शशि थरुर यांना काँग्रेस नेत्यानेच पाहुणा कलाकार म्हणून हिणवले!

काँग्रेसच्या नेतृत्वाच्या मुद्द्यावरुन उठलेला गदारोळ कायम असून, राहुल गांधी यांनी पुन्हा अध्यक्षपद स्वीकारावे, अशी मागणी होत आहे. याचवेळी पक्ष नेतृत्वाला पत्र लिहिणारे नेते आता पक्षातूनच लक्ष्य होऊ लागले आहेत.
congress leader said shahi tharoor is not a politician but guest artist in party
congress leader said shahi tharoor is not a politician but guest artist in party

नवी दिल्ली : काँग्रेसच्या कार्यकारी समितीची नुकतीच झालेली बैठक वादळी ठरली होती. कार्यकारी समितीच्या बैठकीत ठरल्यानुसार आता सोनिया गांधी याच पक्षाच्या हंगामी अध्यक्षपदी कायम राहणार आहेत. पुढील सहा महिन्यांत नवीन अध्यक्षाची निवड केली जाणार आहे. पक्ष नेतृत्वात बदलासाठी पत्र लिहणारे 23 नेते वादाच्या केंद्रस्थाना राहिले होते. पत्र लिहिणाऱ्या नेत्यांना पक्षातूनच लक्ष्य केले जात आहे. आता शशि थरुर यांना काँग्रेसमधील पाहुणे कलाकार म्हणून हिणवण्यात आले आहे. 

काँग्रेस कार्यकारी समितीची अतिशय महत्वाची बैठक नुकतीच झाली. काँग्रेसच्या वीसहून अधिक ज्येष्ठ नेत्यांनी पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष नेमावा, अशी मागणी केली होती. याचबरोबर त्यांनी पक्षातील रचनात्मक सुधारणांचा मुद्दा उपस्थित करुन पक्षाची स्थिती आणि दिशा याबाबत प्रश्न उपस्थित केले होते. याचबरोबर त्यांनी काँग्रेस कार्यकारी समितीची निवडणूक घेण्याची मागणी केली होती. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या व्हर्च्युअल बैठकीला सोनिया गांधी, डॉ.मनमोहनसिंग, राहुल गांधी, प्रियांका गांधी वद्रा, अमरिंदरसिंग, मल्लिकार्जुन खर्गे, पी.एल.पुनिया, के.सी.वेणूगोपाल आणि ए.के.अँटनी यासह अन्य नेते या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत हंगामी अध्यक्षपदावरुन मुक्त करण्याची विनंती सोनिया गांधी यांनी समितीच्या सदस्यांनी केली होती. यावर मनमोहनसिंग आणि ए.के.अँटनी यांनी नवीन अध्यक्षाची निवड होईपर्यंत सोनिया यांनीच अध्यक्षपदी राहावे, असे सुचवले.

काँग्रेस नेत्यांच्या पत्राच्या मुद्द्यावरुन पक्षात दोन गट पडले आहेत. गांधी कुटुंबाचे निष्ठावंत आणि काँग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी पत्र लिहिणाऱ्या नेत्यांना लक्ष्य केले आहे. सोनिया यांनीच अध्यक्षपदी राहावे अथवा राहुल यांनी पुन्हा अध्यक्षपद स्वीकारावे, अशी मागणी करण्यात येत आहे. राहुल गांधी यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर सोनिया गांधी यांनी 10 ऑगस्ट 2019 रोजी पक्षाच्या हंगामी अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला होता. 

पक्षातील नेतृत्व बदलाबाबत पत्र लिहिणारे नेते हे भाजपशी संगनमत करीत आहेत, असा आरोप राहुल गांधी यांनी या बैठकीत केल्याची चर्चा सुरू झाली होती. राजस्थानमध्ये पक्षासमोर निर्माण झालेले संकट, सोनिया गांधी रुग्णालयात दाखल असतानाची नेमकी वेळ पत्रासाठी निवडण्यात आली, असे राहुल गांधी म्हणाल्याचीही चर्चा होती. अखेर पक्षाने राहुल गांधी असे काहीच बोलले नसल्याचे स्पष्ट केले आहे. 

पत्र लिहिणाऱ्या 23 नेत्यांमध्ये शशि थरुर यांचाही समावेश होता. केरळमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कोडीकसुनिल सुरेश यांनी थरुर यांना लक्ष्य केले आहे. सुरेश हे काँग्रेसचे लोकसभेतील मुख्य प्रतोद आहेत. त्यांनी म्हटले आहे की, शशि थरुर हे काही राजकारणी नाहीत. ते काँग्रेसमध्ये केवळ पाहुणे कलाकार म्हणून आले आहेत ते पक्षात पाहुणे कलाकार म्हणून कायम राहतील. थरुर यांना वाटत असेल ते जागतिक नागरिक असल्याने त्यांना कोणताही निर्णय घेता येईल अथवा आपल्या इच्छेप्रमाणे वागता येईल. परंतु, शेवटी त्यांना पक्षाचे ऐकावेच लागेल. 

सुरेश यांच्या या विधानानंतर मोठा गदारोळ उडाला. अखेर प्रसारमाध्यमांनी माझ्या विधानाचा विपर्यास केला, असा दावा सुरेश यांनी केला. नंतर विधान मागे घेतल्याचेही त्यांनी जाहीर केले. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com