काँग्रेसला दे धक्का; आमदाराच्या चुकीमुळे पराभव झालेल्या माजी खासदाराचा पक्षाला रामराम

आसाममध्ये नुकत्याच झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष व माजी खासदार निपुन बोरा यांचा धक्कादायक पराभव झाला.
Congress
CongressSarkarnama

गुवाहाटी : आसाममध्ये (Assam) नुकत्याच झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचे (Congress) माजी प्रदेशाध्यक्ष व माजी खासदार रिपुन बोरा (Ripun Bora) यांचा धक्कादायक पराभव झाला. या निवडणुकीत काँग्रेस आमदाराच्या चुकीमुळे त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यानंतर बोरा यांनी राज्यातील पक्षांतर्गत दुहीवर बोट ठेवत पक्षाला रामराम ठोकला आहे. काँग्रेस व मुख्यमंत्र्यांमध्ये हातमिळवणी झाली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

बोरा यांनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना राजीनामा पाठवला आहे. यामध्ये त्यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. 2021 च्या विधानसभा निवडणुकीआधी प्रदेशाध्यक्ष असताना आपण पक्ष बळकट करण्यासाठी प्रयत्न केला. पंचायत निवडणुकीपासून सर्व निवडणुकीमध्ये पक्षाने एकजुटीने भाजपशी लढा दिला. पण 2021 च्या निवडणुकीत पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही. केवळ पक्षातील काही नेत्यांच्या स्वार्थापोटी पक्षाचा पराभव झाला. भाजपशी लढण्याऐवजी नेते आपआपसांतच लढत आहेत, असा आरोप बोरा यांनी केला आहे.

Congress
जुन्या मित्रामुळं भाजपला पोटनिवडणुकीत बसला झटका!

राज्यसभेच्या निवडणुकीतही काही नेत्यांनी पक्षविरोधी भूमिका घेतली. त्यामुळे भाजपला दोन्ही जागा मिळाल्या. प्रदेश काँग्रेस आणि भाजप (BJP) सरकार प्रामुख्याने मुख्यमंत्री हातात हात घालून काम करत आहेत. अशा स्थितीत मी पक्षात राहू शकत नाही. भाजपच्या राजकारणामुळे लोकशाही धोक्यात आली आहे. मी यापुढेही भाजपविरोधात लढत राहणार आहे, असं स्पष्ट करत बोरा यांनी राजीनामा देत असल्याचे पत्रात म्हटलं आहे.

बोरा हे राज्यसभेचे खासदार होते. त्यांची मुदत संपल्यानंतर त्यांना काँग्रेसकडून पुन्हा संधी देण्यात आली होती. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. आसाममध्ये राज्यसभेच्या (Rajya Sabha) दोन जागांसाठी निवडणूक झाली. यातील एक जागा बिनविरोध झाली तर एका जागेसाठी मतदान झाले. या निवडणुकीत काँग्रेसचे आमदार सिद्दीकी अहमद यांनी हा प्रकार केला आहे. काँग्रेसचे उमेदवार रिपुन बोरा यांच्या पराभवास अहमद कारणीभूत ठरले. मतपत्रिकेवर अहमद यांना 1 हा आकडा लिहायचा होता. त्याऐवजी अहमद यांनी ‘one’ असे लिहिले. त्यामुळे त्यांचे मत बाद झाले आणि काँग्रेसच्या बोरा यांचा पराभव झाला.

भाजपचे पवित्र मार्गरिटा हे बिनविरोध निवडून आले. दुसऱ्या जागेसाठी भाजप आघाडीकडून युनायटेड पीपल्स पार्टी लिबरल पक्षाचे राँग्वरा नार्झरे हे मैदानात उतरले होते. त्यांच्या विरोधात काँग्रेसने बोरा यांना उतरवले होते. आसाम विधानसभेतील एकूण 126 मतांपैकी 83 मते भाजप आणि सहकारी पक्षांकडे होती. ही मते मार्गरिटा यांना निवडून आणण्यास पुरेशी होती. दुसऱ्या उमेदवाराला निवडून येण्यासाठी 43 मते आवश्यक होती. काँग्रेससह विरोधी पक्षांकडे 44 मते होती. परंतु, अहमद यांनी त्यांचे मत वाया घालवले. यामुळे अखेर बोरा यांचा पराभव झाला आणि भाजपने दुसरी जागाही जिंकली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com