी अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात बदनामी केल्याचा दावा त्रिमुखे यांनी केला होता. 

त्रिमुखे यांनी मुंबईतील सत्र न्यायालयात खटला दाखल केला होता. रिपब्लिक टीव्हीची पालक कंपनी एआरजी आऊटलियर मीडिया प्रायव्हेट लिमिटेड, अर्णब गोस्वामी आणि त्यांची पत्नी यांच्याविरोधात हा खटला दाखल करण्यात आला होता. गोस्वामी यांची पत्नी या कंपनीची संचालिका आहे. 

सत्र न्यायालयाने हा खटला रद्दबातल ठरवला आहे. योग्य कायदेशीर प्रक्रियेने हा खटला दाखल करण्यात आलेला नाही, असे कारण सत्र न्यायालयाने दिले आहे. न्यायालयाने म्हटले आहे की, त्रिमुखे यांची तक्रार फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १९९ नुसार नाही. यात सरकारी वकील हे तक्रादार असायले हवे होते. उलट या प्रकरणात त्रिमुखे हे तक्रारदार आहेत. 

आता त्रिमुखे यांनी दंडाधिकाऱ्यांसमोर तक्रार दाखल करण्याची मुभा आहे. मात्र, यासाठी त्यांनी  सरकारी वकिलांमार्फत तक्रार दाखल करायला हवी. त्यामुळे त्रिमुखे यांच्या तक्रारीतील मुद्द्यावर न्यायालय काहीही निरीक्षण नोंदवणार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. 

गोस्वामी यांनी त्रिमुखे यांच्याबद्दलची चुकीची माहिती काही ट्विटमध्ये दिली. तसेच, त्यांनी महाराष्ट्र सरकारबद्दलही चुकीची माहिती दिली होती, असा दावा करण्यात आला होता. हा खटला दाखल करण्यास त्रिमुखे यांना राज्य सरकारच्या गृह विभागाने परवानगी दिली होती. भारतीय दंड विधान (आयपीसी) कलम 499, 500, 501 अंतर्गत खटला दाखल करण्यात आला होता. यात अब्रुनुकसानी आणि बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध करणे असे आरोप करण्यात आले होते. 

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात गोस्वामींनी खोटी, चुकीची आणि बदनामीकारक माहिती दिली. ही बदनामीकारक माहिती रिपब्लिक टीव्हीवरुन प्रसारित करण्यात आली होती. त्रिमुखे यांच्यावर संशय घेण्यात आला तसेच, मुंबई पोलिसांचीही बदनामी करण्यात आली होती, असे या खटल्यात म्हटले होते. 

दरम्यान, बनावट टीआरपी प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी अडचणीत आले आहेत. या प्रकरणी रिपब्लिक टीव्हीच्या काही अधिकाऱ्यांना अटक झाली असून, चौकशीचा फेरा सुरू आहे. या प्रकरणी पोलिसांनी ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिलचे (बीएआरसी) माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता यांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली होती. गोस्वामी हे रिपब्लिक टीव्हीचा टीआरपी वाढवण्यासाठी दासगुप्ता यांना लाखो रुपये देत असल्याची खळबळजनक बाब तपासात समोर आली होती. 

दासगुप्तांच्या जामिनावर उच्च न्यायालयासमोर नुकतीच सुनावणी झाली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार या प्रकरणातील सूत्रधार कोण आणि यात दासगुप्तांची भूमिका काय, असा प्रश्न उच्च न्यायालयाने विचारला होता. यावर सरकारी वकिलांना आरोपपत्रात दासगुप्ता हेच सूत्रधार असल्याचे सांगितले. या प्रकरणातील मास्टरमाईंड अर्णब गोस्वामी आहेत, असे दासगुप्तांच्या वकिलांनी उच्च न्यायालयाला सांगितले होते.    

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com