मोदी सरकार बेडरूममधील बोलणंही ऐकत आहे!

गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे.
Congress slams Modi Government over Pegasus Scandal
Congress slams Modi Government over Pegasus Scandal

नवी दिल्ली : पिगॅसस स्पायवेअरच्या माध्यमातून देशभरातील पत्रकारांसह दोन केंद्रीय मंत्री, काँग्रेसचे नेते राहुल गांधी, राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर, खासदार अभिषेक बॅनर्जी आदींचे फोन हॅक करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यावरून सोमवारी पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी सरकारला घेरलं. काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी मोदी सरकारला धारेवर धरले असून गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. (Congress slams Modi Government over Pegasus Scandal)

पिगॅससचा मुद्दा चांगलाच तापला आहे. सरकारच्या वतीने याबाबत खुलासा करण्यात आला आहे. हे भारताची प्रतिमा मलिन करण्यासाठीचे षडयंत्र असल्याचं शहा यांनी म्हटलं आहे. पण याबाबत काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे, रणदीप सुरजेवाला, अधिर रंजन चौधरी यांनी पत्रकार परिषदेत मोदी सरकारवर जोरदार टीका केली. 

मोदी सरकारने कायदा आणि घटनेची हत्या केली आहे. राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड केली आहे. सरकार आता बेडरूमधील बोलणंही ऐकत आहे. त्यामुळं भाजपचं नाव आता भारतीय जासूस पार्टी करायला हवे, अशी टीका सुरजेवाला यांनी केली. तर खरगे यांनी शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तसेच या प्रकरणातील पंतप्रधानांच्या भूमिकेचीही चौकशी व्हायला हवी. आम्ही हा मुद्दा संसदेत उचलून धरू, असेही खरगे यांनी स्पष्ट केलं. 

काय आहे प्रकरण?

इस्राईलमधील ‘एनएसओ ग्रुप’ कंपनीने पेगॅसिस स्पायवेअर तयार केला आहे. पॅरिस येथील ‘फॉर्बिडन स्टोरीज’ आणि अॅम्नेस्टी इंटरनॅशनल या संस्थांनी ही बाब उघडकीस आणत ५० हजार मोबाईल क्रमांकाची यादीच तयार केली. ही माहिती त्यांनी जगभरातील इतर १६ वृत्तसंस्थांना  दिली. या यादीनुसार शोध घेतल्यानंतर ५० देशांमधील एक हजारांहून अधिक जणांवर पाळत ठेवल्याबाबतचे पुरावे मिळाले. ‘एनएसओ’ने ज्यांना हे स्पायवेअर विकले होते, त्यांच्याकडूनच पाळत ठेवण्याचा प्रकार घडला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

सुरूवातीला भारतातील 40 पत्रकारांचे फोन हॅक केल्याची माहिती भारतातील एका वृत्तसंस्थेने दिली होती. त्यानंतर आता केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव प्रल्हाद पटेल यांच्यासह राहुल गांधी, प्रशांत किशोर, अभिषेक बॅनर्जी, अशोक लवासा यांच्यासह काही सुरक्षा यंत्रणांचे आजी-माजी प्रमुख, अधिकारी, काही उद्योजकांचाही त्यात समावेश असल्याचा दावा करण्यात आला आहे. अनेक वृत्तसंस्थांनी याबाबतचे वृत्त दिले आहे. त्यांच्या मोबाईल क्रमांकांना लोकसभेच्या 2019 च्या निवडणुकीआधी 2018-19 मध्ये लक्ष्य करण्यात आले होते, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे. 

पिगॅससवरून संसद व संसदेबाहेरही जोरदार वाद निर्माण झाला आहे. यावर वैष्णव यांनी संसदेत खुलासा केला. त्यांनी खुलासा केल्यानंतर काही वेळातच खुद्द त्यांचेच नाव या अहवालात असल्याचे समोर आलं. त्यामुळे विरोधकांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. वैष्णव यांचा नुकताच केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. ते 2018-19 मध्येच खासदार झाले आहेत. 

प्रशांत किशोर यांनी 2014 मध्ये भाजपच्या प्रचाराची रणनीती आखली होती. यावर्षी भाजपने बहुमत मिळवत सत्ता काबीज केली होती. त्यानंतर किशोर यांनी भाजप वगळून अनेक राजकीय पक्षांसाठी कामं केलं आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि तमिळनाडूत एम. के. स्टॅलिन यांच्यासाठी काम केलं. माजी निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांनी 2019 च्या लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधात आलेल्या तक्रारींबाबत आयोगाने दिलेल्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती. त्यांचाही फोन हॅक झाल्याचा दावा करण्यात आला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com